अभिजात हा कलेच्या प्रकाराचा गुणविशेष आहे, तर अभिरुची हा माणसाचा गुणधर्म आहे.

जिला एखादी शास्त्रीय बैठक असेल अशी कला अभिजात समजली जाते. उत्स्फूर्तपणे होणारा कलाविष्कार बहुतकरून दैवी देणगीतून निर्माण होतो. एखाद्या माणसाला सातत्याने ज्या प्रकारचा कलाविष्कार आवडत राहतो त्याला त्याची अभिरुची म्हणता येईल. एकाच माणसाची भिन्न भिन्न विषयात भिन्न भिन्न दर्जाची अभिरुची असू शकतेच नव्हे तर ती तशी असतेच. 

चांगले आणि वाईट हे सापेक्ष असते. सर्वसाधारणपणे ज्यातून आपणास आनंद मिळतो, जे नैतिक दृष्ट्या योग्य असते आणि ज्याचा इतरांना त्रास होत नाही ते चांगले असे समजले जाते आणि त्याच्या उलट वाईट.

तमाशातील गाणी संगीताच्या दृष्टीने वाईट आहेत असे कोणी म्हणणार नाहीत, पण ती सादर करतांना करण्यात येणारे कामुक अंगविक्षेप, त्यांना भुलून गेलेल्या लोकांच्या संसाराची होणारी धूळधाण वगैरे गोष्टींमुळे ते वाईट मानले जात असे. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि या वाईट गोष्टी टाळून तमाशातील गाणी सादर होऊ लागली आहेत.

ही माझी अनुभवातून बनलेली वैयक्तिक मते आहेत. मी कांही या विषयावरील पुस्तके वाचलेली नाहीत.