भाषेची जाण -
तुम्ही म्हणता ती संस्कृतात लिहिलेली वाक्ये मला वाचता येतात कारण मराठी आणि संस्कृत लिहिताना देवनागरी वापरली जाते. भाषा-भाषांमध्ये शब्दांची देवाण-घेवाण चालूच असते त्यामुळे बरेचसे शब्द समण्यासारखे असतात. परंतु ह्याचा अर्थ भाषा समजते अथवा कळते असे म्हणणे योग्य नाही. भाषेचे किमान व्याकरण जसे धातू, क्रियापदे, लिंग, वचन इ. कळायला काही वेळ द्यावा लागतो. आज मला गुजराती ऐकताना अथवा वाचताना बऱ्यापैकी समजते परंतु ह्याचा अर्थ मला गुजराती बोलता / लिहिता येईलच असे नाही.
भाषा आणि जात -
दुर्दैवाने एकीकडे विविधतेत एकतेची जपमाळ ओढताना दुसरीकडे मात्र प्रत्येक विषयाची जात/भाषा/प्रदेश इ. शी सांगड घालण्याचा मनोविकार आपल्या सगळ्यांनाच जडला आहे. त्याला संस्कृत तरी कशी अपवाद ठरेल?
इतिहास आणि साहित्य -
रामायण/ महाभारतातील दाखल्यांनी भाषेचे महत्त्व अथवा अस्तित्व पटवून देताना मुद्दे मांडणाऱ्यांनी आणि खोडून काढऱ्यांनी त्यांची मते अभ्यासपूर्ण आहेत का हे तपासायला हवे. भारतातले रामायण थायलंडमध्येही आहे. भारतातल्या रजताभिषेक, सुवर्णाभिषेक या शब्दांचे थायलंडमध्ये सुवर्नापिसेक आणि रचतापिसेक असे बदल होतात मात्र अर्थ तेच राहतात. याचा अर्थ थायलंडमध्येही पूर्वी संस्कृत भाषा प्रचलित होती अस अर्थ काढावा काय? थायलंडमध्ये शब्द हे पाली भाषेतून गेले. अशावेळी पाली , संस्कृत भाषेचे परस्पर संबंध तपासणे क्रमप्राप्त ठरते हे आपण मान्य करणार का? त्याचा खोलात जाऊन अभ्यास करायला आणि मत आपले मत मांडायला नको का? साहित्यातून शब्द, कल्पना, विचार, अर्थ यांची देवाण घेवाण होते; पण त्यात वापरलेली भाषा तीच आणि तशीच असेल/राहील अथवा तीची स्थित्यंतरे का व कशी झाली हे सांगायला सबळ पुराव्यांची गरज लागेल.
बदल-
भाषा प्रवाही असते. शिवरायांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यात फरक नाही काय? "शिवराज्यात अआइ भाषा होती. काही वर्षांपूर्वी मराठी बोलली जायची. आज आम्ही पफब भाषेत बोलतो" असे विधान आणखी ५०० वर्षांनी कोणी केल्यास त्याला कोणत्या मुद्द्यांवर हरकत घेता येईल?
संस्कृत भाषेबद्दल आदर आणि अभिमान मलाही आहे. पण कालौघात आम्हीच संस्कृतला पळी-पंचपात्रात भिजत ठेवले त्याकरता इतरांना दोष देण्यात काय हशील?