परत माझाच अनुभव सांगतेय माफ करा. मी ३ वर्ष शिकायला होते यूएस मधे. त्या दरम्यान एकदा सुट्टीसाठी आणि शेवटी परत येताना. लोकांच्यासाठी वस्तू आणल्या होत्या. पण ह्यांच्यासाठी अमुक त्यांच्यासाठी तमुक हे फक्त जवळच्या लोकांसाठी ज्यांना आपण लक्षात ठेवून काहीतरी आणलं याचंच अप्रूप असतं. मग ते अमेरीकेतून असो नाहीतर गडचिरोलीतून.
बाकी आल्यागेल्यांच्यासाठी चॉकलेटस किंवा अश्याच काही फुटकळ गोष्टीच. त्या वेळेला कुणाला वाटलं पण असेल की हे काय आमच्यासाठी काही आणलं नाही इत्यादी... पण कदर तरी कशाला करायची अश्या वृत्तीची? आणि दुःखी तरी का व्हायचं? हे लोक थोडीच आपल्या गरजेच्या वेळेला मदतीला येतात! मुरडली नाकं तर मुरडू देत की काय फरक पडतो.
आपण गिफ्टस कशासाठी घेतो? ज्यांना देतो त्यांचं आयुष्य त्याविना चालत नाही म्हणून नाही तर आपल्याला त्या त्या लोकांना काहीतरी देऊन बरं वाटणार असतं. त्यांचा आनंद बघायचा असतो किंवा त्यांना दिपवून तरी टाकायचं असतं. आणि यातलं काहीच घडलं नाही की आपण उदास होतो आणि एवढं आणलं तरी समाधान नाही असं म्हणायला लागतो. दिलेलं एका हाताचं दुसऱ्या हाताला कळता कामा नये असं म्हणतात आपल्या मराठी संस्कृतीत तर कशाला अपेक्षा ठेवायच्या? दिलं विषय संपला. आणि जर ते शक्य नसेल तर ज्यांना आपलं कौतुक आहे त्यांनाच द्यावं बाकीच्यांना सरळ सांगावं की माझा चॉइस तुम्हाला आवडेल की नाही असं वाटलं म्हणून काही आणलं नाही. ही घ्या चॉकलेटस.
आपणच उगाच देण्याचं कंपलशन घालून घेतो स्वतःवर. आपल्याला मनापासून जेवढ्यांच्यासाठी घ्यावसं वाटतं काही तेवढ्यांसाठी घ्यावं. गिफ्टस घेणं कंपलसरी व्हायला लागलं की देण्यातला आपला आनंद संपतो आणि मग ते गिफ्टही काहितरी चुकीचं निवडलं जातं आणि घेणारा न वापरता ठेवून देतो.
असो विषयांतराबद्दल क्षमस्व.