गुलामी नात्यातली!!

एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात. पण, याला वैचारिक दहशतवाद असे नाव आहे हेही कित्येकांना समजत नाही किंवा ते मुद्दाम त्यांना समजून घ्यायचे नसते.
माझ्या मते संवाद म्हणजे सम + वाद म्हणजे दोघांनाही वाद करण्याची समान संधी. दोघांनाही आपले मत मांडण्याची मुभा.
कोणत्याही नात्यांत असा "वैचारिक दहशतवाद" घुसला की एक अधिकाधिक दबला जातो आणि दुसरा वरचढ होतच राहतो. जो दबतो त्याला अधिकाधिक दाबले जाते. अशी सुरुवात होण्यापूर्वीच थांबवा.
भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण किंवा बहीण बहीण या नात्यात तर ही सुरुवात लहानपणापासूनच होते आणि ती आई वडीलच करतात.
एक उदाहरण घेऊ- लहानपणापासून बरेचदा आपण आई वडिलांकडून त्यांच्या एखाद्या मुलाबद्दल ऐकत असतो-
"आमचा मोठा मुलगा अमुक कधीही काहीही मागत नाही. शहाणा आहे आमचा अमुक!"
अशा प्रकारचे वाक्य तुमच्याबद्दल बोलले जाऊ लागले तर कृपया त्याचे अप्रूप वाटून घेऊ नका. ही प्रशंसा नाही! उलट प्रशंसेच्या वेष्टणाखाली "असाच दबलेला राहा, काही मागू नको, भिडस्त आहेस, तसाच राहा!" असे नकळत तुमच्या मनात ते बिंबवले जाते.
"आमची लहानी मुलगी/मुलगा तमुक मात्र काही वस्तू नाही मिळाली की अकांडतांडव करते. तिला पाहिजे तेच ती करते. मिळाल्याशिवाय गप्प बसतच नाही!"
असे वरील वाक्य ऐकल्यावर "न मागणारे अपत्य" सुखावते आणि त्याला वाटते- "अरे वा! आपल्याला सगळे चांगले म्हणत आहेत! आपले कौतुक होते आहे! नाही मागितले तर आपण चांगले ठरतो!"
पुढे मोठे झाल्यावर हेच कायम राहते. मग ते "लहानपणी आईवडीलांना बिनधास्त मागणारे" लहान अपत्य परतफेडीच्या वेळी अती लाडामुळे आई वडिलांना "काहीही न देणारे" अपत्य होते आणि त्याला आई वडील सुद्धा मागायला घाबरतात.
मात्र, "लहानपणापासून आईवडीलांना काहीही न मागणारे अपत्य" हे आपल्या भिडस्त स्वभावामुळे मोठेपणी "आई वडिलांना देतच राहते" आणि विशेष म्हणजे त्याचेकडूनच अधिकाधिक मागितलेच जाते.
वरचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. लहान मोठे याबद्दल कधी उलट सुलट अनुभव येऊ शकतो! पण दोन अपत्यांमध्ये बहुतेक वेळा आई वडील असा भेद करतातच. दुहीचे बीज लहानपणापासून रुजवतातच. काही समंजस आई वडील असे करत नसले तरी इतर नातेवाईक घरी येवून तशी बीजे रोवायला घेऊन येतातच येतात आणि ती रोवूनच जातातच जातात!
म्हणजेच कोणत्याही नात्याची "सुरुवात" होत असताना आपण जी भूमिका स्वीकारू त्यानुसार आपल्याला गृहीत धरले जाते. मग ते कोणतेही नाते असो!
सुरुवातीपासूनच जर अशी "आपल्या भिडस्तपणाची इतरांना लागलेली सवय" आपण मोडली तरच नात्यात संवाद होईल (आणि नंतर सुसंवाद) नाहीतर तो नात्यांचा वैचारिक दहशतवाद होईल.
नाहीतर मग नात्यातला एक जण वैचारिक दहशतवादी आणि दुसरा वैचारिक गुलाम होईल!!