श आणि ष यांच्या उच्चारातला फरक मराठीतून गेला आहे, हे फक्त ज्यांना हे उच्चार करता येत नाहीत तेच म्हणतात. अजूनही आकाशवाणीवर भाषणे करणारे बरेचजण ह्या दोन्ही व्यंजनाचे वेगवेगळे उच्चारण, फरक सहज समजेल इतक्या स्पष्टपणे करतात. माझ्या लग्नाअगोदर माझे असेच एक भाषण माझ्या सासऱ्यांनी ऐकले आणि त्यातल्या माझ्या श-षंच्या स्पष्टोच्चारांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. नुकत्याच पुण्यात झालेल्या शुद्धलेखन-चर्चासत्रात काहीजणांनी न-णचा फरक ८० टक्के लोकांना समजत नाही म्हणून ण हे अक्षर मराठीतून काढून टाकावे असे जोरदार मत मांडले. माझ्या मते मराठीतच नव्हे तर भारतातील, किंबहुना जगातील कुठल्याही बोलीत, मराठीत नसलेला एखादा उच्चार असेल, तर तो मराठी लिपीत लिहिता यायला हवा, असा आपला प्रयत्न असला पाहिजे. अर्थात हे काम अक्षरसंख्या आटोक्यात ठेवून करणे अत्यंत दुष्कर आहे. पण निदान असलेले उच्चार काढून टाकणे हा वेडेपणा आपण करू नये. 'क्लृप्ती' हा एकुलता एक शब्द जोपर्यंत मराठीत आहे तोपर्यंत ऌ हा स्वर भाषेत असलाच पाहिजे. त्याशिवाय संस्कृतमध्ये ऌट् म्हणजे दुसरा भविष्यकाळ आणि ऌङ् म्हणजे संकेतार्थ हे आपण कसे सांगू शकणार? असाच काहीसा विचार करून मल्याळी लोकांनी लिपी-सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आता अशी परिस्थिती झाली आहे की नव्या पद्धतीने शिकलेल्या मल्याळींना धड नवी अक्षरे वाचता येत नाहीत आणि जुनी तर अजिबात जमत नाहीत.
लीला गोविलकरांचे भाषण ऐकायचा योग एकदा आला होता. काही मते पटली नाहीत. त्यांच्या व्याकरणाच्या पुस्तकात इंग्रजीत ण आणि ञ हेदेखील अनुनासिक उच्चार आहेत असे वाचल्यानंतर, त्यांच्या ज्ञानाबद्दलचे माझे मत आधीच जरा बेतासबात झाले होते.