लोहगड

लोकलच्या 'हूक'ला लटकत लटकत बाहेर नजर टाकत होतो. प्रत्येक स्टेशन आले की हजारो पाय माझ्या पायाचा मुका घेत होते. गर्दीने तर माझी दामटीच वळली होती. पण तिथे लक्ष द्यायला मला फारसा वेळ नव्हता. माझं लक्ष होत ते 'मळवली' स्टेशन कडे.... लोहगडाला जाण्यासाठी इथेच उतरावे लागते.

मनात असंख्य संदर्भ येत होते... लोहगड..‌. शिवाजी महाराजांचा एक किल्ला.... ४५०० फूट उंच.... तटबंदी अजूनही शाबूत असलेला...वगैरं वगैरे...काल "विकिपीडिया" वर माहिती वाचली होती.

मळवली स्टेशन तसं छोटंसं स्टेशन... इथे बहुदा फक्त लोकलच थांबत असाव्यात. खाली उतरल्यावर आधी कॅमेरा रोल कुठे मिळतो आहे का ते पाहिलं.... खरंतर ३६ सच फोटो मध्ये शिवाजी महाराजांच साम्राज्य बसवायचं म्हणजे तसं अवघडच होत... पण इलाज नव्हता..डिजीटल कॅमेरा घरीच विसरून आलो होतो.

असो....रोल घेऊन सहज वर पाहिलं तर प्रचंड मोठे २ किल्ले दिसले... विसापूर आणि लोहगड - एक ४६०० फूट आणि दुसरा ४५०० फूट. इंग्रजांनी १८१८ मध्ये ह्या १०० फुटांचा फायदा घेऊन लोहगडावर तोफा डागल्या होत्या... पेशवे हरले... गड गेला.

इतिहास मधून-अधून मनात डोकावत होता.... विसापूरच्या तटबंदीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरिपा चमकत होत्या.... दगड धोंड्याच्या रस्त्यावरून चालताना कल्पनाशक्ती अचाट वेगाने धावत होती... ४०० वर्षांपूर्वी शिवाजी महाराज असेच आपल्या सारखे ह्याच रस्त्यावरून गेले असतील.... कदाचित तेच दगड अजूनही इथेच पडलेले असतील प्रत्येक दगडाला महाराजांचे तेज अजूनही आठवत असेल कदाचित.... जर त्या दगडांची माती झाली असेल तर त्या मातीच्या कणांनाही कदाचित आठवत असतील महाराज.

ह्या...इथूनच गेल्या असतील त्यांच्या तोफा...त्यांची सेना...त्यांचे घोडे....वरून..तिथून.. ही वाट अगदी स्पष्ट दिसत असेल...पहारेकरी नजर ठेवत असतील तिथून. रस्त्यात अजूनही काही चावऱ्या शाबूत आहेत जिथे बहुदा विश्रांतीची व्यवस्था असावी - छोटंसं महादेव मंदिर आणि बाजूला पाण्याचे रांजण ठेवण्यासाठी जागा.

साधारण ९ किमी चालून/चढून गेल्यावर लोहगडवाडी लागते. तिथून किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. पायऱ्याही शाबूत आहेत. चढून जाताना दरवाज्याची रचना पाहिली की मन थक्क होत. पहिला दरवाजा अश्या तऱ्हेने बसवला आहे की कोणी तोफ डागली तरीही तिचा मारा दरवाज्यापर्यंत पोहोचणार नाही. पाहिऱ्या दरवाज्याजवळ अश्या तऱ्हेने नागमोडी बसवल्या आहेत की जर कोणी लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर ते ही शक्य नाही आणि हत्तीला हि तिथे नेणं शक्य नाही... म्हणजे दरवाजा तोडणं केवळ अशक्यच! म्हणूनच कदाचित तो अजून शाबूत आहे.... भरीव लोखंडाची चौकट देखील तिथे लटकत आहे.... दर्जेदार कामाची साक्ष द्यायला

आत प्रवेश केल्यावर बुरुजांवर नक्की जावे....एका झरोक्यातून किती मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येऊ शकते हे ह्यातून कळते.... मोजकेच बुरूज पण त्यातून किल्ल्याच्या सगळ्या बाजूला लक्ष ठेवणे शक्य आहे.... केवढी ही बुद्धिमत्ता! गडावर पाण्याचे ७-८ हौद आहेत. त्यातल्या एका  हौदात पिण्याचे पाणी अजूनही स्वच्छ आहे. तिथल्या पाण्याच्या एका घोटाची सर हजार बिस्लेरीना देखिल नाही यायची. घडीव बांधाच्या अष्टकोनी आणि द्वादशकोनी हौदांमध्ये पाण्याचे जिवंत स्रोत आहेत.

थोडं पुढे गेल्यावर समोर विसापूर दिसतो.... एका तोफेची रेन्ज जर ३ किमी मानली तर अंदाज येऊ शकतो की खरंच तिथून इंग्रजांनी तोफा डागल्या असतील.... इतका जवळ आहे विसापूर. पीर बाबांच्या समाधी जवळ काही बेजबाबदार मुलांनी एक तोफ उलटी उभी करून ठेवली आहे.... आमच्या ग्रुप नि ति सरळ करायचा एक असफल प्रयत्न केला... कोणाला जमले तर कृपया ति सरळ करावी! महाराजांचे विचार नही तर निदान तोफ तरी सांभाळूयात!

गडाचा परिसर अतिप्रचंड आहे... विंचूकाटा हे गडाचे शेवटचे टोक....तिथे जाऊन भगवा फडकवल्याशिवाय आम्हाला राहवले नाही.