कर्णावर सरसकट टीका करण्याआधी काही गोष्टींचा विचार करायला हवा. कुंतीच्या एका चुकीमुळे कर्णाच्या पूर्ण आयुष्याची शोकांतिका झाली. एवढे अपमान,अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नसेल.दुर्योधनाने त्याचं शौर्य, गुण बघून त्याला राजेपद दिलं जे सुतपुत्राला दुर्लभच होतं.म्हणून जर तो दुर्योधनाशी एकनिष्ठ राहिला तर त्यात काय चुकलं? जर कर्ण सुतपुत्राऐवजी ज्येष्ठ पांडव असता तर त्याचा उदोउदो झाला असता, युधिष्ठिराने त्याचे पाय धुतले असते, नकुल सहदेवाने ज्येष्ठ भ्राता म्हणून गौरवलं असतं आणि द्रौपदी, जी आधीच पाच जणांची बायको होती तिलाही काय फरक पडला असता? एक सुतपुत्र ज्याची कल्पनाही करू शकणार नाही असं वैभव दुर्योधनाने त्याला मिळवून दिलं.
           आणि कर्णाच्या चुकांबद्दल एवढं बोललं जातं तेव्हा मुळ पांडवांनी तरी असे काय गुण उधळले होते? स्वयंवरात द्रौपदीने प्रथम सुतपुत्राला वरणार नाही म्हणून अपमान केला, मयसभेत  पाण्यात पडल्यावर आंधळ्या वडिलांवरून दुर्योधनाचा अपमान केला, लहानपणी भीम कौरव बसलेल्या झाडांना मुळापासून उपटून टाकत असे तेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न कौरवांनी करणे साहजिक होते. महाभारत युद्धात नरो वा कुंजरो प्रकरणाने द्रोणाचार्यांना मारलं, भीष्म शिखंडीला मारणार नाहीत हे माहित असून त्याच्याकडून त्यांच्यावर शरवर्षाव केला, अर्जुनाच्या खुळचट प्रतिज्ञांमधून कृष्णाच्या धोरणीपणाने त्याला वाचवलं, जयद्रथ वधावेळी सावरून घेतलं, अर्जुनाने रिक्तहस्त कर्णावर बाण चालवला, युद्धाच्या शेवटी भिमाने मांडीखाली वार करून दुर्योधनाचा प्राण घेतला.असे अनेक छक्केपंजे त्यांनी केल्यावर मग कर्णाबद्दल ओरड का?
           उलट अगोदर माहिती असूनही दानशूरपणा अभंग ठेवत इंद्राला कवच कुंडलं दिली, आपल्या जन्माचं रहस्य कळल्यावरही कौरवांच्या बाजूला अचल राहिला, आपल्या पत्नी मुलांवर नंतरही तेवढंच प्रेम केलं, युद्धात प्राणपणाने लढला.आयुष्यभर नियतीच्या हातातलं बाहुलं असलेल्या कर्णाने मग काय करायला हवं होतं?
           मला तरी यात काही लार्जर दॅन लाईफ आणि चुकांची भलामण दिसत नाही.