श्रद्धा की अंधश्रद्धा ?

नुकताच PK  सिनेमा पहिला. म्हणाला तर तसे फार काही वेगळे दाखवले नाही किंबहुना आपले अनिंसवाले दाभोलकर आणि बरेच सुधारणावादी लोक पूर्वी पासून काही वेगळे सांगतात असे नाही वाटले. मराठीतला देऊळ काय किंवा हिंदी मधला OMG काय तेच संदेश देणारे चित्रपट होते - भोंदूगिरी पासून सावधान. मग याचाच इतका गोंधळ का? जाहिरातबाजीचा प्रकार हा भाग वगळता, मला वाटते एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की गोंधळ होतो, म्हणजे संदेश द्या पण एकाच धर्म बद्दल तेच तेच सांगून काय वेगळे मिळवणार आहेत हे लोक? 
हिंदू धर्मात अंधश्रद्धा होती आणि आहे, पण मग ती इतर धर्मात नाही का? दर्गे, बाबा , saint सगळ्याच धर्मात असतात मग एकाच धर्मावर हा संदेशाचा मारा का ? जसा मुस्लिम धर्म हा शांती प्रिय आहे आणि प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी नसतो असे खुबीने सांगितले जाते तसेच प्रत्येक हिंदू हा अंधश्रद्धाळू नसतो आणि तो सिनेमात दाखवले तासाला अंधश्रद्धाळूपणा नाही करत. 
जसे "मुस्लिम = अतिरेकी " तसेच  "हिंदू = अंधश्रद्धाळू" हे सारखे दाखवून काय सिद्ध करणार आहेत? त्यातून काही उपाय सुचवला तर ठीक नाही तर अश्या बातम्या आणि उपदेशाच्या अतिरेकाने देशाने फक्त दंगेच वाढतील.
सिनेमा वाल्याचे ठीक आहे यातून त्यांचा आर्थिक फायदा तरी होतो आहे, पण आपल्या सारख्याचे काय ? याचा विचार आपणच केला पाहिजे? 
खरे सांगा आपल्या पैकी किती जण मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर दूध वाहतात ? कमीच पण आपण टीका करायला मोकळे की तेच दूध एका गरिबाला मिळाले तर पोट भरेल. आता मला सांगा तिकडे दूध नाही दिले आणि खरेच एखाद्या गरिबाला दूध दिले असे तरी कोणी केले आहे का? म्हणजे मंदिरात जाणार नाही कारण अंधश्रद्धा आणि गरिबांना दूध दिले नाही कारण ... काय तसा करायला जमलेच नाही. म्हणजे कृती पेक्षा आपली टीकाच जास्त :)
बरं अजून एक - अर्थात मी या प्रकारच्या दान धर्माचा समर्थक नाही पण मुद्दा सांगण्यासाठी एक उदाहरण... मंदिरा बाहेर उपाशी भिकारी बसलेले असतात  (खरेच ते उपाशी आणि पैशाने भिकारी असतात का हा वादाचा मुद्दा ... का उगीच फुकट खायला मिळते म्हणून आलेले धडधाकट लोक असतात त्यावर एक वेगळा लेख होईल) आणि मंदिरात दूध , अन्न वाया जाते अशी तक्रार असते. त्यातले अन्न वाया जाते हे खरे पण याचा अर्थ ते मंदिर फसवते आहे कसा ? किंवा त्यातला देव हा खोटा आहे आणि त्याच्या उपाशी मुलांसाठी काम करत नाही कसा?  मी तर म्हणतो उलट त्या मंदिरामुळे का होईना लोक बाहेरच्या भिकाऱ्यांना काही तरी देतात - देण्याची भावना निर्माण होते. सत्पात्री दान हेच खरे दान - मग ते "सत् - पात्र" कोण हे शोधता न आल्या मुळे लोक ते दान मंदिरात देतात किंवा देत असावेत ... 
माझ्या दृष्टीने - कोर्टा बाहेर, आज न्याय मिळेल म्हणून फिरणारा अशील , सरकारी दवाखान्या बाहेर उपचारासाठी वाट पाहत पडलेला आजारी गरीब आणि मंदिरा बाहेर काही दान / अन्न मिळेल म्हणून बसलेला गरीब / भिकारी किंवा सरकारी/राजकीय पक्ष्याच्या कार्यालय बाहेर फिरणाऱ्या कार्यकर्त्याची सगळ्याची भावना एकाच- आज माझे काहीतरी भले होईल. आता प्रत्येकाला न्याय / उपचार / अन्न  संधी नाही मिळाले /मिळाली म्हणून ती संस्था उपयोग शून्य होत नाही. तो श्रद्धेचा आणि मानण्या - न मानण्याचा भाग आहे.
चकाचक मंदिराला पाहून नाक मुरडणारे लोक हे "लोक सेवेला" समर्पित असलेल्या "NGO " च्या तश्याच चकाचक कॉर्पोरेट कार्यालयाला का नावे ठेवत नाहीत ? NGO ने "तो पैसा लोक सेवेला का नाही खर्च केला ?" असे प्रश्न त्यांना का विचारात नाहीत ?
मी काही NGO  (नावे प्रसिद्ध आहेत) आणि "आप" ला देणगी दिली तशीच मंदिरा मध्ये "अन्नदाना साठी" पण दिली (खरे तर हा उल्लेख मला टाळायचा होता... असो) आता पहा, 
१. मंदिराने माझ्या पैशाने अन्नदान केले का इतर खर्च - माहीत नाही
२. NGO ने माझे पैसे गरजू लोकांना दिले का त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयासाठी वापरले - माहीत नाही
३. "आप" ने माझे पैसे सरकार चालवायला / आंदोलनाला का विमान प्रवासाला वापरले - माहीत नाही
आता इथे, मी कुठेच पैशाचा गैर व्यवहार झाला नाही असे गृहीत धरतो - तर या तिन्ही ठिकाणी माझ्या पैशाचे काय झाले हे मला माहीत नाही (तिन्ही संस्था आपापला जमा-खर्च यथा सांग जाहीर करतात तरीही...) मी तिन्ही ठिकाणी "श्रद्धेनेच" आणि स्व-इच्छेनेच पैसे दिले. आता नंतर त्या पैशाचे पुढे काय केले/झाले हे मला माहीत नाही आणि त्या तिन्ही ठिकाणी मला "माझे पैसे सत्कारणीच लागतील" असेच सांगितले होते,मग मी त्यात मी फक्त मंदिरात दिलेले पैसे म्हणजेच अंधश्रद्धा कशी ?  जर गैरव्यवहार असेलच तो कुठे हि असेल. 
अहो जसे आजारी माणूस जसे हा डॉक्टर तो वैद्य असे करत फिरत असतो तसेच परिस्थितीने गांजलेला (घाबरलेला असे मला म्हणायचे नाही) माणूस हे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधत फिरत असतात, आता अश्या रुग्णाला /गरजूला भोंदू डॉक्टर/(बाबा)  मिळाला तर आपण तो रुग्ण /गरजू कसा अंधश्रद्धाळू आहे या वर त्याला उपदेश देत बसायचे आणि सगळे डॉक्टर/(बाबा)  कसे भोंदू आहेत या वर चर्चा करायची ? का भोंदू डॉक्टरवर (बाबावर) कसे नियंत्रण ठेवता येईल आणि एखादा योग्य डॉक्टर किंवा त्याच्या परिस्थितीवर उपाय कसा उपलब्ध करता येईल हे पाहायचे? 
जो पर्यंत एखादी कृती, श्रद्धा अथवा प्रथा हि वक्ती अथवा एखाद्या समूहाच्या स्वातंत्राच्या आणि सन्मानाच्या विरुद्ध नाही (harmless ) तो  पर्यंत ती केवळ विज्ञानाच्या / सुधारणेच्या चष्म्यातून पाहून (आणि त्याला विज्ञानात उत्तर नाही म्हणून किंवा आपल्याला मिळाले नाही म्हणून) त्यावर टीका करू नये असे माझे मत आहे - उ. दा. शनिशिंगणापूर येथे कोणी चोरी करत नाही अगदी घर/दुकाने यांना दरवाजे नसले तरी - त्या मागे तिथे देव रक्षण/शिक्षा करतो अशी (अंध ??)श्रद्धा आहे, काही वर्षापूर्वी आपले अंनिस वाले म्हणाले आम्ही चोरी करतो पाहू देव काय शिक्षा करतो ते ? म्हणजे चोरी करून त्यांना काही झाले नाही (आणि असे समजू होणार नाही (केलीच तर पोलिस केस ) ) तर सिद्ध काय होईल दोन गोष्टी - "देव नसतो" आणि "आता यापुढे गावात चोरी करायला काही हरकत नाही" आता याला काय म्हणावे。
PK  मध्ये एक वाक्य आहे - "जो घाबरतो तो मंदिरात जातो" ... मी म्हणतो घाबरून मंदिरातच जातो आणि स्वतःचेच  पैसे तिथे अर्पण करतो (वाया घालवतो म्हणा हवे तर) पण दिवसातून "पाच वेळा" प्रार्थनेसाठी जाऊन दुसऱ्याचे जीवन घाबरवण्याची कृती किंवा कृतीचे समर्थन तर नाही करत ना? 
धर्म हा माणसाची संस्कृती आहे एक जीवन मार्गदर्शनाची तत्त्वे सांगणारी प्रणाली म्हणा हवे तर , काही भोंदू लोकांमुळे  (जे सगळ्याच धर्मात आहेत) तो सगळाच धर्म अंधश्रद्धाळू कसा? जर लोकांची निरुप्रद्रवी श्रद्धा आहे तर उगीच ती श्रद्धास्थाने का अस्थिर करा? कोणी कुठे दान धर्म करावा हा वैयक्तिक प्रश्न आहे उगीच इथेच पैसे द्या तिथे नको हा सल्ला का ? आणि तो पण त्यांच्या श्रद्धास्थानाला डिवचून ? शेवटी काय लोकांची देण्याची भावना असते ती भीती मुळे असेल अथवा कर्तव्यभावाने मुळे असेल पण शेवटी त्या मागची देण्याची "श्रद्धा/ विचार" महत्त्वाचा आणि तो तुटता कामा नये. 
देवाला केलेल्या अभिषेकाने २०० मी.लि दूध वाया जाते हे खरे आणि ते होऊ नये हे हि खरे - पण त्याचे तीर्थ गरिबांत वाटले जाऊ शकते आणि काही अंशी वाटले जाते) पण लग्नात उधळले जाणारे तांदूळ ? पार्टीत वाया जाणारे अन्न याचे काय ? 
देवा समोरच्या दिव्यातले तेल / मेणबत्ती निरुपयोगी असेल मग  "रात्र" सामन्यात उधळ्या जाणाऱ्या विजेचे काय?
देवा/दर्ग्यावर वाहिले जाणारे हार / फुले वाया जात असतील मग नेत्यांच्या सभेतील सजावटीचे काय?
यात्रा / उर्स मध्ये वेळ आणि शक्ती वाया जात असेल मग विश्वकप / सामने/ नेत्यांच्या सभेतील गर्दीचे आणि कार्यकर्त्यांच्या वेळेचे काय? 
तीर्थ यात्रेत पैसे वाया जात असतील मग पर्यटनात केलेल्या खर्चाचे काय?
आनंद आणि श्रद्धा या भावना आहेत - त्या कोणी कश्या साजऱ्या किंवा व्यक्त  कराव्या हा वैयक्तिक प्रश्न आहे - हा त्यामुळे दुसऱ्याच्या भावनेचा अनादर होऊ नये हे महत्त्वाचे. उगीच लोकांनी देवाला दूध / फुल / चादर वाहू नये ती लोकातच वाटावी हा आग्रह का?  करू दे ना त्यांना काय करायचे ते ... बंदुकीने गोळ्या तर मारत नाहीत ना? तो पर्यंत ठीक आहे. आणि खरे गरीब आणि गरजू कोण ठरवणार ? ती सापेक्ष गोष्ट आहे. कोणी पार्टीत/लग्नात वेडा-वाकडा खर्च केला, मोठे घर बांधले तर वैयक्तिक बाब आणि मंदिरात दान केले किंवा मोठे मंदिर बांधले तर ती त्याची अंधश्रद्धा म्हणून गोंधळ का ? ती ज्याची त्याची वैयक्तिक बाब नाही का? त्याने आनंद कसा साजरा करायचा आणि श्रद्धा कधी व्यक्त करायची हा त्याचा प्रश्न नाही का? 
धार्मिक तेढ निर्माण होऊ नये , धार्मिक/जातीच्या आधारावर भेद असू नये यावर काही दाखवले / सांगितले तर उत्तमच की पण उगीच एखाद्या धर्माबद्दल (मग तो हिंदू वा मुसलमान वा इसाई) तुमचे रिवाज किती बुरसटलेले आणि अयोग्य असे सांगणे आणि वारंवार सांगणे हा प्रकार कधीही चूकच. जनतेचे प्रबोधन करा पण प्रबोधनाचा अतिरेक होऊन तो चिडवण्याचा अथवा डिवचण्या सारखा प्रकार होऊ नये या कडे लक्ष दिले पाहिजे. नाही तर सामान्य लोक नकळत कट्टरपणाकडे झुकत जातील आणि मूळ उद्देशच हरवून बसेल... 
             ~ प्रमोद.रामदासी (बंड्या ...)