कृष्ण

ज्याने कधी काळी धरित्रीचे तृषार्त अंतःकरण अनुभवले होते
स्वर्गलोकापल्याडच्या कृष्णचरणांची अभिप्सा धरली होती
त्या मज पामराला या भयावह तरीही सुमधुर भवसागरात
जीवात्म्याने जन्म घेण्याचे प्रयोजन एकदाचे उमगले आहे
त्या सावळ्याच्या डोळ्यातले चिरंतन सौंदर्य मी पाहिले आहे
मी ऐकला आहे त्या प्रेमिकाच्या बासरीतला धुंद आवेग
त्या चिरंतन परमानंदाच्या गूढरम्य अनुभूतीत
माझ्या अंत:करणातली शोकव्यथा कायमची मौनावली आहे
ते दिव्य संगीत जसजसे निकटच्या सान्निध्यात अलगदपणे खेचून घेते आहे
सारे जीवनच जणू त्या सोलिव सुखाने गात्रागात्रातून रोमांचित होते आहे
आपल्या दैवताने स्पर्श करावा, हात हाती घ्यावा, त्याचा सहवास लाभावा
ही आस उरी बाळगत अवघा निसर्ग एक प्रदीर्घ आसुसलेला विराम घेतो आहे
ज्या एका क्षणासाठी युगानुयुगे जन्म घेत राहिलो;
आज शेवटी सार्‍या अस्तित्वाचे परिपूर्णत्वच माझ्यात जिवंतपणे नांदते आहे.
(योगी अरविंद यांच्या 'कृष्ण' या कवितेचा स्वैर भावानुवाद)