सध्या सर्व प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मानगुटीवर (पडद्यांवर म्हणू वाटल्यास ) टी आर पी चे भूत येऊन बसले आहे. जास्तीत जास्त प्रेक्षक संख्या मिळवण्यासाठी या वाहिन्या वाट्टेल ते खोटे नाटे दाखवण्यासही कमी करत नाहीत.

सबसे तेज राहण्याच्या नादात अफवा पसरवणे , एखादी बातमी खरी असली तरी मीठ मसाला लावून सांगणे, बॉम्बस्फोटासारख्या गंभीर बातमीत मृतांचा आकडा फुगवून सांगणे या सारखे अप-प्रकार चालतात. हकीकत जैसी खबर वैसी असे घोषवाक्य असलेली एक वाहिनी सध्या जिथे तिथे पौराणिक काळातील संदर्भ शोधण्यात गुंतली आहे. आपको रक्खे आगे असे म्हणणाऱ्या एका वाहिनीने आपल्याला त्या खलीच्या तोंडी देणे तेवढे बाकी ठेवले आहे.

शिवाय रोज सकाळचे बचके रहना , दिन कैसे गुजरेगा असे फालतू भविष्याचे कार्यक्रम असतातच. ग्रहण असले की कुडमुड्या ज्योतिषी मंडळींना बोलवून प्रेक्षकांकडून प्रश्न विचारले जातात. ग्रहणाचे खरे खगोलीय कारण सांगणा-या नेहरू तारांगणाच्या व्यक्तीला ५ मिनिटात कटवले जाते. रात्रीच्या वेळी गुन्हेगारी मालिका किंवा मंत्र तंत्र यांचा रतीब असतो.

या सर्वांच्या जोडीला चित्रपटातील तारे आणि तारका आहेतच. क्रिकेट असले की तर २४ तास तेच. क्या भारत आज ऑस्ट्रेलियाको हरा पायेगा? त्यावर स्पर्धा. अरे त्या तथाकथित ज्योतिषींनाच का विचारत नाहीत? ११ खेळाडूंच्या किंवा कर्णधाराची पत्रिका द्या आणि विचारा की

वृत्तवाहिन्यांनी निरपेक्ष वृत्त द्यावे अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण बहुतेक हिंदी भाषक वाहिन्यांनी मनसेच्या उत्तर प्रदेश , बिहारी विरोधी आंदोलन प्रकरणाला अक्षरशः मराठी विरूद्ध अमराठी असे भडकावू स्वरुप दिले. परवा तर ठाण्यात उत्तर भारतीयांनी लालूंचा पुतला जाळला. एकाने स्पष्ट शब्दात तिकडच्या नेत्यांनाच जबाबदार धरले. ते मात्र सहारा मुंबई  या एकाच वाहिनीने दाखवले.

थोडक्यात महत्त्वाच्या, माहितीपूर्ण, विज्ञानाशी संबंधित गोष्टी सोडून अंधश्रद्धा आणि स्वस्त प्रसिद्धीला हपापलेली ही माध्यमे जनतेच्या भल्याचे काय दाखवणार?

वाहिन्यांबद्दलचे सर्वेक्षण कुठे कुठे वाचनात येत असते. पण आपले आपणच या वाहिन्यांचे मूल्यमापन नक्कीच करू शकतो. अशा तद्दन गल्लाभरू वाहिन्यांपेक्षा ई-टीव्ही मराठी आणि झी २४ तास या वाहिन्या खूपच दर्जेदार आहेत असे मला तरी वाटते.