म्हणजे बेळगाव! ती भाषा आजही तिथलीच भाषा आहे. ते रेल्वे गेट, त्या आमराया, बहुदा त्या संगीत क्लाससारखे क्लास आजही तिथं आहेत. काही बंगले जाऊन तिथं इमारती उभ्या राहिल्या आहेत हा एक बदल. संतांच्या लेखनाचं हे बलस्थान की, तिथल्या अनेक मुलांना हा लंपन म्हणजे आपणच असं वाटतं.
दिवाळी तोंडावर आली की दरवर्षी मी विचार करतो संतांच्या हातून त्या दिवाळीच्या किल्ल्यांचं वर्णन कसं झालं असतं... आणि त्या विचारात हरवून जातो आणि मग दरवर्षी ठरवूनही त्या किल्ल्यांवर लेखन होतच नाही. काही केल्या लंपननं ते किल्ले उभे करण्याची, त्या किल्ल्यासमोर रचलेल्या गावाची किंवा त्या गावात नांदणाऱ्या जीवनाची कथा कशी केली असती हे उमगतच नाही. अर्थात, हेच त्यांचं मोठेपण.