आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. काही विस्कळीत (वाटू शकणारे) विचार खाली देतो आहे.

पेंडश्यांनी टाकलेली मताची पिंक फार गंभीरपणे घेण्यात अर्थ दिसत नाही. "आपल्या एकंदर जीवनाची लांबीरुंदीच इतकी छाटछूट आहे" हे ठरवणारे ते कोण?

'माझा प्रवास' लिहिणारे गोडसे भटजी, 'स्मृतीचित्रे' लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, 'माणदेशी माणसे' लिहिणारे धाकटे माडगूळकर, 'रारंग ढांग' लिहिणारे प्रभाकर पेंढारकर, 'शेलूक' लिहिणारे आ ना पेडणेकर, 'आई आहे शेतात', 'पाणकळा', 'पड रे पाण्या' लिहिणारे र वा दिघे, 'पवनाकाठचा धोंडी' लिहिणारे गो नि दांडेकर, 'टारफुला' लिहिणारे शंकर पाटील, 'डोंगर म्हातारा झाला', 'वीस कोटी गॅलन पाणी' लिहिणारे अनिल बर्वे, 'राब' लिहिणारे अनंत मनोहर, 'चानी' लिहिणारे खानोलकर, ...(यादी कितीही पटीने वाढवता येईल)... या सर्वांच्या जीवनाची लांबी छाटछूट? जाऊ द्या झाले!

मराठी साहित्य जागतिक दर्जाचेच (किंवा त्याहून वर!) आहे असे म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही. कारण ते ठरवणारा मी कोण? आपले विषय बऱ्याच वेळेला त्याच त्या मर्यादेत घुटमळतात हे खरेच. पण त्या परिघातून बाहेर कोणी पडलेच नाही, पडणारच नाही असे म्हणण्यात अर्थ नाही.

जागतिक साहित्याकडे पाहिले तरी त्यातही 'बसवलेले' गणपती बरेच दिसतील. 'पकून' (Puckoon) लिहिणारा स्पाईक मिलिगन, 'फॅमिलिऍरिटी इज द किंगडम ऑफ द लॉस्ट' लिहिणारा डगमोरे बोटी (Dugmore Boetie), 'डॉन कॅमिलो' ची मालिका लिहिणारा जोव्हानी क्वारेशी (Giovanni Guareschi), 'अ कॉन्फेडरसी ऑफ डन्सेस' लिहिणारा जॉन केनेडी टूल यांची पुस्तके सहजगत्या मिळणे जवळजवळ अशक्य आहे. पण ती वाचणाऱ्यांना पटावे की हे लेखक कुठल्याही बहुचर्चित, बहु-सन्मानित लेखकांपेक्षा कुठेही कमी नाहीत.

असो. विस्कळितपणा वाटलाच तर दुर्लक्ष करावे!

ता.क.: एक दुरुस्ती - ते मेघदूतवाले वैमानिक डॉक्टर म्हणजे पुण्याचे (कै) एस व्ही भावे.