अवतार

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....
खरंतर जगाचे सगळे रेकॉर्डस त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला
काहीही अप्रूप नाही....... डेक्कन क्वीन फुल स्पीडने डोंबिवली स्टेशनवर
येत असते.... त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो.... गाडी आली तेव्हाच हा
रेस सुरू करतो.... आणि पळत सुटतो.... गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी
ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढून.... दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथून
धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफॉर्म पार करून.... खाली रुळावर उतरतो आणि
डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

सांगा आता हा
मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणूस नाही का? पण दिखाऊपणा त्याला अजिबात
आवडतच नाही.... तो धावता धावता तीन तासात डोंबिवलीहून पुण्याला सहज
जातो... आरामात... आणि फुकटात.... घाम येऊन त्याचे कपडे खराब होतील
असंही नाही.

एकदा त्याने शंभर दिवसांचा उपवास ठेवला होता... तीन
महिने अन्न-पाण्यावाचून राहिला... आणि एकदा एका लग्नाला बुफे जेवणाच्या
वेळी तो तीन तास जेवत होता.... शेवटी सगळं संपलं म्हणून थांबला.

त्याला
जगातल्या सगळ्या भाषा अवगत आहेत... तो नुसताच बोलू शकत नाही तर प्रत्येक
भाषेच्या साहित्यावर लेक्चर देऊ शकतो. कुठलाही अंक त्याने एकदा पाहिला की
तो विसरत नाही. त्याला संपूर्ण लॉग टेबल पाठ आहे १३ डिजीटस पर्यंत.

तो अनेकदा माउंट एव्हरेस्टवर जाऊन आलाय.... जाऊन काय म्हणायचं... त्याच्या शिखरावरून खाली येताना तो धावत धावत आलाय.

खरंतर
कलियुगात झालेला कल्की अवतार तो हाच. पण मला सोडून कोणालाही ते कळलेले
नाहीये. जगात असलेला त्याचा एकमेव मित्र... म्हणजे मी. त्याच्याकडे
इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की त्याला मित्र जमवायला वेळच मिळत नाही.
अवतार असला तर काय झालं.... काळाची बंधनं त्याला मनुष्यरूपात पाळावीच
लागतात.

पण ह्या अवतारामध्ये कल्कीला नक्की काय करायचं आहे हे
अद्याप कळलेलंच नाहीये. त्याला मी अनेकदा विचारायचा प्रयत्न केला.. पण
म्हणतो की खरंच त्याला कळलेलं नाहीये. त्याच्यामते तो जे ही करेल त्याने
मनुष्यजातीचा उद्धारच होईल.

त्याच्याशी मी नेहमी चर्चा करतो...
समाजाच्या अवनीतीबद्दल... भ्रष्टाचाराबद्दल... तो ऐकल्यासारखं करतो आणि
लगेच विषय बदलतो. नीतिमूल्यांचे अवमूल्यन हा जणू त्याच्यासाठी प्रश्नच
नाही. द्वापारयुगात अर्जुनाला गीता सांगतली, विश्वाचं रहस्य त्याच्यासमोर
उलगडलं तसंच कधीतरी मलाही काही उपदेशाचे बोल ऐकायला मिळतील ह्या अपेक्षेत
मी नेहमीच असतो. पण त्याच्या विचारांमध्ये प्रगल्भता अशी कधी नसतेच. जे
असते ते फक्त अचाट सामर्थ्याचे प्रदर्शन.

त्या दिवशी तो घरी आला. आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता कंटाळा आला म्हणून म्हटलं की चला जरा लॉग ड्राइव्हला जाऊन येऊ.

तो
गाडी चालवत होता.. मी बाजूला बसलो होतो. अचानक समोरून एक ट्रक भरधाव
आला.... अपघात अटळ होता... मरण निश्चित दिसू लागले... पण तेव्हढ्यात
कल्कीने गाडी अक्षरशः हवेत उंच उडवली आणि ट्रकच्या वरून आम्ही पुन्हा
रस्त्यावर आलो. फक्त काही क्षणांतच मरणाच्या दारात जाऊन परतल्यासारखे वाटत
होते... हृदयाची स्पंदने वाढली होती... घाम फुटला होता. कल्की ने
रस्त्याच्या बाजूला नेऊन गाडी थांबवली. गाडीत असलेली पाण्याची बाटली मला
दिली. पाणी पिऊन थोडं बरं वाटलं. एक कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात दाटून
आला होता.. कल्कीचे मी आभार मानू लागलो. खरंतर खूप औपचारिकता शब्दांमध्ये
जाणवत होती.... पण मला ते बोलावेसे वाटत होते.

"आज तू जर नसतास,
तर माझी दुनियेतून गच्छंती अटळ होती. तुझे आभार मानावेत तेव्हढे कमीच.
खरं सांग तू माझ्यावर इतका कृपादृष्टी ठेवून का आहेस? जगात तुला दुसरा
मित्र मिळालाच नाही कधी? "

"गप रे... फालतू मध्ये सेंटी नको मारूस.
कृपादृष्टी, आभार... कसले मोठे मोठे शब्द वापरतोस रे. आणि आपली मैत्री
काय मी निवडली आहे? आपण शेजारी... तुझ्यानंतर १५ दिवसांनी मी जन्मलो,
एकत्रच वाढलो... एकत्र खेळलो.. दुसरं कधी होतंच कोण?

"कोणीही
नव्हतं? शाळा, कॉलेज, शेजारपाजारचे इतकी मुलं... कोणाशीच मैत्री
करावीशी वाटली नाही? बघावं तेव्हा आपल्या दुनियेत. आज ह्या झाडावरून उडी
घेतली... उद्या कारबरोबर धावायची स्पर्धा केलीस.. तुझं काहीतरी वेगळंच
असायचं"

"बरं मग? मला त्यातच मजा वाटते.. मी काय करणार? "

"खरं सांगू? तुझ्या बोलण्यावरून कधीही तू अवतारी पुरुष वाटत नाहीस. अचाट ताकदीचा स्टंटमॅन वाटतो. "

"बरं.. मग? "

"मग काय? तू मलाच का सांगितलंस की तूच तो अवतारपुरुष कल्की आहे? खरं सांग. प्लीज"

"कसला
चिवट आहेस रे तू.. मी तुला सांगितलं कारण तू मला सगळ्यात जवळचा आहेस आणि
तू हे कोणाला सांगणार नाहीस म्हणून. माझ्या शक्ती मी तुझ्यापासून लपवू
नाही शकलो कधी. "

"पण तुझ्या शक्तींचा उपयोग काय? कार डीलरशिप मध्ये सेल्स मॅनेजरची नोकरी करण्यात तुला आयुष्य वाया घालवायचं आहे का? "

"पोटापाण्यासाठी करावंच लागतं.... आणि शक्तीचा उपयोग म्हटलंस तर आताच वाचवलंय मी आपल्या दोघांना"

"अरे पण इतके लोकं आहेत जगात... गरिबीने पिचलेले, इतके शोषित समाज आहेत. त्यांना काय उपयोग तुझ्या शक्तीचा? "

"किती वेळा हा प्रश्न विचारणार आहेस? "

"जोवर तू उत्तर देत नाहीस तोवर... आणि असली सामान्यांसारखी उत्तरं देऊ नकोस... तूच होतास ना गीता सांगणारा? "

"मग काय तुला पुन्हा गीता ऐकवू? "

"नाही... तू फक्त माझ्या प्रश्नांच उत्तर दे. "

"तर
ऐक मग... तुला जे जग दिसतं ते मला दिसत नाही. आपल्या जाणिवा वेगळ्या
आहेत. ज्या ऐहिक दृष्टिकोनातून सुख-दुःख बघतोस तो मला हास्यास्पद वाटतो.
कोणी गरीब म्हणून तो दुःखी असं मला वाटत नाही. "

"हे तर नुसते
शब्दांचे बुडबुडे आहेत... ज्याला दिवसरात्र काबाडकष्ट करून पोटभर खाताही
येत नाही अशी लोकं एकीकडे... आणि ज्यांना जेवण पचत नाही म्हणून डायट
कंट्रोल करणारी लोकं दुसरीकडे... असं का? " माझ्यातला समाजवादी जागा झाला
होता.

"बरं... मग तुला काय वाटतं? मी प्रत्येकाच्या पोटापाण्याची
व्यवस्था करावी? अरे जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हवा, पाणी
ह्यांचा प्रबंध केलाच ना? स्वतःचे अन्न मिळवावे म्हणून थोडे कष्ट पडले तर
मला दोष? "

"प्रश्न नुसत्या अन्न-पाण्याचा नाहीये. श्रमप्रतिष्ठेचा
पण आहे. मरमर कष्ट करणारा कष्टकरी... त्याची समाजात काय प्रतिष्ठा असते?
लाचारीचं जीवन असतं त्याचं. "

"प्रतिष्ठा, लाचारी वगैरे गोष्टी
तुम्ही मानवांनी निर्माण केल्यात.... आणि त्यात स्वतःला गुरफटवून घेतलंय..
त्यात माझी काय चूक? " प्रथमच काहीतरी गूढ अर्थ असल्यागत कल्की
बोलल्याचे मला जाणवले.

"बरं मग एक सांग.... तुला स्वतःला असं अपमानास्पद आयुष्य चालेल? "

"अपमानास्पद?
हा शब्द मला लागूच होत नाही. पुन्हा सांगतो ह्या गोष्टी तुम्ही निर्माण
केल्यायत. आणि तुम्हाला त्या करता येतात ह्याचं स्वातंत्र्यच मुळात मी
दिलंय. नवनिर्मितीचं स्वातंत्र्य मी मनुष्याला सर्वाधिक दिलंय. त्याचा
बरावाईट उपयोग करणं हे तुमच्या हाती आहे... त्यातूनही सृष्टीचा तोल ढळला
मी अवतार घेतोच सगळं ठीक करायला. मुळात तू जो विचार करतोयेस ना...
तोसुद्धा माझ्याच निर्मितीचा आविष्कार आहे. मनुष्य ही माझी सर्वोत्कृष्ट
निर्मिती आहे. "

"एक साधी गोष्ट आहे... तू काहींना खूप दिलंस आणि
काहींना काहीही नाही. मेळघाटात कुपोषणाने बळी जातोय... इथे शहरांमध्ये
खाऊन खाऊन लोकं माजलेत. हा पण तुझ्या नवनिर्मितीचा आविष्कार म्हणायचा की
काय? "

"मी दिलं? "

"काही श्रीमंत घरात जन्म घेतात, काही गरीब घरात... काहींना जन्मतः अपंगत्व असतं... हे कशामुळे? "

"हे
बघ, मी फक्त ह्या सृष्टीचा रचनाकार आहे. मी फक्त प्रक्रिया बनवल्या आहेत
ज्यामुळे ही सृष्टी टिकून राहील. जन्म-मृत्यू हा त्या प्रक्रियेचाच एक
भाग आहे. त्या प्रक्रियेमध्ये काय होतं ह्यात मी तोवर ढवळाढवळ करत नाही
जोवर माझ्या सृष्टीला धोका निर्माण होत नाही. गरीब श्रीमंत ह्या
मानवनिर्मित गोष्टी आहेत. अपंगत्वाबद्दल म्हणशील तर जीव जन्माला
येण्याच्या प्रक्रियेतही काही अपघात होऊ शकतात, त्यामुळे तसं होऊ शकतं..
जन्माला आल्यानंतर जसे लोकं अपघाताने अपंग होतात, तसाच हा काहीसा प्रकार
आहे. "

"आमच्या जीवनात ये काही होतं त्यावर तुझं काहीही नियंत्रण नाही असं म्हणायचंय तुला? "

"अर्थात...
काहीही नियंत्रण नाही. मी सृष्टीची निर्मिती करतानाच अशी योजना केलीय की
सृष्टीतले प्रत्येक सजीव, निर्जीव, वातावरण हे एकमेकांना पूरक ठरून
सृष्टी टिकवून ठेवतील. मानव हा ह्या सृष्टीत निर्माण केलेला निर्मितिक्षम
जीव. मी पुन्हा सांगतो सृष्टीला धोका निर्माण झाल्यावरच मी ढवळाढवळ करतो"

"तूच
म्हणतोस ना... की मानव निर्मितिक्षम आहे? हो आहोत आम्ही निर्मितिक्षम...
आम्हीच कदाचित आमच्या जीवनात नवनवे प्रश्न निर्माण केले आहेत. सुख-दुःख
सगळे आम्हीच आमच्या जीवनात निर्माण केलेत. आम्ही आमच्या मायावी जगात
जगतोय. पण त्या जगाला ठीक करायची क्षमता आमच्यात नाही ना.. आम्ही
अतिमानवी शक्ती घेऊन अवतार नाही ना घेऊ शकत. ह्या आम्हीच निर्मिलेल्या
आमच्या समाज-जीवनाला सुधारावयाची क्षमता आमच्यात कुठे दिलीस तू? "

"तुला
काय वाटतं? मार्क्स, गांधी कसे निर्माण होतात? तुमच्यातूनच एखादा उठतो
आणि सुधार आणतोच ना? मार्क्स-गांधी निर्माण मी नाही करत. तुमच्याच
समाजातून ते निर्माण होतात. तुमच्याकडे क्षमता सगळ्या आहेत, फक्त
काहींनाच त्याची जाणीव होते, काहींनाच नेमकं काय चाललंय ते कळते आणि ते
तुमच्या जगाला सुखकर बनवायचा प्रयत्न करतात. "

"म्हणजे आम्ही नेहमीच कुठल्यातरी गांधीची वाट पाहत राहायची... नाही का? "

"तेच
तर म्हणतोय मी... तुमच्या प्रत्येकात गांधी बनायची क्षमता मी दिलेली आहे.
तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बना. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.
"

"बरं मग तुझं अवतार प्रयोजन काय? मला तर वाटायला लागलंय की देवही आता आमच्या मदतीला येणार नाही. "

"माझ्या अवताराचं प्रयोजन? मी मानवजातीच्या उद्धाराला आलेलो नाहीये. धर्माच्या उद्धारासाठी आलोय?

"धर्म मानवनिर्मित नाहीये? "

"धर्म म्हणजे तुला काय वाटतं? "

"धर्म म्हणजे नीती-संस्कार-अध्यात्म-नियम"

"वरवर पाहता हे तसंच वाटतं... पण ह्यांचा उगम कुठे आहे? "

"कुठे म्हणजे? आमच्या मानव-समाजात लोकांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहावे म्हणून आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ह्या"

"हेच
सगळे तुमचे भ्रम असतात. धर्म ही मानवनिर्मित गोष्ट नाही. मानवच काय ह्या
सृष्टीतली प्रत्येक गोष्ट सृष्टीच्या नियमांना बांधील आहे. ती तशी राहावी
ह्याचा प्रबंध मी आधीच केलेला आहे. त्या प्रेरणा मी प्रत्येक
सजीव-निर्जीवामध्ये टाकलेल्या आहेत. आणि त्या प्रेरणेतूनच धर्माचा उदय
होतो. पण मानव ती प्रेरणा विसरत चाललेत... किंबहुना आपल्या नव्या जगात
इतके गुरफटलेत की त्या प्रेरणा त्यांना महत्त्वाच्या नाही वाटत. त्यातूनच
सृष्टीचा तोल ढळलाय"

"हे जरा विनोदी वाटतंय... इतकी मोठी सृष्टी...
इतके ग्रह-तारे.. मानवाला ह्या विश्वात स्थान तरी आहे का? तुझ्या
सृष्टीचं रूपं पाहिल्यावर किती खुजेपणा जाणवतो हे तुला नाही कळायचं...
मानवामुळे सृष्टी धोक्यात येऊच शकत नाही... फारफार तर पृथ्वी धोक्यात
येईल... आणि त्यामुळे काही फरक पडेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही आधीही
नव्हतो आणि नंतरही कदाचित नसू. सृष्टी तर चालतच राहील"

"तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? "

"असं कशावरून? "

"मी
म्हणतोय की मनुष्य माझी सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे आणि तू म्हणतोस की
मनुष्यावाचून सृष्टी चालेल? अरे हे जे ग्रह-तारे दिसताहेत ना तुला...
त्या सगळ्यांच्या प्रभावातून मी पृथ्वी आणि त्यावरील मनुष्यसृष्टी निर्माण
केलीय. ह्या पृथ्वीला नष्ट करू देईल मी? "

"मग तू काय करायचं ठरवलं आहेस? तुझं अवतार-कार्य काय? "

"माझं अवतार कार्य? ऐकायची हिंमत आहे? "

"हो.. सांग"

"मनुष्यजातीचा अंत. "

"काय? आताच तर तू म्हणालास की तुझी सर्वोत्कृष्ट निर्मिती? "

"हो..
आजवरची सर्वोत्कृष्ट.. पण यापुढे यापेक्षा चांगली निर्मिती होणार नाही
असं नाही. मानवी समाजाचा अंत हेच माझं कार्य... एका नवीन जीवाचा उदय
व्हायची वेळ आहे ही. "

"मग? तो जीव निर्माण झालाय? कुठे आहे? "

"मीच
तो. तुला मी अमानवी वाटतोय ना? आहेच मुळात... माझ्यात अनेक अमानवी
शक्ती आहेत.. माझे अवतारकार्य फक्त त्या शक्तींची चाचपणी करणे एव्हढंच
आहे. "

"म्हणजे आमचा अंत जवळ आहे तर. "

"हो.. अर्थात
त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्हीच आपापसात
लढून मराल. पण त्याआधी तुमच्या मारामाऱ्यांना पुरून उरेल असे सजीव सृष्टीत
निर्माण करायला हवा. "

"म्हणून त्या नवीन जीवाला इतक्या शक्ती दिल्यात तर"

"फक्त
तेच एक कारण नाहीये... मानवाला मी थोडे दुर्बल बनवले होते... तो
सृष्टीवर खूप अवलंबून होता... पण आपल्या अस्तित्वासाठी मग तो सृष्टीचेच
लचके तोडू लागला. नवा जीव शक्तिशाली असेल. त्याला स्वतःच्या
अस्तित्वासाठी सृष्टीला ओरबाडावे लागणार नाही. "

"आता ह्यावर काय म्हणावं याला मी? आमच्याकडे किती वेळ आहे? "

"वेळ?
मी आधीच सांगितलंय की तुम्ही आपापसातच लढून मराल... त्याला जितका विलंब
करता येईल ते तुमच्या हातात आहे. मी तुमच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही. "

"ठीक आहे तर मग... चल परत जाऊ... घरी जाऊन निवांत मरायची वाट पाहतो मी"

"पाहिलंस? सत्य जाणून घ्यायची तुला किती उत्सुकता होती? पण सत्याला सामोरे गेल्यावर कसा हिरमोड झाला तुझा. "

"हिरमोड
होणारच ना? जगात एकाच शक्तीवर विश्वास होता... तोही उडालाय आज. दुःख
आमच्या विनाशाचं नाहीये. तूच निर्माण केलं आहेस, तूच जीवन दिलंस..
आम्हाला संपवायचा अधिकारही तुलाच आहे. पण आम्हाला आमच्यातच लढून मारायचा
काय अर्थ? "

"कारण एकच.. मी आणि माझ्यापासून निर्माण होणाऱ्या
नव्या जीवांच्या समोर उदाहरण असावं.. कसं जगू नये ह्याची माहिती त्यांना
प्रत्यक्ष व्हावी. नाहीतर मानवांसारखे तेही वेद कोणी लिहिलेत ह्यावरून
मारामारी करायचे"

"उपरोध ध्यानात आलाय.. गाडी वळव कल्की... घरी जाऊयात"

कल्कीने
गाडी वळवली. परत जाताना मी शांत बसून होतो. काही बोलायची इच्छाच होत
नव्हती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. आज कल्की बरोबर गेलोच नसतो
तर बरं झालं असतं असं मला वाटलं.. कल्की कडून खूप अपेक्षा होत्या मला...
सगळ्यांनाच तडा गेला... महाभारतातल्या कृष्णार्जुनाप्रमाणे कल्की आणि माझी
मैत्री आहे असं मला वाटायचं... मीच त्याचा एकमेव मित्र होतो. पण तो मला
आणि माझ्या भाऊबंधाच्या मदतीसाठी आलेलाच नव्हता. उलट आमचा विनाश व्हायची
वाट पाहत होता.

पण शेवटी पर्याय नव्हताच. मानवी विनाश टाळायला आता पुन्हा गांधी जन्मणे शक्य नव्हते.

कल्कीला माझ्या मनात काय चाललंय याची पुरेपूर माहिती होती. तो म्हणाला

"दुसऱ्या महायुद्धानंतर... ज्या दिवशी गांधीहत्या झाली.... त्या दिवशीच मी हा निर्णय घेतला होता"