या कथेस प्रभाकर पेठकरांनी दिलेल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांवरून असे वाटते की ते कळत-नकळत आपल्या नैतिकतेच्या कल्पना कथेतील पात्रांवर लादू पाहत आहेत, आपल्या नैतिक-सामाजिक चौकटीत त्यांना बसवू पाहत आहेत व ती त्यात बसत नाहीत असे दिसल्यावर नाराज होत आहेत. कथेचा आस्वाद घेण्याची वा समीक्षेची ही पद्धत मला तरी पटत नाही. आपण वाचत असलेल्या साहित्यातील साऱ्या पात्रांनी आपल्याला योग्य वाटेल तसेच वागणे अपेक्षित नसते. माणसा-माणसात फरक असायचाच. पेठकर ज्या नैतिकतेचा आग्रह धरतात ती समाजमान्य असली तरी सगळ्यांकडून सदा-सर्वदा खरोखरीच पाळली जाते का? माणसे (स्त्रिया व पुरुष दोन्ही) स्खलनशील असतात व यावच्चंद्रदिवाकरौ तशीच राहणार. जो शारीर मोह देवादिकांना व ऋषी-मुनींना चुकला नाही, आवरता आला नाही तो सामान्य माणसांना कधीही होणर नाही, त्यास ती कधीही बळी पडणार नाहीत हे अशक्य आहे.

 इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?

कथेतील प्रत्येक पात्र काही धीरोदात्त, गुणसागर नायक नसतो. किंबहुना अशा पात्रांनी भरलेल्या कथा अत्यंत नीरस व रटाळ होतील. माणसांचे चित्रण माणसांसारखेच असावे - त्यांच्या गुणदोषांसकट, तटस्थपणे. राहिला प्रश्न नावाचा तर पाळण्यातल्या नावाच्या अर्थानुसार आपल्यापैकी किती जण वागतात? आणि अशा वागण्याची आपण अपेक्षा तरी ठेवतो का?

'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते. भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.

वरचा मुद्दा इथेही लागू होतो. प्रत्येक त्रिकोणातील तिसऱ्या व्यक्तिबाबत हा आक्षेप घेता येईल. माणसांनी असे वागू नये असे म्हणण्यात काय हशील? जर जगातील १००% माणसे नीती-धर्मानुसार वागत असती तर पृथ्वीचा स्वर्ग झाला असता. नाही, हेही विधान तितकेसे बरोबर नाही कारण या 'विषयी' स्वर्गातही सारे आलबेल कुठे आहे?

'त्या' तपशिलातील वर्णन, 'शारीरिक आणि अनैसर्गिक' आहे.

ते अनैतिक असेल पण अनैसर्गिक कसे? शारीर भावनांहून अधिक नैसर्गिक काय असू शकते? आपल्या स्वत:च्या धर्मसंमत व कायदेशीर जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तिविषयी कधीही, क्षणभर का होईना, आकर्षण न वाटलेले असे कितीजण असतील ? हा प्रश्न ज्याने-त्याने मनातल्या मनात स्वत:स विचारावा व प्रामाणिकपणे स्वत:स उत्तर द्यावे. 

ह्या दोन्ही गोष्टींमागचे, आणि सायलीच्या ''जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' ह्या वाक्यांमागचेही माझे विचार वर दिल्याप्रमाणे आहेत.

सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'

रात्रीचा संदर्भ का नको? एक अपमानित, चिडलेली पत्नी आपल्या पतीशी त्याच्या व्यभिचाराविषयी एकांतात बोलते आहे हे लक्षात घ्या. तसेच या वाक्यात लेखकाने अश्लीलता आणलेली नाही वा पातळी सोडली नाही.

नाहीतर सलमान खान, विवेक ऑबेरॉय इत्यादींनी हाताळल्यावर अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न का केले असते?

कथेच्या पात्राच्या तोंडी "...माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' हे वाक्य ज्यांना रुचत नाही ते पेठकर खऱ्याखुऱ्या ऐश्वर्याबद्दल "हाताळल्यावर" हा शब्द  किती सहजपणे वापरून जातात. इथे ऐश्वर्याचा बचाव करण्याचा माझा उद्देश नाही (तिची ती समर्थ आहे!)

कथेचा शेवटी प्रश्न अनुत्तरित ठेवणे मला योग्य वाटले. ही काही लहान मुलांसाठी बोधकथा नाही. दरवेळी वाचकांना चमच्याने भरवण्याची काय गरज? जो तो विचार करून आपल्याला हवा तसा शेवट कल्पू शकतो. तसेच साऱ्याच प्रश्नांना सोपी उत्तरे नसतात.