आय टी वाले फक्त ए. सी. मध्ये बसून नोटा 'छापण्याचे' काम करतात, त्यांच्या घरी पैशाचे झाड असते, जमिनीचे भाव वाढण्यापासून ते अगदी पुण्यात अलिकडेच पडलेल्या कडाक्याच्या थंडीपर्यंत अनेक गोष्टीला आयटी वाले जबाबदार असतात इथपर्यंत (मुख्यतः नॉन आयटी वाल्यांचे) गोऽऽऽड गैरसमज मी आजवर ऐकत आले आहे. बेकार (म्हणजे बेरोजगार नव्हेत), रिकामटेकडे, बिनकामाचे, बेंचवाले असेच लोक मनोगतासारखी संकेतस्थळे आणि अनुदिन्या इथे मुक्त संचार करीत असतात असेही मनोगतावरच्या काही लोकांचे मत आहे. त्यांच्या संपर्कातील बरीच मंडळी बिनकामाची, बेंचवाली असणार यात शंका नाही पण हा नियम सरसकट सर्व आयटी वाल्यांना लावायची गरज नाही. हा म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचाच प्रकार झाला. जे आपलं काम अगदी निष्ठेने आणि मन लावून करत असतील त्यांना स्वतःलाच चोवीस तास स्वतःच्या खाजगी, मनोगतासारख्या सार्वजनिक किंवा अनुदिन्यांसारख्या दोन्ही प्रकारात मोडणाऱ्या अड्ड्यांवर पडिक राहायला वेळ मिळणार नाही.
राहिला मुद्दा कर्मचारी कपात करण्याचा. बी. ई. सिव्हिल किंवा बी. एस्सी ऍग्रिकल्चर करून दोन महिन्यांचा जावा कोर्स करायचा आणि आय टी प्रोफेशनल म्हणून मिरवायचे अशीही असंख्य उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. टेस्टिंग मध्ये शिरायचं पण प्रोग्रामिंग कशाशी खातात याचा गंध नसलेली ही लोकं कमी झाली तरी काय बिघडणार आहे? त्यांची जागा घ्यायला अनेक नवीन लोक एका पायावर तयार आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे आयटी मध्ये ज्यांना खरंच या क्षेत्रातलं ज्ञान आहे असे लोक किती आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले , निळे कोल्हे असलेले लोक किती याची खातरजमा कुणी केली आहे का? काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी किती लोक कामात खरोखरच निष्णात होते याची आकडेवारी कोणी काढली का? या कपात केलेल्या लोकांपैकी किती लोकांना संगणक आणि संगणकाशी संबंधित क्षेत्रांबद्दल खरी आस्था होती आणि किती लोक या गोल्ड रशमध्ये वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला आले होते हे कोणी पाहिलंय?
ज्या लोकांमुळे आज या क्षेत्राला सोन्याचे दिवस दिसले त्या १९६०, १९७०, १९८० च्या दशकांमधल्या प्रोग्रामर्सच्या कष्टांबद्दल या दोन महिन्यांच्या जावा कोर्स मध्ये किती शिकायला मिळतं? यातल्या किती लोकांना संगणकाशी संबंधित तांत्रिक गोष्टींमध्ये रस असतो? संगणक हे केवळ चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, चॅटिंग करणे आणि पैसा मिळवणे एवढ्याच गोष्टींसाठी उपयोगाला येणारं एक साधन आहे असं समजणाऱ्या लोकच आज इथे बहुसंख्य असतील. काढून टाकलेल्या किती लोकांना या सगळ्याची जाणीव होती?
आयटी मधला पैसा दिसतो पण इथे काम करणाऱ्याला दिवसाचे चोवीस तासही पुरे पडत नाहीत हे कधी कोणाला दिसत नाही. प्रश्न फक्त पैशांचा नाही. या क्षेत्रात आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारीही अनेक माणसे आहेत. दोन हजार साली वाय टू के प्रश्नामुळे अमेरिकेला अगदी पंढरीच्या वारीपेक्षाही जस्त संख्येने माणसं गेली. तो प्रश्न संपला, अमेरिकेत कर्मचारी कपात झाली तेंव्हाही असंच चिंतेचं वातावरण होतं. इतके दिवस ही कपात देशाबाहेर असल्यामुळे भारतीय निवांत होते. आता ते वादळ घरापर्यंत येऊन ठेपलंयहे खरं आहे. पण या कर्मचारी कपातीचं एक कारण हेही असू शकेल की सरकारकडून आय टी क्षेत्राला मिळणारी कर सवलत आता बंद करायचे संकेत मिळत आहेत. आय टी हे लाडावलेलं बाळ असून त्याला आता शिस्त लावली जाणार आहे असं अलिकडेच एका सरकारी प्रवक्त्याने कबूल केलेलं आहे. मऊ लागलं की कोपराने खणू पाहणाऱ्या लोकांची भाऊगर्दी उसळल्यावर या क्षेत्रात हे आज ना उद्या घडणारच होतं. केवळ प्रतिस्पर्धी कंपनीकडे इतके कर्मचारी आहेत म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कर्मचारी मिळवणार या ईर्ष्येने गेली काही वर्ष अनेक कंपन्यांमध्ये युद्ध सुरू होतं. देशभर फिरून केवळ आपलं मनुष्यबळ कसं जास्त आहे हे दाखवण्यासाठी या कंपन्या नुसती नोकरभरती करत होत्या. अति तिथे माती होतेच. तेंव्हा वेड लागल्यासारखी माणसं भरत गेलेल्या या कंपन्या त्या माणसांना काढताना तोच विचार करतील हा विचार तेंव्हा कोणाला सुचला पण नसेल.
या प्रश्नावर मनोगतावर चर्चा करून हाती काहीही लागेल असं वाटत नाही. अभय नातू म्हणतात तशी उदाहरणेही प्रत्यक्षात फार दुर्मिळ नाहीत हे मी मान्य करते. पण सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा नियम आय टी लाही लागू पडत असल्यामुळे लेटस सी व्हॉट रियली हॅपन्स!
--अदिती