आजच नागपुरच्या दै. नवराष्ट्र मधे बातमी आली कि, महानगर पालीका चालवत असलेल्या २७ मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद करण्यात आल्या आहे. २ वर्षापुर्वी मुंबई मधे जवळ जवळ २५००००० मराठी शाळैय मुलांची संख्या प्रत्येक वर्षी घटत आहे.  बाकी इतर ठिकाणची जी काय स्थिती असेल ती वेगळीच.

जर द्वारकानाथ ह्यांनी मांडलेला मूळ मुद्दा पाहिला तर त्यांची व्यथा आहे ती बंद पडणाय्रा महानगरपालिकेच्या शाळांसंबंधीची.त्या शाळा बंद पडत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी. मराठी भाषा हा मुद्दा नसावा त्यासाठी.

आजच्या नगरपालिकेच्या शाळांची अवस्था अतिशय खराब आहे.मी स्वत: महानगरपालिकेच्याच शाळेत शिकलो.पण हल्लीच्या शिक्षकांची विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या भवितव्याकडे पाहाण्याची दृष्टी अत्यंत कोती आहे हे खेदाने म्हणावे लागते.

मी स्वत: माझ्या धाकट्या भावाच्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत शिकविण्याबाबतीत आग्रही होतो.एक वर्ष तिला मराठी शाळेत शिकवली.पण एकंदर तिची प्रगती पाहता तिला त्या शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातली.प्रिंसिपॉलांनी स्वत: तिची मुलाखत घेवून तिचे एक वर्ष फुकट जावू नये म्हणून तिला सिनीयर के. जी. त प्रवेश दिला. आम्हालाही घरी तिच्यावर थोडी अधिक मेहनत करायला सांगितले.आज ती मुलगी आणि तिचे आई-बाबा दोघेही खूष आहेत.तिला आम्ही घरी मराठीचाच आग्रह करतो.मराठी सण,रांगोळी आणि इतर गोष्टींचा आग्रह जरूर असतो. पण तिचे काही चुकले किंवा आम्ही रागावलो तर पटकन "सॉरी" म्हणण्याची अक्कल तिला कुठून आली ? हाही विचार करण्याचा मुद्दा आहे.

मागे एकदा अल्फा मराठीवर " आमने-सामने" ह्या कार्यक्रमात ह्या विषयावर चर्चा झाली होती. मातृभाषेतून शिकणारी मुले अभ्यासाच्या बाबतीत अधिक स्वावलंबी असतात ह्या त्यांच्यापैकी एकाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.

मराठी भाषेचा आग्रह,मराठी भाषेवरील प्रेम हे सर्व मान्य केले तरी मराठी शाळेतील आताच्या शिक्षकांचा निराशावाद आणि व्यवहारात मराठीची होत असलेली गळचेपी ह्यावर आधी उपाययोजना करायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठीबद्दल आपण इतके आग्रही आहोत.पण येथे लिहितांना आपण शुद्धलेखनाबाबत किती जागरुक आहोत ? प्रशासकांनी इतकी छान व्यवस्था करुन दिली आहे.आपले लिखाण प्रसिद्ध होण्याआधी  आपण ते वाचू शकतो. मग प्रतिसाद पाठविण्याआधी तो वाचून बरोबर आहे की नाही हे पाहाण्याची तसदीही घेतली जात नाही हे जाणवते.

मग आता आपण आपल्यापासूनच सुरुवात का करु नये ?

शुभस्य शिघ्रम!