मराठी भाषा 'स्वर', 'स्वर+स्वर' आणि 'व्यंजन+स्वर' अशा स्वराने शेवट होणाऱ्या अक्षर रचनेतून बनली आहे. स्वराने शेवट होणाऱ्या अक्षर रचनेला 'विवृत्त-अक्षर-रचना' म्हणतात. संस्कृत भाषा विवृत्त आणि संवृत्त अक्षर रचनेतून बनलेली आहे. त्यामुळे संस्कृत भाषेत शब्द संधी होतात आणि मराठीत होत नाहीत. आजपर्यंत हा मूलभूत सिद्धांत कोणी मांडलेला नाही. माझ्या 'मानवी भाषा विज्ञानः उच्चार सातत्य' या ग्रंथात मी तो मांडला आहे.
प्रत्येक भाषा स्वतंत्र, तटस्थ आणि स्वतःचे 'मी-पण' सांभाळून असते. तरच तिला भाषेचा दर्जा मिळतो. मराठी-भाषा स्वतंत्र, तटस्थपणे स्वतःचे 'मी-पण' सांभाळते. तिला इतर कोणत्याही भाषेचा, अगदी संस्कृत भाषेचाही, पांगुळगाडा वापरण्याची गरज नाही.
आजपर्यंत मराठीचा मराठीपणातून मराठीसाठी विचारच केला गेला नाही. संस्कृत आणि मराठी यांची लिपी एकच असल्याने आजपर्यंत व्याकरणकारांच्या हे लक्षातही आले नाही. गेली २० वर्षे अभ्यास करून, 'कविता-आस्वाद आणि गजल-आस्वाद' सॉफ्टवेअर बनविताना केलेल्या संशोधनातून हे लक्षात आले आहे. याबाबत विविध माध्यमातून प्रसार करण्याचे मी ठरविले आहे. मराठीच्या अस्मितेचे मला उमगलेले विविध भाग प्रस्ताव आणि मसूदा म्हणून मी मांडू इच्छीतो.
विवृत्त अक्षर रचना याबाबत आपली मते कळवा. शंकांचे निरसन करण्यासाठी मोबाईल: ९८३३१०२७२७.