परत मी एकटा...माझ्या एकट्या मनाबरोबर...

२४/०६/२००७, वेळ संध्याकाळ

आज ऑफिसमधून जरा लवकर बाहेर पडलो ,आजची संध्याकाळ थोडी जरा वेगळीच वाटली .
पावसाची रिमझिम सुरू झाली होती ,लोकांची घरी जायची लगबग दिसत होती, मी हि
नेहमी प्रमाणे बस स्टॉप कडे वळलो . पण मन काही घरी जायच्या बेतात दिसत
नव्हत.

काय हे रोजच झालाय मशीन प्रमाणे आपण जगतोय . ठरलेले वेळेत
ऑफिसला पोहचायचे आणी उशिरा पर्यंत काम करून घरी परतायचे . पण आज नाही,
आज थोडे थांबायचे . आज थोड्यावेळ का होईना स्वतःचे लाईफ जगायचे . ठीक आहे , मी हि माझ्या मनाचे ऐकायचे ठरवले….

मागे वळलो , समोर बरीष्टा दिसले , वाटले जावं आणि एक कॉफी मागवावी … पण
तिथे पैशाचा दिखाव्यापुढे मन रमायचे नाही… मग पलीकडे तिकडे चहाची टपरी
दिसली,चला तिकडे पोचलो …. वाटलं मित्रांना फोन करवा …पाहू कोण येतंय का??
नको तीच परत ठरलेली कारण । "नाही रे अजून ऑफिसमध्येच आहे ,खूप काम आहे " …
जाऊ देत… एक चहा चा कप उचलला , खिशात वाजणारी चिल्लर शांत केली .
साडेपाच फुटाचा माणूस पावसापासून वाचेन एवढ्या आडोशाला जाऊन उभा राहिलो.
पण तरीही मला हरवायचे असे काय त्या पावसाने ठरवले होते , पावसाचा एक थेंब
चहाच्या कपात …. त्यानंतर अजून एक… दोन थेंब … मी हि हसलो … वा चाय में
बारीश की मिलावट … एकदम natural tea …

मनही हसलं … का रे आज तुला
मित्रांची आठवण नाही का येत ?? मी हि थोडा सावरतच , अस अचानक ह्याला काय
झाले … नाही … म्हणजे हो … पण मित्र , मित्र ह्या साठीच असतात ना रे ? आठवण
होऊन राहण्यासाठी , मग त्यांची आठवण तर येणारच … मनाला म्हणालो नाही रे ,
नाही जमत आता पहिल्या सारखं मित्र मित्र करायला . प्रत्येकाला स्वप्नाचे
आकाश आहे , ते मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या पंखांत धडपड आहे. मग आपण करे ,
आपल्या मैत्रीचे घुबड त्यांच्या वाटेत आणायचे? चार पावले मागे गेले तर खूप
काही छान होते रे. कुणाला आवडणार नाही ते बालपण आणि कालचे कॉलेज लाईफ, आणि
कट्ट्यावरचे भांडण , अरे "वेळेला" नसतो कोणी मित्र ,बघना "वेळेला" मित्र असता
तर तो नसता का थांबला क्षणभर ? हो हो मित्र हे आठवणी पुरते छान वाटतात.
वाटले की पण पालटायचे , आठवणीत क्षणभर रमायचे आणि परत आपापल्या कामाला
निघायचे…

मन म्हणाले खोटं , साफ खोटं , "आयुष्य हे असेच असते ",
अस म्हणून आपण स्वतःलाच किती आणि कितीदा फसवायचे ? मी काय उत्तर देणार …परत
एकदा चहाच्या कपात एक थेंब पडला… मी म्हणालो बस… दुसरा थेंब नाही…
पावसासारखे आपण बरसायचे नाही… मन मात्र माझे हसले… मिळाले उत्तर.

शेजारी बस स्टॉपवर बस उभी होती , बस झालं , हि शेवटची बस आहे ,
निघायलाच हवे , बसमध्ये चढलो , परत मी एकटा… माझ्या एकट्या मनाबरोबर …

सुयोग काळे ,
suyog.kale@gmail.com