आपली शंका रास्त आहे.

नेताजींनी या नेत्यांची मदत का घेतली याला सबळ कारणे आहेत. सर्व सारासार विचाराअंतीच नेताजींनी हा कटू निर्णय घेतला असावा.

१) शत्रूचा शत्रू तो आपला (तात्पुरता का असेना पण) मित्र या नात्याने जसे नेताजी जर्मनी व इटली कडे बघत होते, नेमका तोच दृष्टिकोन त्या राष्ट्रप्रमुखांचाही असावा. केवळ नाईलाज म्हणून नेताजी या मार्गाने गेले. जेव्हा युद्ध भडकणार हे स्पष्ट झाले होते, अनेक वर्षे आगाऊ हिटलरने आपली मनीषा उघड केली होती. जोपर्यंत स्वतःचे घर सुरक्षित आहे तोपर्यंत घरातली माणसे दुसऱ्याच्या घरावर बोळे फेकायला वा लुटायला धजावतात. मात्र जेव्हा त्यांच्या घराला आग लागते तेव्हा त्यांची प्राथमिकता ही आपले घर वाचवणे हीच असते, त्यावेळी त्यांना आपल्या शिकारीकडे पाठ फिरवावीच लागते. हे युद्ध इंग्रजांच्या घरात पेटणार हे उघड होते. म्हणजेच सर्वोत्तम सेना, शस्त्रे, अधिकारी, मुत्सद्दी, सर्व उपलब्ध सामग्री ही साहजिकच इथे एकवटली जाणार. नेमक्या याच वेळेस हिंदुस्थानात जनतेने सशस्त्र क्रांती केली तर ते इंग्रजांना हाताळणे अत्यंत अवघड होणार होते. जर या युद्धाला जागतिक युद्धाचे स्वरूप आले तर प्रत्येक देशाला स्वतःचा निर्णय घेता येणार होता, युद्धात कुणाच्या बाजूने सामील व्हायचे किंवा तटस्थ राहायचे. यासाठी हिंदुस्थानला सर्वप्रथम एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक मान्यता मिळणे अत्यावश्यक होते. नेताजी हिटलरला भेटले तेव्हा त्यांच्या दोन मागण्या त्यांनी मांडल्या - एक म्हणजे माइन कांफ मधील हिंदुस्थानी जनता व नेतृत्व यांच्याविषयी वापरलेल्या भाषेचा जाब व दुसरे जर्मनी कडून हिंदुस्थानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता.

२) हिटलरची महत्त्वाकांक्षा, राजकीय हाव व युद्धविषयक धोरण पाहता जर्मनीचा संपूर्ण विजय होणे नेताजींना दुरापास्त वाटले असावे. जरी जर्मनी विजयी झाली तरी तिची इतकी अपरिमित हानी होणार की नव्याने आघाडी उघडून हिंदुस्थानला अंकित करणे व तेही हजारो मैलांवरून हे नेताजींना वास्तविक वाट नव्हते व साहजिकच त्यांना एक सत्ता जाऊन दुसरी येण्याचा धोका विचाराअंती दिसला नाही.

३) हिटलर व त्याचा पीत्ता मुसोलिनी यांना भेटून त्यांची मदत मागतानाच हे देश इतक्या अंतरावरून व मधला भूभाग त्यांच्या आधिपत्याखाली नसताना, तसेच त्यांची सर्व ताकद युरोप-आफ्रिकेत गुंतलेली असताना ते आपल्याला सक्रिय मदत करतील व आपल्या बरोबर फौजा पाठवतील याची सुतराम शक्यता नव्हती हे नेताजींना पक्के माहीत होते. मात्र त्यांचा बागुलबुवा उभा करून इंग्रजाची झोप उडवणे आणि त्यांना आता हिंदुस्थानवर फार काळ राज्य करणे शक्य नाही हे दाखवून देणे हाच या मदत मागण्यामागचा खरा हेतू होता.

४) जपान व ज्रर्मनीचे नवे आघाडीचे धोरण पाहता नेताजींना जर्मनीचा वापर जपानला हिंदुस्थानच्या बाजूने उभे राहण्यासाठी गळ घालायला करायचा असावा

५) युद्धाच्या दरम्यान जे युद्धकैदी जर्मनांच्या हाती सापडतील त्या पैकी हिंदुस्थानी कैदी जर्मनीचे मन वळवून आपल्या बाजूने करून घेता आले तर त्यांच्या लष्करी अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्याला इंग्रजांविरुद्ध लढताना होईल असाही नेताजींचा दूरदर्शी विचार होता.

अन्यथा जे नेताजी मानवी प्रतिष्ठा, जाती -धर्मविरहीत समाज व अखंड हिंदुस्थानचे स्वप्न आयुष्यभर पाहत आले ते हिटलरसारख्या क्रूर, हुकूमशाही, वंशवादी सत्ताधाऱ्याच्या मागे गेलेच नसते. मात्र कमळाचे फुल मिळवायचे तर चिखलात पाय घालावाच लागतो हे त्यांनी मान्य केले होते.

मुळात नेताजींवरही हिटलरने विश्वास सहजा सहजी ठेवलाच नव्हता. हा मनुष्य इथे येणे हा इंग्रजांचाच डाव असेल असे हिटलरचे कान भरणारे जर्मनीत होतेच. शिवाय जर्मनीत हिटलरचे क्रौर्य व सत्तेची हाव याचा तिरस्कार करणारे गटही कार्यरत होते, तेव्हा हा इंग्रजांचा हस्तक त्यांनीच आणला असावा का? हा किंतू हिटलरच्याही मनात होताच. मात्र सर्व धोके पत्करूनही त्याला हिंदुस्थानला मान्यता देणे व त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व मदत देणे त्याला लाभाचे वाटले कारण आशियातील हिंदुस्थानासारखा देश हातातून जाऊ लागला तर त्या देशाचा स्वातंत्र्य संग्राम दडपून टाकण्यासाठी त्यांची ताकद विभागली जाईल व इथे युरोपात त्यांना चिरडणे थोडे सुलभ होईल असा त्याचा अभ्यास होता.

युद्धात जर्मनीचा विजय झाला तर जर्मनीने भारताचे सार्वमौमत्व युद्धानंतर मान्य करायचे अशी स्पष्ट अट नेताजींनी घातली होती. शिवाय मला तुमचे सैन्य नको तर राजकीय व लष्करी साहाय्य हवे आहे हेही त्यांनी स्पष्ट केले होते.

आपण नेताजींवर उगाच आरोप न करता आपली शंका व्यक्त करून निरसन करायची संधी दिलीत याबद्दल आपले आभार.