नोव्हेंबर २००९

नशीब हे शिकलो - भाग ३४

ह्यासोबत
अक्टोबर १९८१ मी परत इराणला गेलो. ज्या कंपनी प्रमुखाने मला बाहेर फेकले त्याला तुरंगात पाठवले होते. माझ्यामुळे नाही तर त्या कंपनीत व त्या आधीच्या कंपनीत त्याने पैशाची फार मोठी अफरातफर केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या जागी नवीन प्रमुखाची नेमणूक झाली होती. त्याला जाऊन मी भेटलो, त्याने मला मशीन साझी अराक ह्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून दिली. ( अराक हे इराणच्या एका शहराचे नाव आहे, इराक नव्हे ). पण योग बघा एका महत्त्वाच्या व्यक्ती बरोबर ७२ सरकारी अधिकारी एका बॉम स्फोटात मारले गेले. १५ दिवस देश शोकाग्रस्त झाला सगळी कार्यालये बंद ठेवली होती. माझ्या वास्तव्य परवान्याची मुदत संपणार होती. नोकरीचे कागदपत्र मिळेस्तोवर चार पाच महिने लागणार होते. मी बायको मुला सोबत इराण सोडले. मुंबईत आलो.

पार्ल्यातल्या बहिणीच्या मध्यस्तीने एक जागा मिळवली. पण कराराप्रमाणे घरात चहा व इतर खाण्याचे पदार्थ बनवण्याला मनाई होती. तीनच महिने मुंबईत राहवे लागेल असा अंदाज करण्याचे तसेच कारण होते मागील भागात वर्णन केलेल्या त्या सिडनीच्या संगणक नोकरी परवान्याचे पत्र इराणच्या ऑस्ट्रेलिया दूतावासात नोकरी व वास्तव्य अर्जा सकट जोडून आधीच पाठवलेले होते. आम्हा तिघांचे पासपोर्ट, तेहरान - मुंबई - सिडनी परतीच्या तिकीटाच्या प्रती, ए.एन.झेड बॅन्क खात्यातील ३००० डॉलर तसेच ५००० डॉलर रोख हे सगळे पुरावे पण जोडले होते. महिन्याभरात निकाल समजेल असे सांगितले गेले. पण इराण सोडावे लागल्याने माझे कागदपत्र दिल्लीला पाठवले गेले. तसे मला कळवले गेले. दिल्ली कार्यालयाने सकारात्मक उत्तर दिले. ही सगळी माहिती सिडनीला भावाला पत्राने कळवली, तीन महीने लागतील असा अंदाज त्याने दिला. इथून माझे वाट बघणे सुरू झाले.

बायकोला फक्त १ महिन्याचा वास्तव्य परवाना मिळाला होता त्याचे नविनी करणं करण्याची वेळ आली. पार्ले ते फलटण रोड पोलिस ठाणे ते सचिवालय आणि तसेच परत हा प्रवास मी, बायको व ४ महिन्याचा मुलगा असा करावा लागला. प्रत्येक ठिकाणी चाय पाणी , टेबलाचे खण असा एकूण २००० रुपयाचा फटका बसला. आज ते दिवस आठवतात तेव्हा हसावे का रडावे कळत नाही. सकाळी तोंड धुतल्या पासून चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण सगळे हॉटेल मध्ये होते. मोठ्या भावाने शिकवल्याने बहिणीला त्रास देणे टाळले होते. लहान मुलाचे दूध शेजारी नव्याने ओळख झालेली बायकोची मैत्रीण तापवून देत असे. १० महिने कसे संपले कळलेच नाही. बायकोचा वास्तव्य परवाना दर महिन्याला बदलणे आवश्यक होते २०,००० उडाले होते. त्यात आर.बी.आय. च्या एका महाभागाने माझे परकीय चलन भारतीय झाल्याचा धक्का दिला.    

बायकोच्या वास्तव्य परवान्याच्या ११व्या नविनी करणं भेटीत सचिवालयात माझे संबंधित कागद घेण्याकरता वाट बघत उभा होतो. त्या कार्यालयातील लेखनिक बायका हॅन्डलूम हाउसच्या साडी सेल ला जाण्याच्या गडबडीत होत्या. मी दोन-चार वेळा त्यांना माझ्या कागदांची विचारणी केली, एक रागाने खिडकीशी येऊन खेकसली " काय हवे आहे, कशाला डोकं पिकवताय ? "  मी - "माझी फाइल साहेबाला हवी आहे, त्यांनी मला घेण्या करता पाठवले आहे"  ति - " तुम्हाला मुंबईत मुली मिळाल्या नाहीत, परदेशात जाऊन घेऊन आलात, आमच्या डोक्याला ताप." मी - " चूक तुमची आहे तुमच्या कपाळावर लग्नाला तयार आहे लेबल नव्हते, विचार केला असता."  ति - " तुमच्या जिभेला काही हाड, ओ हवालदार घाला बेड्या ह्याला."  हवालदाराला चाय पाणी मिळाले होते " ओ मुकाट ह्यांची फाइल द्या, काम सोडून साडी सेल ला निघालात."  आतील अधिकारी बदललेला होता. त्याने पासपोर्ट व अर्ज बघून आम्हाला एक गोड पण चीड आणणारी बातमी दिली. मी भारतीय नागरिक असल्याने माझ्या बायकोला दोन वर्ष वास्तव्य परवाना कायद्यानेच मिळतो तो त्याने दिला. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी पण बदललेला होता. पण दोन वर्षाचा परवाना २००० रुपयात मिळाला होता.

ह्या प्रसंगाने माझ्या डोक्यात वीज चमकली, मी जागा झालो, घडणार्‍या प्रसंगांचे अर्थ समजणे सुरू झाले. नातेवाईक, बाहेरचे सगळे माझे खेळ करण्यात मग्न होते. नोकरी शोध नव्याने सुरू झाला. नोकर्‍या होत्या, माझा अनुभव हवा होता त्याचा मोबदला मात्र २५००च्या वर कोणी देण्यास तयार नव्हते. १९८३ योगायोग, मस्कत ओमानला नोकरी मिळाली. बायकोला पुण्यात भाड्याची एका खोलीची जागा मिळवली. मी ओमानला गेलो - नशीब हे शिकलो - भाग ३५ 


लेख माला मस्तच..

Typing help hide