हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय

हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय


प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून/वाचनातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.


नुकत्याच झालेल्या दसऱ्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ५० वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तित करून बुद्ध धर्मात प्रवेश केला त्या  घटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. ते बुद्ध धर्माकडे आकर्षित झाले त्यामागील अनेक कारणांची चर्चा ह्यानिमित्ताने सर्वत्र झाली. मात्र त्याही आधीपासून मला बुद्ध धर्माच्या तीन वचनांची मोहिनी पडलेली आहे. संघशक्तीचे निस्संदिग्ध वर्चस्व त्यांमध्ये विषद केलेले आहे. ते प्रार्थनेचे शब्द आहेत:


बुद्धं शरणं गच्छामि । म्हणजे बुद्धिवंतास मी शरण जातो,
धम्मं शरणं गच्छामि । म्हणजे धर्मास मी शरण जातो,
संघं शरणं गच्छामि ॥ संघास मी शरण जातो.
(धर्म = अर्धमागधी भाषेत धम्म, बुद्धवचने संस्कृत/अर्धमागधीत लिहिलेली दिसून येतात.)


क्रम महत्त्वाचा आहे. संघशरणता सर्वोच्च महत्त्वाची मानलेली आहे. माझे मानणे असे आहे की साऱ्या अवनतीकारक रोगांचे मूळ मनोविघटनाद्वारे शारीरिक दुर्बलतेत घडून व्यक्तीस ऱ्हासाप्रत नेत असल्याचे ज्ञान ह्या वचनांमागच्या भूमिकेमधून स्पष्टपणे दिसून येते.


बुद्धीला पटेल तसे आपण वागतो. ही बुद्धीशरणता होय. स्वार्थासाठी दुसऱ्याची फसवणूक करून सौख्य साधणे बुद्धीला पटू शकते. मात्र ते धर्माला पटणार नाही. नैतिकतेला पटणार नाही. तसे वागणे धर्मशरणता ठरणार नाही. शत्रू बलवान असला तर लढाईत विजय मिळणार नाही. तरीही अशी लढाई बुद्धीला पटणारी असू शकते. धर्म्य असू शकते. मात्र ती संघशक्तीला पटणारी नाही. संघाच्या दृष्टीने तो निव्वळ ऱ्हास ठरेल. म्हणून असेच वागावे जे बुद्धीला पटेल, धर्म्य असेल आणि संघास हिताचे ठरेल. त्याकरीता अनुक्रमे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हणायचे आहे. तिन्हीही आवश्यक.


मात्र गौतम बुद्धास ह्यापरता, तसे न वागल्यास, व्यक्तीलाही मानसिक व शारीरिकदृष्ट्या गंभीर परिणाम भोगावे लागत असणार ह्याचे ज्ञान असले पाहिजे. माणूस समाजशील असल्याकारणाने. ते ज्ञान, जे आज मनोकायिक अभ्यासांनी सिद्ध केलेले आहे.


तेव्हा संघशरणता हा एकाकीपणावर उत्तम उपाय आहे. मात्र हे साधावे  कसे?


भाषेचा वापर वर्णन करण्यासाठी, साद/प्रतिसाद देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी केल्या जातो. आपल्या बोलण्यात आपण वस्तुनिष्ठ वर्णनशैली विकसित करावी. टिप्पणी/भाष्य करणे टाळण्याचे धोरण ठेवावे. असे केल्यास एकवाक्यता साधते. सहमती होऊ शकते.


कुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कुणि मदत मागत असणे ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत राहून.


आपण समाजशील आहोत ह्याचे सदैव भान ठेवावे‌. सर्वांसोबत राहिल्यानेच आपली उन्नती वेगाने घडून येऊ शकते. आपले विशेषाधिकार समाजपुरूषाच्या पायी समर्पित केल्यास आपली भौतिक आणि मानसिक उन्नती घडून येते. कम्युनिस्टांनी 'कम्युन्स'चा महिमा गायिला. गीतेनी 'सांख्य'योग शिकविला. सर्वच धर्मांनी समुदायाचे भान ठेवले. दखल घेतली. मात्र भांडवलशाही समाजात पैशाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने माणसाची, माणुसकीची किंमत अकारणच घटली. पैशावरचा विश्वास माणसामाणसातील विश्वासापेक्षा मोलाचा ठरला.


एकाकीपणा सामान्यत: खालील कारणांनी उद्भवू शकतो. आणि त्याचा सामना त्यासोबतच सुचविलेल्या उपायांनी होऊ शकतो.


१. खराखुरा एकाकीपणा. आपल्यासारखेच इतरही लोक मैत्रीच्या शोधात असतातच. तेव्हा 'बर्डस् ऑफ सेम फिदर' शोधत असावे.


२. सभोवती असंख्य नातेवाईक, मित्र, ओळखीचे, आसपासचे, कार्यालयीन असे लोक सदैवच साथ असूनही त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने येणारा एकाकीपणा. अशा बाबतीत संवादास कारणे हुडकून काढण्याची, संवाद करण्याची, विसंवाद टाळण्याची आत्यंतिक गरज असते. सोबतच्या लोकांच्या मदतीने आणि जाणीवपूर्वक संवाद साधावा.


३. आपल्या पदाच्या एकमेवाद्वितीयत्वामुळे उद्भवणारा एकाकीपणा. आपण जीवनाच्या केवळ एखाददुसऱ्या पैलूबाबत एकमेवाद्वितीय असतो, हे लक्षात घ्या. इतर अनेक बाबतीत आपले इतरांशी असलेले सांख्य (साधर्म्य, समानता, सारखेपणा) शोधा. त्यांच्या अनुभूतीत रस घ्या. त्या त्या बाबतीत तेही तुमच्यात रस घेतील, आणि संवाद साधेल, वाढेल.


४. जवळच्यांनी दूरत्व पत्करल्याने येणारा एकाकीपणा. ही सर्वसामान्यपणे एकतर्फी प्रेमाची कहाणी असते. तेव्हा समोरच्याने काय करावे हे तुमच्या हातात उरलेलेच नसते. म्हणून 'मिले न फुल तो काटों से दोस्ती कर ले' हेच धोरण पत्करावे. आपल्याला आपला एकाकीपणा घालवायचा आहे. त्यांना त्याच्याशी काय कर्तव्य?


५. पराकोटीच्या वैमनस्यात सदासर्वदा रममाण होण्यामुळे येणारा एकाकीपणा. लोक तुमच्या वैमनस्यापायी हैराण होतात. त्यांना तुमच्या कर्मकहाण्यांमध्ये मुळीच रस राहत नाही. अशावेळी त्या आपल्यासाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या असलेल्या वैमनस्यावर वर्तमानाचा दाट पडदा टाकून, निरामय भविष्याची वाट धरावी हेच श्रेयस्कर ठरते.


६. स्वावलंबनाच्या अतिरेकी कल्पनांमुळे उद्भवणारा एकाकीपणा. मी कुणावर अवलंबून नाही. माझे कुणावाचून काही अडणार नाही. ह्या व्यर्थ कल्पना असतात. 'पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा' हेच काय ते निखळ सत्य असते. परावलंबित्वाचा एवढा बाऊ करू नये. किंबहुना काहिसे परावलंबित्व हेतुत:च पत्करावे. म्हणजे त्यायोगे आपोआप मित्र मिळतात.


मी जनात फिरलो तेव्हा, असंख्य मित्रही केले |
जंगलात फिरलो तेव्हा, निर्झरही बोलत होते ||
मी मनात फिरलो तेव्हा, स्मृतींची साथही होती |
मी कशात मन रमवावे, मज भ्रांत मुळी ही नव्हती ||


वरीलप्रमाणे विचार असतील तर सदरहू कविवर्यांस एकाकीपण सतावणारच नाही. स्मृतींची साथ ही माणसाला एकाकीपण कधीच जाणवू देत नाही.


भरपूर पाठांतर असावं. असंख्य कविता, गाणी, वेचे मुखोद्गद् असावेत. म्हणजे अगदी अंधारकोठडीतही मनुष्य सुखेनैव कालक्रमणा करू शकतो.


माणसाला कल्पनादारिद्र्य नसावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरूंगातही 'सागरा प्राण तळमळला' लिहून एकाकीपणा घालवला. कालिदासाच्या शापित यक्षानी 'मेघदूता'स भारतवर्षाची रमणीय सफर घडवित अलकानगरीत मनोमन पोहोचविले. कल्पनाविलास माणसाला मुळीही एकाकीपण जाणवू देत नाही. म्हणून कल्पनाचित्रण करावे. तशी सवयच जडवून घ्यावी.


ह्या आणि तुम्हाला सुचतील त्या सर्व उपायांनी एकाकीपणाचा सामना करावा. लोक आपले शत्रू नाहीत. एकाकीपणा आपला शत्रू आहे. हे मनोमन मानावे. म्हणजे खचितच एकाकीपणापासून सुटका होईल ह्यात काय संशय?