प्रत्येकी चार युगांचा एकच मनू असतो. सध्याच्या युगाच्या मनूला वैवस्वत मनू असे म्हणतात. घडून गेलेल्या आणि येणाऱ्या सगळ्या युगांच्या मनूंची नावे पुराणांत आहेत. हा मनू प्रलयापूर्वीच्या युगातील राजा असतो. सगळ्या प्राणीजातींस प्रलयकाळी वाचवून झाल्यानंतर जेव्हा थोडी स्थिरता येते तेव्हा वाचवलेल्या मानवजाती करिता मनूच्या स्मरणांत राहिलेल्या पूर्वीच्या समाजव्यवस्थेचे नियम मनू सांगतो म्हणून त्यास 'स्मृती' असे म्हणतात. मानव, मनुष्य हे शब्द मनू पासूनच तयार झालेले आहेत (किंवा उलट). मनुस्मृतीस प्रत्यक्षात आणणारे/राबवणारे धर्मपीठ व धर्मपीठास असणारा राजाश्रय ही दोन्ही केंद्रे मोडकळीस निघाली आहेत; आणि म्हणून मनुस्मृती कालबाह्य आहे.

सध्याच्या काळातील समाजव्यवस्थेचे पुस्तक म्हणजे आपले संविधान; ज्यावर अधिक चर्चा, बदल घडवून आणून प्रजेस तोष देण्याचा अधिकार असलेले केंद्र (म्हणजे सरकार) अस्तित्वात आहे; पण इच्छाशक्तीचा तेथे अभाव आहे. मनुस्मृतीच चघळत बसणारी जनता जोवर अस्तित्वात आहे तोवर त्यांनीच निवडलेली सरकारे तरी संविधानाची काय ती किंमत करणार?