प्रश्न गंभीर असल्याने सर्वांनी पोटतिडिकेने आपले मत द्यावे.
अतिशय गंभीर प्रश्न आहे. माझ्याही मनात कितीतरी दिवस घोळत होता, ते ही ह्या मालिका पाहून बरीच वर्षे उलटल्यावर. पु. लं. च्या पुस्तकांतील एक वाक्य आठवेल तर शप्पथ पण या मालिका मनात अजूनही ठसलेल्या आहेत.
वाहिन्यांनी केवळ सोज्ज्वळ मालिकाच दाखवायला हव्यात.
सहमत. सासू म्हणून आशा काळे आणि सून म्हणून अलका कुबल यांना घ्यावे अशी शिफारस करावी.
स्त्रीपात्रांच्या मेकअपवर महिला आणि समाजकल्याण विभागाचे नियंत्रण असावे. निळ्या किंवा रंगीबेरंगी रंगाचे कुंकू, टिकली, डोळ्यांवर चमचम चमकी आदी भडक प्रकार संपवायला हवेत.
सहमत. याबरोबरच, लांब लांब टिकल्या (जितकी टिकली मोठी तितकी बाई अधिक कपटी), डोळ्यांच्या आयशॅडो, लांब लांब खोट्या पापण्या, स्वयंपाकघरात राबून खडीदार ईस्त्रीच्या कडक साड्या यांचीही यादीत भर हवी.
अशा मालिकांमुळे घरोघरी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास हवा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाचण्या करून आवाजाची योग्य ती पातळी ठरवावी. संगीतकाराला पार्श्वसंगीत वरील मंडळाकडून संमत करून घ्यावे लागेल.
याचबरोबर टिव्हीबरोबर सायलेन्सर फ्री अशी जाहिरात व्हावी किंवा मूकपटांची पुनर्निमीती करावी.
सरकारने एक कपटनियंत्रण मंडळही स्थापन करावे. जेणेकरून खुनशी, कपटी कटाक्ष आणि संवाद ह्यांच्यावर नियंत्रण आणता येईल.
सहमत. छद्मी हसणे, इकडची काडी तिकडे पेटवणे, एक भिवई उंचावणे, डोळे बारीक करणे इ. इ. ची भर टाकता येईल. उलटपक्षी, टिपे गाळणे, रामराज्य चित्रपटातील शोभना समर्थ टाईप (रामराज्यच ना?) माना वेळावणे, इश्श्य, अय्या, गडे, आम्मी नाई जा!! अशा संवादांची भर टाकणे.
स्वयंपाक घर असो वा कार्यालय, ह्या अशा मालिकांच्या चर्चांवर बंदी आणावी.
हो हो! ही चर्चाही लवकर बंद व्हावी.
मालिकांच्या आहारी गेलेल्यांसाठी समाजकल्याण विभागाने प्रत्येक गावात एक व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करावे.
बीबीसी, डिस्कवरी, हिस्ट्री आणि नॅशनल जिओग्राफिकपेक्षा स्त्रियांची मक्तेदारी बंद करून मराठी वाहिन्यांवर लक्ष्या आणि अशोक सराफचे सगळे सुमार विनोदी चित्रपट/ हिंदी असल्यास कादरखान - शक्तीकपूरचे चित्रपट किंवा चित्रफीती दाखवाव्या.