अबोली

वन-टू वन-टू करत आँफिसला जाताना नेहमीप्रमाणे सईचा मीस काँल आला. तसा मीस काँल येणं हे ठरलेलंचं. पण हा मीस काँल कधी येईल त्याला काही नियम नाहीत. म्हणजे लहान मूल अगदी वेळ काळ न बघता बेलाशकपणे वाटेल त्या कारणावरून वाटेल तिथे भोकाड पसरायला सुरवात करेल तसंच काहिसं म्हणाना. पण यारहो, काहिही म्हणा आवडंत हे असं कुणीतरी आपल्यावर आपल्याही अगोदर हक्क गाजवलेला. यातून दुसऱ्याच्या ठायी असलेलं आपलं महत्व आपल्याच लक्षात येतं.
आता मी अडकलोय इकडे साता समुद्रापार, मला आपल्या देशातून इकडे मीस काँल द्यायचा म्हटलं तरी बऱ्याच जणांच्या अंगावर काटा उभा राहत असावा(अर्थातच हा माझा तर्क) त्यामूळे, "मला फोन आला" असं वाक्य आजकाल बोललंच जात नाही माझ्याकडून. मित्रमंडळींचा भेटीचा अड्डा म्हणजे मेसेंजर्स आणि आँर्कूट आणि कधी कधी १५ एक दिवसातून फोनवर(अर्थातच तोही मी केलेला).

पण एक मीस काँल मात्र अगदी नित्य निरंतर असतो.

त्यामूळे मीस काँल कुणाचा आला असेल हे बघण्याच्या भानगडीत न पडता मी मोबाईल खिशातून काढून सरळ सरळ अगोदर १ आणि नंतर ३ डायल केला. मी ’बोल’ अथवा ’हँलो’ अथवा इतर काहिही बोलायच्या आतच, ’ए दीप त्या(अमूक तमूक)ने काय सुंदर कविता टाकली यार आँर्कूटवर.. "अबोली" वर’.

प्रेमरोग मध्ये ती बालीश पद्मिनी त्या प्रेमरोगी चंपू ला जेव्हा ’ए देव.. ’ म्हणायची ना तेव्हा जाम जळायचो मी त्या बिचाऱ्या चंपू वर. जर त्याला आता कळलं की मला कुणीतरी ’ए दीप’ म्हणतं (पिक्चर मधल्या सारखं खोटं खोटं नाही) तर I hope की तो माझ्यावर जळायचा नाही.

तर आता पुढील आठ ते दहा मिनीटे ती कविता कशी आहे? त्या कवितेत हिला कोणत्या ओळी खुप जास्त आवडल्या? त्या कवितेला कुणी कुणी कसे (निवडक) रिप्लाय दिलेत? हिने रिप्लाय दिला का? दिला असेल तर ’मी तुला वाचून दाखवू का मी काय लिहीलं ते? ’ असं उगीच विचारणं हे ओघानं येणार होतं. आणि ते आलंही. मीही शांतपणे ऐकत होतो(as usual) आणि ती बोलेल त्याला हो, अच्छा, ओके, अरे वा अशी उत्तरं देत होतो.

तसं हे माझं नेहमीचंच. ती कसली तरी तारिफ करत असेल तर काय बोलावं हे मला बऱ्याचदा सुचत नाही. बहूतेक कुणालाच सुचत नसावं.

मग त्या कवितेवरची चर्चा झाल्यावर, जरासं अबोलीच्या फुलालर बोलण झालं. तेव्हा कळलं की सईला अबोली आवडते. आणि ठरवलं, आता भेटल्यावर अबोलीचा एक छानसा गजरा करून माळायचा हिच्या केसांत.
सगळं बोलून झाल्यावर शेवटी सई म्हटली ’तुही लिहीना अबोलीवर एखादी कविता. ’

आँफिसमधून कधी एकदा घरी जातो आणि ती कविता वाचतो असं झालं होतं आता.

आँफिसमध्ये कसातरी दिवस संपला. दिवसभर कामात असल्यामुळे त्या कवितेची अथवा अबोलीची दोघींचीही आठवण झाली नाही.

आँफिसमधून बाहेर पडलो अन घराची वाट धरली.

अन अचानक तिथेच, जिथं सकाळी फोन वाजला होता तिथं आल्यावर पुन्हा त्या फोनची, आणि अबोलीची आठवण झाली.
नजर आजुबाजुच्या गवतावर, उघड्या मैदनावर फिरायला लागली अबोलीचा शोध घेतं. कशी दिसत असेल अबोली? बरीच फुलं असतील की एखादंच फूल कुठंतरी डोकावत असेल? संध्याकाळी कशी असेल, सुकलेली असेल की अजुनही टवटवीत खुललेली असेल ही? मनात असे विचार आणि नजर इकडेतिकडे भिरभिरत घर कधी आलं ते कळलंही नाही.

मन थोडंसं जड झालं खरं, पण कारण कळेना. अबोलीचं फूल?

छे!!! काहितरीच काय? त्या फुलावरून मन का जड व्हाव? पण काहितरी कुठंतरी सलायला लागलं हे मात्र नक्की.
थोडासा मागं गेलो, सकाळी सईनं सांगितलेली ’अबोली’ आठवली. एका प्रश्नाजवळ थांबलो. या फुलाला ’अबोली’च का म्हणायंच? सारे तर्क वितर्क लढवून झाले. उत्तर सापडेना.

एव्हाना दररोज आँफिसवरून आल्यावर काहितरी खाऊन कुणी आँनलाईन असेल तर गप्पा मारण्यात अथवा एखादा चित्रपट बघण्यात मशगूल झालेला असतो. पण आज हे नेहमीचं अंगवळणी पडलेलं वळण भलतीकडेच वळण घेऊन बसलं होतं.
क्षणभर मनाशीच पुटपुटलोही की ’का शोधायचं उत्तर? काय संबंध ह्या अबोलीचा आणि माझा? का उगाचच मन जळतय या अबोलीच्या फुलापायी? ’

पण हे उत्तर नव्हतं.

पुन्हा तेच सुरू. मनाचे आरोह अवरोह सुरू झाले वेड्यासारखे. वेडीपिशी होऊन खुलणारी ही नाजुक अबोली. एकदा खुलायला लागली की खुलतच राहणार. बरं त्यातही ही खुलणार माळरानी. पाणी असो वा नसो ती आपला अल्लडपणा जपत खुलणारच.
वळवाच्या पावसात बेधुंद होऊन तिच्याच मस्तीत डुलत असते तेव्हा तिचा हलका शेंद्री, गुलाबी रंग अधिकच खुलून उठतो, गडद दिसायला लागतो.

नेहमीच टवटवीत, हसरी वाटणारी अबोली प्रत्येकालाच जवळची वाटू लागते.पावसाच्या सरिचा एखादा थेंब तिच्या एखाद्या पाकळीवर अडकून राहावा आणि सुर्याच्या एखाद्या किरणानं त्या थेंबातून आरपार डोकावून अबोलीच्या रंगावर पडावं, तेही एखाद्या माळरानी. इतकी ही सुंदर, मनमोहक अबोली. हे खरं की अबोलीच्या फुलाला म्हणावा असा गंध नाही.
पण तिच्या रंगांनी ती मन जिंकते हेही तितकंच खरं.

तिच्या वेगवेगळ्या रंगांतून, पाकळ्यांतून आपल्याशी ती हीतगूज करत असते. नेहमीच खुलणारी, डुलणारी अबोली पाहताना, तिच्या रंगांनी आपल्या मनाच रितं रितं आभाळ भरून येतं, तिला बघतच राहावसं वाटतं.

आता उमजलं, सकाळी का इतंक बोललं जात होतं अबोलीबद्दल.

पण अबोली का म्हणायचं हिला? इतके रंग, इतकी सुंदरता आहेच ना हिच्याकडे मग तरिही उगाचच का?
’अबोली’ म्हणजे त्यागाचं प्रतिक.
काहीच न बोलणारी. बरंच काही आपल्या मनाशीच दडवून बसलेली.
खोलवर कुठंतरी, मनाच्या तळाशी आपल्यातच हरवलेली.
सगळ्या जगाला दिसणारी अबोली आणि प्रत्यक्षात असणारी ’अबोली’ या दोन्ही वेगळ्या असू शकतील ना?
तिचा सालसपणा, अल्लडपणा नजरेत भरतो, मग ती ’अबोली’ का?
की खरोखरचं या नितळ, निखळ, अल्लड अबोलीत एखादी अबोल अबोली दडलेली असेल, जगापासून दूर?
खुललेली अबोली पाहिली की मन टवटवीत होतं, पण ’अबोली’ हे नाव उच्चारल की मन जड होतं. का असं?
कदाचीत कुठल्यातरी गर्तेत गुंतलेली असेलही नेहमीच ती. हे कुणा ना कळे.

’सई’ सुद्धा अशीच आहे. मनमुरादपणे खुलणाऱ्या याच ’अबोली’सारखी.

आता उमजलं ही ’अबोली’ मनाला का साद घालत होती ते.
मन अधिकच बेचैन झालं आणि पुन्हा एकदा मनाचे आरोह अवरोह सुरू झालेत.
आता अबोली मागे पडली होती, पण तीच्या नावाने मनाशी फेर धरला होता.

--शब्दसखा!