मनोगतावर एकंदर महाविद्यालयीन दर्जाच्या 'टुकार' कवितांचा पाऊस पडतो आहे, हे खरे. मनोगत हे मुक्तांगण आहे त्यामुळे अशा कवितांना पायबंद घालणे योग्य ठरेल काय, हा वेगळा मुद्दा आहे. कालांतराने हा पाऊस थांबतो असा अनुभव आहे. असो. आधी काही जणांनी काही मते मांडली आहेत त्यावर माझी मते पुढे देतो आहे.

'टुकार' कविता लिहिणारा किंवा अगदी 'उत्तमोत्तम' कविता लिहिणार कवी त्या भावनेशी प्रामाणिक असतोच असे खात्रीलायकरीत्या सांगता येईल काय?  शिवाय को अहम ह्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वाचकाच्या अपेक्षा सारख्याच असतील असे नाही. प्रत्येक वाचकाच्या अपेक्षा, मूल्ये, आकलन, अनुभव आणि कविता वाचतानाचा त्याचा मूड ह्या प्रत्येक गोष्टीत तफावत असू शकते. पण कविता वाचताना वाचकाने एकदातरी तिच्यापासून स्वतःला शक्य तेवढे वेगळे ठेवून वाचायला हवे असे माझे मत आहे. 

माझ्या मते, 'टुकार' कवितांना हाणावे  त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. पण चांगल्या किंवा बऱ्या कवितांना प्रतिसादांतून प्रोत्साहनही द्यावे. त्यातूनच चांगली कविता वर येऊ शकण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे जे लगेच कळते, काळजात घुसते ते चांगले काव्य नाही काय? तोही शब्दखेळ काय? काहींना असे वाटते. ही मंडळी म्हणजे 'अमेरिकन' मराठी कवी आणि त्यांचे 'अमेरिकन' मराठी वाचक.  निबंधासारख्या लांबलचक 'हुशार', 'ग्लोबल', अगम्य आणि कंटाळवाण्या  कविता आणि कवी  हे 'अमेरिकन' मराठी वाचकच डोक्यावर घेतात. पुढील काव्यांश वाचून परिस्थितीचा अंदाज येईल--

भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात?
कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं?
की प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण, फरफट?
अर्धसत्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य-असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्यूजन का व्हावं?
जगातल्या - आणि स्वत:तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा?...

ह्या कवितेचा अर्थ कळला लोकांना कळला तरी टिकणार आहे काय? हा शब्दखेळ नाही काय?

अशी अनेक उदाहरणे देता येईल. जाऊ द्या. पण गमतीचा भाग म्हणजे ह्या हवेतल्या कवींना तुकारामासारखा इथल्या मातीत घट्ट रुजलेला कवी जवळचा वाटतो. ते त्याच्यावर ग्रंथबिंथही लिहू शकतात. पण दुसरीकडे ह्या 'लिटिल' कवींना छंदबद्ध कविता म्हणजे कविताच नाही असे ह्यांना मनापासून वाटते. ह्यांना छंदात चांगले लिहिणे जमतही नाही म्हणा म्हणूनही असावे. म्हणूनच छंदातल्या कवितांचा हे जवळपास दुस्वासच करतात.

जे अनाकलनीय, स्टंटबाज तेच काव्य. छंदातल्या कविता प्रामाणिक कविता नाहीतच मुळी अशी ह्या लोकांची भूमिका असावी असे वाटते. आपण काहीतरी  'ग्रेट', 'जबरा' लिहितो आहोत आणि वाचतो आहोत असे ह्या लोकांना वाटत असते. 

"May your poems... ...invite the critics for dinner and leave before the main course...  once written, seldom regain consciousness.." असे रॉबर्ट मॅकगॉफ़ ह्या ब्रिटिश कवीने उगाच म्हटलेले नाही. (रॉबर्ट मॅकगॉफचा पूर्ण माल इथे. वाचा, ऐका, आनंद घ्या.)

आपली कविता जन्मतःच मृत आहे, 'स्टिलबोर्न' आहे हे फक्त ह्यांनाच कसे कळत नाही.

चित्तरंजन