आठवतं तुला..?

ती म्हणाली,
" आठवतं तुला...
त्या अनोळखी रस्त्यांवरून
तू माझ्याबरोबर यायचास
मदत म्हणून..
आज सारे रस्ते ओळखीचे झालेत
म्हणून तू अनोळखी व्हावं
असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते
त्यासाठी कुणाच्या
ओळखीची गरज नव्हती
मला तुझी मदत नको,
सोबत हवी होती..."

तो उत्तरला,
"आठवतं तुला .....
तू दबकत चालत जायचीस
त्या रस्त्यावरच्या फुलांना
दुखवू नये म्हणून..
तुझा क्षणिक स्पर्शही
त्यांना पुरेसा झाला असता...
माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.

तुला कधी समजलंच नाही
ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.
ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस
आपली नाहीत समजून
तुला कधी उमजलंच नाही
ती फक्त तुझीच होती म्हणून...."

-अनामिका.