नाही चिरा नाही पणती..

चंद्रशेखर सिताराम तिवारी. जन्म भॉवरा, जिल्हा झाबुआ, मध्य प्रदेश. एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेला सामान्य मुलगा. शिक्षणात लक्ष्य बेताचेच. आदिवासी मुलांबरोबर जंगलात उनाडणे आणि तिरकमठा चालवणे हेच अधिक प्रिय. मात्र स्वभाव अगदी सरळ आणि रोख ठोक. एकदा शिक्षक मनोहरलाल त्रिवेदिंनी मुलांची परिक्षा घेण्या करिता एक चुकीचा शब्द घातला. बंधु शुकलालने तो तात्काळ सुधारुन सांगीतला पण याने मात्र शब्द पुरा होण्या आधिच समोरची छडी उचलली आणि हाणली मनोहरलालजींना. आम्ही चुकलो तर ते मारतात, आज ते चुकले तर आम्ही का मारु नये हा प्रश्न!


मन शाळेत वा गावात रमले नाही, मग गेला मुंबैला. तिथेही काही चैन पडेना. तिथून स्वारी काशीस पोचली. अध्ययन आणि शरिरसंवर्धन करता करता एक दिवस आपोआप तो १४ वर्षाचा मुलगा असहकार आंदोलनात सामील झाला. प्रथम जेव्हा तो मोर्चात पकडला गेला, तेव्हा फ़ौजदाराने तुला यातले काय समजते? उगाच चालले मोर्चे घेउन असे म्हणत सोडून दिले. हा पुन्हा मोर्चात गेला. यावेळी मात्र त्याला मॅजिस्ट्रेट खारेघाट यांचेपुढे उभे केले गेले. साहेबांनी माहिती विचाराला सुरुवात केली:


नाव? --- आझाद.


बापाचे नाव? --- स्वतंत्रता.


व्यवसाय? --- देश स्वतंत्र करणे.


पत्ता?------ जेलखाना.


बापजन्मात अशी उत्तरे न ऐकलेला खारेघाट पिसाळला आणि त्य १४ वर्षाच्या मुलाला १५ फ़टक्यांची शिक्षा दिली. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या कसुरी वेताचे फ़टके मारताना कातडी फ़ाटून रक्त व मांस बाहेर येते असे, त्यामुळे ही शिक्षा ऐकताच अट्टल गुन्हेगार देखिल चळचळा कापत. मात्र हा मुलगा बेडर पणे म्हणाल कि मला तिकटीवर बांधाची गरज नाही, मारा तुम्ही. तुरुंगाधिकार्यांसह सारे लोक पहात राहीले. प्रत्येक फ़ट्क्याला तो मुलगा 'वंदे मातरम ' म्हणत होता. फ़टके पूर्ण झाल्यावर त्याची सार्‍या काशी गावात मिरवणुक निघाली, हारावर हार पडले. मग झालेल्या सत्कार सभेत पं. श्रिप्रकाश यांनी त्या मुलाचा उल्लेख चंद्रशेखर आझाद असा केला आणि तेव्हापासुन   तेच नाव कायम झाले.


त्या १५ फ़टक्यांनी जीवनाचा अर्थच बदलला. माझ्याच देशात माझ्याच देशाला प्रणाम केला तर त्याबद्दल अमानुष मारहाण करणारे हे लोक म्हणजे माणसे नसुन सैतान  आहेत. त्यांना समजेल अशीच भाषा यापुढे त्यांना लागु केली केली पाहिजे असा निष्कर्ष त्याने काढला. या हिंस्त्र पशूंना हाणलेच पाहीजे असा निश्चय त्यांनी केला. १९२२ साली अवसानघातकी पुढार्‍यांनी अचानक असहकार आंदोलन मागे घेतले आणि सर्वस्वाचा त्याग करुन आंदोलनात उतरलेले अनेक तरुण साफ़ ढासळले. २३ साली आझादांनी सचिंद्रनाथ संन्यालांच्या एच. आर. ए (हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिअशन) मध्ये प्रवेष केला. तिथे त्यांना अनेके समविचारी आणि ध्येयाने भारलेले धाडसी तरुण भेटले. भगतसिंह, सुखदेव, दत्त, राजगुरु, सावर्गावकर, पोतदार, भगवानदास, भगवतिचरण, बिस्मिल, अश्फ़ाकुल्ला, महाविरसिंह, डॉ. गयाप्रसाद, शिव वर्मा, परमानंद, मणीद्रनाथ, जतिन दास, असे अनेक धडाडीचे युवक एकत्र येताच 'ऍक्शन' ला सुरुवात झाली. ९ ऑगस्ट १९२५ ला काकोरी चा आगगाडिवरील हल्ला आझादांनी त्यांचे नियोजन व जबरदस्त साहस यांच्या जोरावर यशस्वी करुन सर्वमान्य नेतृत्त्व मिळवले. स्वतंत्र भारता बरोबरच संपन्न व शोषणमुक्त समाजाची स्वप्ने पहाणर्‍या या युवकांनी ९ सप्टेम्बर १९२९ रोजी एच.एस.आर.ए ची स्थापना केली. या संघटनेचे दोन प्रभाग होते. एक हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी जिथे प्रत्यक्ष कृति केली जाणार होती आणि दुसरा भाग म्हणजे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन - जिथे सहानुभुती असणारे परंतु प्रत्यक्ष कृतिमद्ध्ये सामिल न होता निधी संकलन, भुमिगतांना आसरा, क्रांतिकारकांना अन्न व आश्रय मिळवून देणे अशी कमे केली जाणार होती. आझाद दोहिंचे समन्वयक होते. एच.एस.आर.ए ने पहीलाच दणका दिला तो सॉडर्स ला भर दिवसा त्याच्या कचेरी समोर कंठस्नान घालून. या प्रसंगी आझादांनी आपल्या अचुक नेमेबाजीचे प्रात्यक्षिक दाखविले. राजगुरु व भगतसिंह हे निसटुन जाउ पहात असताना शिपाई छनान्सिंहाने त्याना अडवाचा प्रयत्न केला. पुढे भगतसिंह, त्याला पकडू पहाणारा छ्नान आणि छ्नान च्या मागे त्याला खेचणारे राजगुरु असे महाकठीण व धावते लक्ष्य संरक्षण फ़ळीची भूमिका निभावणार्या आझादांनी अचूक टिपले. आपल्याच माणसाची हत्या घडु नये म्हणून प्रथम पायावर व तरीही न ऐकल्यामुळे त्याच्या मणक्यात गोळी झाडुन आझादांनी त्याला टिपला.


काही व्यक्तिंचा मृत्यु हा त्यांच्या जिवनापेक्षा अधिक स्फ़ुर्तिदायक ठरतो,  तसा आझादांचा ठरला. २७ फ़ेब्रुआरी १९३१ म्हणजे बरोबर ७४ वर्षांपूर्वी अलाहाबादच्या आल्फ़्रेड पार्क मध्ये आझादांनी वीर मरण पत्करले. मरताना त्यांनी आधी आपल्याब्रोबर असलेल्या सुखराजसिंहास तिथून जाण्यास भाग पाडले. एस.एस.पी. नॉट वॉबरच्या गोळीने माण्डीचे हाड मोडल्यानंतरही आझादांच्या मॉवजरच्या गोळीने त्याचा डावा हात उत्तरादाखाल मोडला. झुंजत असताना आझाद वारंवार पोलिसांना आवाहन करीत होते कि मला तुम्हाला माराची इच्छा नाही, तेव्हा मागे फ़िरा, आणि याच बंदुका गोर्यांवर रोखा. तसे केलेत तर त्यांना हा देश सोडुन जावा लागेल. आझाद फ़क्त नॉट्वॉबर वर नेम धरीत होते. दुसरीकडून डिएस्पी विश्वेश्वर सिंह ठाकुर यांनी नविन कुमक घेउन हल्ला केला. गोळी झाडुन ते झुडुपात लपले तेव्हा वर जाणार्या धूराचा अंदाज घेउन आझादांनी जी गोळी झाडली  तीने त्यांचा जबडा फ़ोडला. एक विरुद्ध अनेक असा विषम संघर्ष किती वेळ चालणार? तरीही एकटे आझाद त्या फ़ौज फ़ाट्याला २२ मिनिटे झुंजवित राहीले. जेव्हा त्यांना शेवट दिसला तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या मॉवजरची नळी आपल्या उजव्या कानशिलाला लावली आणि डाव्या हातात देशाची मुठभर माती घेऊन चाप ओढला. मृत्यु नंतरही कोणी जवळ जायला धजेना. बराच वेळ मृतदेहावर गोळीबार चालु होता. बहुधा आपण बेसावध पणे जवळ जावे म्हणून आझाद नाटक करित आहेत असा पोलीसांचा कयस होता. अखेर एका शिपायाला पुढे जवळ जाउन गोळ्या झाडण्यास सांगीतले व मेल्याची पूर्ण खात्री झाल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. स्वत: नॉट  वॉबर ने जबाब नोंदवला कि सुदैवाने हा मनुष्य माझ्या एक गोळीने सुरुवातीलाच जखमी झाला म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आज याच्या ऐवजी आम्हा सर्वांची प्रेते सापडली असती.


दुर्दैवाने या महान क्रांतिकारकांची अवस्था आजही 'नाही चिर नाही पणती अशीच आहे.