जातीयवाद कसा कमी होईल?

मित्रहो जातीयवाद होण्याची बरीचशी कारणे आहेत, कोणीही त्यांच्या धर्माने, जातीने किंवा पंथाने जसे सांगितले आहे तसे वागले तर जातीयवाद निर्माण होत नाही. माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही की ते सोडून दुसरे वाईट आहे. सांगायचे झाले तर बरेच भारतीय सणवार हे सर्व धर्म मिळून साजरे करतात. यामध्ये कुठेही जातीयवाद येत नाही. आताच्या घडीला जातीयवाद हा वेगळ्या कारणामुळे होतो. माझ्या परीने मी त्याचे विश्लेषण केले आहे. माझे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

1. राजकारणामुळे जातीयवादाला खतपाणी घातला जाते. मतांच्या राजकारणासाठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घ्यायचे काम सध्या चालू आहे.

2. आपली न्यायिक व्यवस्थेमध्येही काही जातींना हुकते माप दिल्या गेले. खरे तर हे कायदे त्या जातींना संरक्षण म्हणून अस्तित्वात आले, पण आज त्याच दुरुपयोग होतो आहे. त्याचा मोठा परिणाम यावर होतो.

3. आरक्षण हा पण एक मोठा मुद्दा आहे.

4. दुसऱ्या धर्म, जाती बद्दल समाजात द्वेष पसरवणे.

वरील मुद्द्यावर काही उपाय

1. सध्या राजकीय फायदा उठवण्यासाठी सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने समाजात तेढ निर्माण करून आपल्या आपल्यात भांडणे लावत आहेत. यातून आपला समाज विखुरला जात आहे. बरेच असे पक्ष आहेत की जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेऊन स्वतः अश्या प्रकारचे राजकारण करत आहेत. आपल्याला सर्व राजकीय पक्षांना ठणकावून सांगायची वेळ आली आहे की तुम्ही जे याचे राजकारण करत आहात ते थांबवा अन्यथा सामान्य माणूस तुम्हाला जगू देणार नाही. याचा सर्वात मोठा तोटा हा सामान्य माणसाला होतो, कारण जे मोठे लोक असतात जे अश्या प्रकारचे आदेश देतात त्यांना काहीही तोटा होत नाही त्यांना राजकीय अभय मिळते व जो सामान्य नागरिक असतो त्याचा यात बळी जातो.

2. आपली न्यायिक व्यवस्थेत काही काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. सर्व जाती आणि धर्म यांना एकच न्याय लागू करावा.

3. आरक्षण हा ही एक मोठा मुद्दा होतो, कारण ज्याला चांगले मार्क्स असूनही तो बऱ्याच वेळा पात्र होत नाही पण जो जेमतेम पास झाला आहे तो मात्र पात्र ठरतो. यामुळे त्या गुणी विद्यार्थ्याची मानसिकता ढासळते आणि तो अश्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करतो त्यातून हा तेढ अजून वाढत जातो. काहीवेळा जे विद्यार्थी खरोखरच खूप गुणी आहेत पण जे खालच्या जातीचे आहेत हे त्यांच्या आरक्षित जागा आहेत त्याचा वापर न करता खुल्या जागा आहेत त्याचा वापर करतात व खुल्या जागांमधील जागा कमी होतात, त्यामुळेही खुल्या वर्गातले लोक बाकीच्या लोकांबद्दल वाईट बोलू लागतात व त्यातून तेढ निर्माण होते. काही लोक ज्यांना आरक्षण आहे आणि सरकार त्यांचा संपूर्ण खर्च उचलते म्हणून पुढील शिक्षण घेतात, ते याचा तीळमात्रही उपयोग करून घेत नाहीत त्यामुळे आरक्षणामुळे खुला वर्ग आणि आरक्षित वर्ग असे गट पडत चालले आहेत.

4. दुसऱ्या धर्म, जाती, पंथ यांना शिव्या देणे यामुळे जातीय तणावाचे वातावरण तयार होते आणि यातून समाजात फूट पडते. यातूनच ज्यांचा मनातही दुसऱ्या बद्दल द्वेषाची कल्पना देखील नसते त्यांचीही मानसिकता बदलते. त्यामुळे ही तेढ वाढतच जाते.

कृपया यावर थोडा विचार करा, आणि देशाला एकत्र करून गुण्यागोविंदाने राहण्यासाठी काहीतरी पाऊल आपल्या आपल्या परीने उचला. तसेच  जर हे मुद्दे तुम्हाला पटले तर ही पोस्ट नक्की शेअर करा......

टीप हे माझे वैयक्तिक मत आहे, वस्तुस्थिती वेगळी असू शकते.

धन्यवाद,

प्रजोत कुलकर्णी