राम रामेति रामेति...

परवाच गुढीपाडवा दणक्यात साजरा झाला. या वर्षी पाडव्यानिमित्त सुट्टी मिळाल्यामुळे असेल कदाचित पण यंदा पाडव्याला सगळ्यांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. खूपच छान वाटलं. फाल्गुन संपला आणि चैत्र सुरू झाला. मला चैत्र फार आवडतो. चैत्रामध्ये मला सगळ्यात काय आवडत असेल त्या महिन्यात भरगच्च असलेले खास दिवस. आणि, आपल्यासारखाच देवांनाही उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून देवासमोर भरून ठेवायचं चांदीचं इटुकलं तांब्या-भांडं. देवावर मनुष्यत्वाचा आरोप ( म्हणजे आळ नव्हे! हा अलंकारिक आरोप आहे याची कृपया नोंद घ्यावी!! ) केल्यावर तो माणसांच्या जास्त जवळ येत असावा. लंगडा बाळकृष्ण, रामनवमी - गोकुळाष्टमीला रामकृष्णांना पाळण्यात घालून केले जाणारे त्यांच्या जन्माचे सोहळे, विठ्ठलाला लावली जाणारी चंदनाची उटी, सारसबागेतल्या गणपतीला घातलेला स्वेटर ही याची काही उदाहरणे असावीत. आपल्या श्रद्धेला अमूर्त तत्त्वापेक्षा हे सगुण साकार परब्रह्म जास्त भावतं असं दिसतंय. ( अमूर्तवादी लोकांनी निर्जीव मूर्तीमध्ये देव खरंच अस्तित्वात असतो का इ. प्रश्नांची सरबत्ती करू नये कारण जर तो चराचरात भरलेला असेल तर पाषाणाच्या मूर्तीमध्ये तो नाही असं होणारच नाही. ) या संदर्भात कुसुमाग्रजांनी कुठेतरी लिहिलेलं एक वाक्य आठवतं. "देव आहे किंवा नाही याचं उत्तर माझ्या मते तरी, ज्याला त्याची गरज आहे त्याच्यासाठी तो आहे, ज्यांना त्याची गरज नाही त्यांच्यासाठी तो नाही असं आहे" असं कुसुमाग्रज म्हणाले होते. आस्तिक लोकांचा देव आहे यावर दांडगा विश्वास असतो तर नास्तिकांचा देव नाही यावर, पण देव आहे म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय, दोघेही शेवटी देवावरच विश्वास ठेवतात ना! असा एक मार्मिक आणि मिस्कील युक्तिवादही कोणीतरी केल्याचं कानावर आलं होतं. त्या माणसाच्या चातुर्याला मात्र दाद द्यावीशी वाटली होती.

परवा काही कामानिमित्त तुळशीबागेत गेले होते. बऱ्याच वर्षांपासून कानातली - गळ्यातली - क्लिपा आणि इतर छप्पन्न गोष्टी आणायला म्हणून  आमची ये-जा तुळशीबागेपेक्षा तुळशीबागेच्या मागील बोळातच जास्त असते. त्यामुळे तुळशीबागेत गेल्यावर मला खूपच वेगळं वाटत होतं. तिथलं रामाचं देऊळ, राम - सीता - लक्ष्मणाच्या देखण्या मूर्ती, समोरचा सभामंडप आणि देवळासमोरच असलेलं हनुमंताचं इवलं देऊळ पाहूनच चित्तवृत्ती शांत झाल्या. चैत्री नवरात्रानिमित्त सगळीकडे मांडव घातलेला होता. नऊवारीतल्या आजीबाई आणि काकूबाई छापाच्या स्त्रिया अंबाड्यात सोनचाफ्याचं फूल किंवा पोनीटेलवर मोगऱ्याचा सुगंधी गजरा माळून भक्तिभावाने रामाला हात जोडत होत्या. प्रदक्षिणेचा मार्ग लोकांनी फुलून गेला होता. काहीतरी विलक्षण सात्त्विक असं तिथे दाटलं होतं. त्या समस्त स्त्रीवर्गाच्या चेहऱ्यावरचे भाव इतके प्रसन्न आणि शांत होते की, "विठ्ठलापेक्षा त्याच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या वारकऱ्याच्याच दर्शनाची मला अधिक ओढ वाटते" हे पुलंच मत आठवलं, पटलं. तितक्यात माझ्या ओळखीच्या एक आजीबाई भेटल्या. माझ्या गुरुंच्या त्या आई त्यामुळे मला लहानपणापासून ओळखतात. "काय गं तब्येत किती खराब करून घेतलीयेस! आपल्याला नाही बाबा आवडत हे असलं काही. पुढच्या वेळी मला तू चांगली जाडजूड झालेली दिसली पाहिजेस! " असं फर्मान काढून त्यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा रामरायाकडे वळवला. मला जरा हसूच आलं. अनेक दिवस सकाळी फिरायला जाऊन आणि डाएटच्या नावाखाली पोटाला चिमटे काढून जरा आटोक्यात आलेला माझा देहविस्तार ही माझी 'खराब' झालेली प्रकृती नाही हे त्यांना कसं सांगणार! त्यातून आजीची नजरच वेगळी असावी.

लालबुंद भरजरी वस्त्रं नेसवलेल्या राम - सीता - लक्ष्मणाच्या मूर्तींकडे कितीही वेळ बघत राहिलं तरी समाधान होणार नाही असं वाटत होतं. मी कितीतरी वेळ टक लावून त्यांच्याकडे बघत उभी होते. शेवटी माझ्या मागेही बरीच गर्दी ताटकळते आहे याची जाणीव झाल्यावर मात्र मी तिथून बाजूला झाले. पुजाऱ्याचा तीन चार वर्षांचा नातू मोठ्या ऐटीत बसून साखरफुटाण्यांचा प्रसाद आल्यागेल्याला देत होता. आजोबांची नक्कल करायला मिळाल्यामुळे त्याला झालेला आनंद त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यावर मावत नव्हता. माझ्याही हातावर त्याने चार साखरफुटाणे ठेवले. ठेवताना तो आतल्या रामाइतकाच सुंदर हसला. मला पटकन त्यालाच एक नमस्कार करावासा वाटला. गर्दीमधून मी प्रदक्षिणा पूर्ण केली. पुन्हा एकदा देवासमोर आले. सावळ्या रामचंद्राचं तुळशीबागेतलं रुपडं मात्र संगमरवरी आहे. मनोमन त्याची प्रार्थना करत असतानाच माझे विचार रामामागेच धावत राहिले.

राम हा तसा खूप लहानपणीच अनेक गोष्टीमधून भेटलेला देव. आकाशातला चांदोबा मागणाऱ्या रामाची गंमत वाटायची. जाड अक्षरांमध्ये छपलेलं रामायणातील गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं. त्यात, शेवटी रामाने शरयू नदीत उडी मारली आणि रामायण संपलं अशी एक गोष्ट होती. ती मला मुळीच न आवडल्याने मी ते पुस्तक वाचणारच नाहीये अशी मी आईकडे तक्रार केल्याचं आठवतंय. बाबा मला झोपवताना
पहिली माझी ओवी । दुसरा माझा नेम ॥
तुळशीखाली राम पोथी वाची ॥
ही ओवी म्हणत असत. रामायण ही दूचिवा मालिका सुरू झाल्यावर तर धमालच होती. रामासारखं धनुष्य करण्याच्या नादात मी कितीतरी खराट्याच्या काड्या मोडल्या आहेत. पण आमचा खरा हीरो होता गदाधारी हनुमान. प्लॅस्टिकची गदा तशी सुरक्षित असल्याने मनसोक्त खेळायला मिळायची. शिवाय त्या पडद्यावरच्या पुचाट रामापेक्षा अरविंद त्रिवेदींचा रावणच 'लई भारी' वाटायचा हे तेंव्हाही जाणवलं होतं. तेंव्हा राम हा धनुष्यबाण लीलया वापरत असल्यामुळे सॉलिड वाटायचा. ढिशुम ढिशुम मारामाऱ्या करणारा वाटायचा. खूप मजा वाटायची. आज मात्र राम म्हटलं की शांत, स्थिर, शाश्वत मूल्यांचा पाईक आणि कठोर खडतर कर्मवादाचा पुतळा वाटतो. तो सोळा कलांचा परमेश्वराचा पूर्णावतार आहे वगैरे गोष्टी माहीत आहेत. पण मला आदर वाटतो, भक्ती वाटते ती कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आलेल्या प्रसंगाला तोंड देत, संकटांशी दोन हात करत संस्कृतीच्या शाश्वत मूल्यांचे रक्षण करत कर्म करत राहा हा संदेश देणाऱ्या प्रभू रामचंद्राबद्दल. राम हा माझ्या मते माणूस होता आणि म्हणूनच काही चुकाही त्याने केल्या असतील( सीतात्याग!  त्या मुद्द्यावर त्याचा रागराग येतो ) पण अंगभूत गुणांनी आदर्शांनाच मानवीभूत करण्याची जी अफाट मानसिक आणि शारीरिक शक्ती त्याने वापरून दाखवली ती त्याला देवपदाला नेण्यास समर्थ आहे. बनवाबनवी, खोटेपणा, राजकारणे, दलबदलू स्वार्थ यांनी अजगरासारखा विळखा घातलेल्या आजच्या जगात रामाकडे पाहिल्यावरच आधार वाटतो. अजून रामनवमी यायची आहे. त्या दिवशी नकळत तुळशीबागेत जायची ओढ लागते कारण त्या आभाळाएवढ्या परमेश्वररूपाचं ते मनोहर बाळरूप पाहून जीव सुखावतो. आज बाप्पाचा 'हॅप्पी बर्थडे '  आहे का?  असं  आजीला विचारणाऱ्या लहान मुलीची गोष्ट आठवावी  तितका.... :)

--अदिती
(चैत्र शुद्ध ४ शके १९३१,
३० मार्च २००९)