कविता बरी आहे पण

तुझे-माझे फुलांचे ते ऋतू त्या मैफली साऱ्या
जुईचा गंध वाऱ्यातून येताना नव्या झाल्या

गंध वाऱ्यातून येताना मैफली नव्या झाल्यामधे येताना चूक. 

भरारी घेत काळाची पहा गेली कुपी मागे
सुखाचे ख्याल छोटे ऐकवाया मन्मनी आल्या

कुपीची भरारी? ख्याल ऐकवायाशी वरच्या तीन ओळींचा संबंध लागत नाही. मन्मनी जुनाट.

कसे ते वेड होते, बंध होते, पंखही होते
नदीचा वेग होता सागराचे मैत्रही होते
दुरावे ते क्षणांचे भांडणांच्या त्या खुळ्या गोष्टी
अबोला वाढता पाणावणारे नेत्रही होते

स्वतंत्र ओळी म्हणून ठीक आहेत पण चार ओळींचा एकमेकींशी संबंध काय?

जिवाचा गुंफलेला गोफ रंगानी झळाळावा
जसा या कुंतलांना मोगऱ्याचा गंध लाभावा
पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
कलेने एकएका रंग स्वप्नाला तसा यावा

परत गंध? पहिल्या ओळीचा दुसरीशी आणि वरच्या दोनचा खालच्या दोनशी संबंध लागत नाही.

दिवास्वप्नातल्या रंगीत शोभा त्या मनोहारी
कशा केंव्हा बुडाल्या सांग ना या घोर अंधारी
नभाच्या सांजरंगांचा पिसारा लोपला कोठे
कधी येतील का हाती पुन्हा आनंद माघारी?

दिवास्वप्न, अंधार, सांजरंग. बरेच बरे आहे. हाती किंवा माघारी एकच यायला हवे.

हवे आहेत ते तारे मला माझे पुन्हा सारे

आर्जव नाही. उर्मटपणे मागितल्यासारखे वाटते बुवा.

तुझ्या डोळ्यातल्या ज्योती, तुझ्या प्राणातली प्रीती,

डोळ्यातल्या ज्योती ठीक. प्राणातली प्रीती काहीतरीच.

उबारा आसरा दे वादळापासून थारा दे

उबारा?

सुखाची सावली दे, दे तुझ्या हातून दे मुक्ती

सावलीचा मुक्तीशी संबंध लागत नाही.

वृत्ताची एकही चूक नाही त्यामुळे वृत्ताचा सराव म्हणून ठीक पण एकंदर कविता म्हणून शून्य.