अमेरिकेत सगळेच आलबेल आहे व तेथे ३६५ दिवस दिवाळी असते हा संभ्रम पसरवला जातो असे माझे मत आहे. तेथल्या काही मुलांबद्दल ऐकायला मिळाले, अत्यंत हट्टी, दुराग्रही, अप्पलपोटे, खोटारडे व जराही सामाजिक जाणीवांची भान नसलेली ही मुले असावीत असे वर्णनावरून वाटले.

ह्या तेथील काही मुलांवरून तिकडच्या सामजिक स्थितीबद्दल निष्कर्ष काढणे थोडेसे धार्ष्ट्याचे ठरेल. असेच मत एक छोटेसे भारतीय सँपल घेऊन कुणी भारताबद्दल बनवले तर? तेव्हा हे सोडून देऊ.

तेथे आलेल्या नैसर्गिक आपत्तींत एकमेकांना मदत करण्याऐवजी लुटफाट केल्याचे ऐकीवात आहे (मुंबईत २६ व २७ जुलै २००५ ला एकमेकांना मदत केल्याचे लाखभर किस्से येथे आहेत

दोन आपत्तींमध्ये एक महत्त्वाचा फरक होता. कत्रिनामुळे अमेरिकेत जे झाले ते अत्यंत पराकोटीचे नाशकारक होते, व ह्याची जाणीव तेव्हाच त्याच्यात सापडलेल्या नागरिकांना झाली होती. तुमच्यासमोर सर्व परिसर पूर्णपणे उध्वस्त होतो आहे, आता जीवन मरणाचा तीव्र प्रश्न समोर आहे--- जे गेले ते गेलेच, त्यांच्याबद्दल शोक करायलाही वेळ नाही, स्वतःच्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून मदत पोहोचेल तेव्हा पोहोचेल, तिला वेळ लागणार हेही उघड दिसत आहे. अशा टोकाच्या आपत्तीत सापडल्यावर माणूस स्वतःच्या बचावासाठी काय वाट्टेल ते करेल, हे मलातरी फारसे अनैसर्गिक वाटत नाही. मुंबईत जो 'महापूर' आला तेव्हा परिस्ठिती एव्हढी बिकट नव्हती. माणसे घरी कशी पोहोचणार हा त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांसमोर मूलभूत प्रश्न होता. मिठी नदीच्या आजूबाजूला रहाणाऱ्या लोकांची घरे उध्वस्त झाली हे खरे, पण जो तीव्र जीवनमरणाचा संघर्ष अमेरिकेतल्या त्या लोकांसमोर उभा होता, तसा अधिकांश मुंबईकरांच्या समोर नव्हता. खरे तर इथे सम गोष्टींची तुलना केलेली बरी. म्हणजे कत्रिनाच्या लूटमारीची तुलना तत्सम पुरात किंवा अशाच नैसर्गिक आपत्तीत पूर्णपणे उध्वस्त होत असलेल्या बिहार किंवा ओरिसा येथील गावात त्या त्यावेळी माणसे कशी वागतात, हे जर बघता आले तर बघावे. 'जर बघता आले तर' हे अशासाठी म्हटले, की तिकडे जे काही झाले ते परिपक्व माध्यमांच्यामुळे जगाच्या नजरेत आले. आपल्याकडे जेव्हा बिहार अथवा ओरिसामधे असे पूर येतात, तेव्हा तिथे प्रत्यक्ष काय चालले आहे, हे बघायाला असतो कोण?

जगातली सर्वात मोठी लोकशाही येथे आहे. ....

इथे माझ्या मनात काही मूलभूत शंका आहेत. लोकशाहीमुळे आपले खरेच किती भले झाले, आणि किती नुकसान? भले झाले असेल तर ते एव्हढेच की कुणीही काहीही म्हणायला मुक्त आहे. पण ह्यामुळे खरोखरीच एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपला फायदा काय झाला?  प्रत्येक व्यक्तिच्या हातात जे एक 'मत' नावाचे हत्यार आले, त्याचा त्या व्यक्ति किती चांगल्या प्रकारे वापर करून घेतांना आपल्याला दिसतात? अगदी शिकलेले सवरलेले लोक निवडणूकीत त्यांचे एक मत देणार, तसेच धर्म, जात-पात, त्याहीपलिकडे माझ्याच गल्लीतला उमेदवार असले अनेक निकष वापरून दुसरे कुणीही मते देणार. ह्या सगळयामुळे जो खेळखंडोबा आता आपल्यासमोर उभा आहे, त्याच्याबद्दल मुळापासून विचार निदान सुशिक्षित जनतेने तरी करावा? लोकशाही हे खेळणे नाही, त्यात तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतात हे खरे, पण त्याबरोबर काही जबाबदाऱ्याही तुमच्यावर येतात. थोडक्यात राजकिय व सामजिकदृष्ट्या परिपक्व जनता ही लोकशाही यशस्वी होण्यासाठी भरभक्कम पाया पुरविते. युरोपात हे आहे, ब्रिटनमधे हे आहे, व अमेरिकेतही हे आहे. हे तिथे आज तसे आहे, ह्याला एक मुख्य कारण म्हणजे युरोप व ब्रिटनमध्ये लोकशाही अनेक शतकांपूर्वी रुजली. त्याच्या अगोदर तिथेही अराजके, धार्मिकतेचा अवास्तव पगडा वगैरे सर्व होतेच. पण तेव्हापासून आता ते जेथे आहेत, तिथपर्यंत येण्यास त्यांना अनेक शतके मिळाली. ह्या देशात दोन, किंवा फारतर तीन मुख्य राजकिय पक्ष असतात, कुठल्याही इश्यूबद्दलच्या त्यांच्या भूमिका निसंदिग्ध असतात. मतदार त्यानुसार मतदान करतात. आपल्याकडे ह्याच्या उलट चित्र आहे, कारण आपली राजकिय परिपक्वता अजिबात नाही--ना राजकारण्यांची, ना सर्वसाधारण जनतेची.

आशियात जर आजूबाजूला नजर टाकलीत, तर काय आढळून येते? कुठे लोकशाहीचे प्रयोग यशस्वी झाली आहेत? मलातरी संपूर्ण आशियात एकही यशस्वी लोकशाही आढळत नाही. उलट लोकशाहीमुळे जास्त वाट लागलेली काही ही उदाहरणे: बांगलादेश, भारत (सर्वात मोठे), आता आता थायलंड, फिलीपाइन्स,इंडोनेशिया...  तैवान व द. कोरिया येथे पूर्वी लोकशाही नव्हती, व ज्या राजवटी होत्या त्यांनी सुबत्ता आणली. आता तिथे त्यांच्या 'पार्लमेंटस्' मधे अगदी आपल्या खासदारांनाही लाज वाटेल अशा मारामाऱ्या होतात! आज ही पार्टी तर उद्या दूसरी, असे तिकडेही चालू आहे अलिकडे. इंडोनेशियाची सुरुवातीच्या अनेक वर्षांची सुबत्ता सुहार्तोंच्या एकहाती अधिकारामुळे झाली. ते गेले, लोकशाही आली, आता त्यांची वाटचाल आपल्याच तऱ्हेने चालू आहे. अगदी छोटासा ई. तिमोर गेल्या काही वर्षात इंडोनेशियातून फुटून निघाला. तिथे अजूनही लोकशाही अजिबात रूळू शकलेली नाही. एकमेकांची डोकी ते फोडत होते (अक्षरशः) म्हणून आता तेथे ऑस्ट्रेलियन सैनिक गस्त घालताहेत! थोडक्यात, मला वाटते, आशियायी जनतेला लोकशाहीची संवय नाही. आपण सगळे पारंपारिक 'राजा'ला सर्वस्व मानणारे लोक. लोकशाही ही संकल्पनाच आपल्याला परकी. ती रुजून जेव्हा परिपक्व होणार, तेव्हा तिची फळे आपल्याला मिळणार. आपण ह्या बाबतीत गेल्या साठ वर्षात अधोगतीच केलेली आहे. तेव्हा, अजून बरीच दशके गेल्यावर कोठे आपण लोकशाहीचे खऱ्या अर्थाने गुणगान गाऊ शकू. पण आजच्या शतकात आपल्याला असा वेळ आहे काय, हा मुख्य प्रश्न आहे. प्रगत देशांतील लोकांना जेव्हा तुमचे (त्यांच्या मतलबासाठी) कौतूक करायचे असते, तेव्हा ते 'ही सर्वात मोठी लोकशाही' असे म्हणतात, त्यांचे काय जाते तसे म्हणायला? त्याची किंमत आपण, भारतीय जनता चुकवत आहे.

जगातली ४थी मोठी अर्थव्यवस्था - ८% जीडीपी रेट

८ % जीडीपीची वाढ हे खरे पण  'पर कॅपिटा इनकम' किती? किती टक्के जनता गरिबीरेषेच्या खाली राहाते? आणि गेल्या काही वर्षात जी काही वेगवान वाढ होते आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनामानात कितीसा फरक पडला?  

-....जगातली सर्वात वेगाने वाढणारी औद्योगिक वाढ.

ह्या विधानात काहीतरी चूक आहे असे मला वाटते. चीनची औद्योगिक क्षेत्रातली वाढ कुठे गेली?

भारतात सगळेच वाईट चालले आहे असे मानणे जसे चूक आहे, तसेच आमचे जे आहे, ते सर्व अभिमान बाळगण्यासारखे आहे, हे मानणेही चूकच आहे. त्याहीपेक्षा ते आपल्यालाच घातक आहे. जर आपले काही चुकत आहे असे आपल्याला वाटलेच नाही, तर ती 'चूक' आपण सुधारू शकणार नाही. त्यात तोटा आपलाच असणार आहे.

'इथल्या १०००० वर्षापूर्वीच्या संस्कृतीने आजवर कुठल्याही देशाला आपले मांडलिक बनवले नाही.'....' वगैरे विधानांबाबतीतही असेच लिहीता येईल. तूर्तास येथे थांबतो.

मी वर जे काही लिहीले आहे, ते बरेचसे नकारार्थी वाटले, तर माझा त्याला नाईलाज आहे. चर्चा मुद्यांवर व्हावी, व्यक्तिगत हल्ले नकोत, अशी अपेक्षा करतो.