भाषा प्रवाही असते. शिवरायांच्या काळातील मराठी आणि आजची मराठी यात फरक
नाही काय? "शिवराज्यात अआइ भाषा होती. काही वर्षांपूर्वी मराठी बोलली
जायची. आज आम्ही पफब भाषेत बोलतो" असे विधान आणखी ५०० वर्षांनी कोणी
केल्यास त्याला कोणत्या मुद्द्यांवर हरकत घेता येईल?
रोचक मुद्दा आहे. संस्कृत, शिवकालीन मराठी आणि आजची मराठी यांच्यात एक सातत्य (continuity) आहे. अत्यंत ढोबळमानाने बोलायचे झाल्यास महाराष्ट्रप्रदेशातल्या बोली गीर्वाणात (किंवा या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या तत्कालीन गीर्वाणजन्य किंवा गीर्वाणसदृश बोलीभाषेत) कालान्वये थोडेथोडे बदल होतहोत त्याची परिणती पुढे हळूहळू या भाषेचे रूपांतर अगोदर शिवकालीन मराठी भाषेत आणि नंतर अर्वाचीन मराठी भाषेत होण्यात झाली.
तसे बघायला गेले तर रोजच्या पातळीवर हे बदल नगण्य असावेत. कालची (किंवा मागच्या महिन्यातली किंवा अगदी गेल्या वर्षीचीही) भाषा आणि आजची भाषा यांत फरक जाणवणार नाही. पण शेकडो किंवा हजारो वर्षांत हा बदल खूपच जाणवतो.
तसे म्हटले तर महाराष्ट्रातील शिवकालीन भाषा आणि आजची भाषा या एकच भाषा आहेत, हे कशाच्या आधारावर म्हणायचे? दोन्ही भाषांना 'मराठी' हे एकच लेबल कशाच्या आधारावर डकवायचे? उलटपक्षी सातत्य हेच जर यामागचे कारण असेल, तर महाराष्ट्रात आजही आपण गीर्वाण बोलतो, असे का म्हणायचे नाही? सातत्याने हळूहळू बदलणारी भाषा ही नेमकी कधी 'वेगळी भाषा' झाली म्हणून गणता यावी?
समांतर उदाहरण घ्या. समजा माझ्याकडे एक बुटांचा जोड आहे. यापुढे (उदाहरणापुरते) असेही समजा की मी एक अत्यंत काटकसरी मनुष्य असून मला शक्यतो नवीन वस्तू विकत घेण्यासाठी पैसे खर्च करायला आवडत नाही (काश!) - शक्यतो आहे तीच वस्तू, वेळ पडल्यास दुरुस्त वगैरे करून वापरतो.
एके दिवशी माझ्या डाव्या बुटाचा तळवा (सोल) झिजला / तुटला. म्हणून मी चांभाराकडे जाऊन त्या बुटाला नवीन तळवा बसवून आणला. काही दिवसांनी उजव्या बुटाच्या तळव्याची (सोलची) तीच गत झाली. पुन्हा चांभाराकडे जाऊन यावेळी उजव्या बुटाला नवीन तळवा बसवला.
असेच बरेच दिवस आनंदाने चालले होते, तेवढ्यात डाव्या बुटाचा वरचा भाग फाटला. पुन्हा चांभाराकडे जाणे आले. यावेळी चांभाराने "काय साहेब, किती दिवस याच बुटांवर चालवणार? एवढी कसली कंजूषी? नवीन बूट घ्या की त्यापेक्षा - पाहिजे तर स्वस्तात बनवून देतो!" वगैरे आगाऊपणा केला, पण त्याला "तुला कशाला चांभारचौकशा? सांगितले तेवढे कर!" म्हणून झापले, आणि डाव्या बुटाचा वरचा भाग नवीन बसवून घेतला. दोन महिन्यांनी उजव्या बुटाचा वरचा भाग फाटला असता पुन्हा चांभाराकडे जाऊन तोही बदलून घेतला. यावेळी मात्र चांभाराने कटकट केली नाही. (त्याला बहुधा सवय झाली असावी.)
तर सांगण्याचा मुद्दा: आजच्या माझ्या बुटांत एक रेणूदेखील 'वरिजिनल' नाही. सातत्य मात्र आहे. तर मी आज बुटांचा जुनाच जोड वापरतोय की पूर्णपणे नवा?
तसे बघायचे झाले तर आपल्या शरीराच्या पेशी रोज थोड्याथोड्या मरून त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. त्यामुळे मी जन्माला आलो तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दिसण्यात, आकारात, बोलण्यात वगैरे तर सोडाच, पण माझ्या शरीरातल्या पेशींमध्येसुद्धा रोज थोडेथोडे करत जमीनअस्मानाचे फरक होत गेले आहेत. मग, उदाहरणादाखल, मी ऐशी वर्षांचा होईन तेव्हाच्या माझ्यात नुकत्याच जन्माला आलेल्या माझ्यातले मूळचे बहुधा काहीही नसेल. मग ऐशी वर्षाचा मी आणि नुकताच जन्माला आलेला मी या दोन्ही एकच व्यक्ती कशा? त्यांना कायद्याने दोन भिन्न व्यक्ती का मानू नये? किंवा 'जन्माला येतो एक, आणि मरतो दुसराच कोणीतरी' असे का मानू नये? किंवा, समजा एखाद्याने विशीत असताना खून केला आणि चांगला ऐशी वर्षांचा होईपर्यंत सापडलाच नाही आणि त्यानंतर सापडला, तर 'मी विशीत असताना हा खून केला होता हे जरी सत्य असले, आणि विशीतला मी आणि ऐशी वर्षांचा मी यांच्यात सातत्य जरी असले, तरी आम्ही भिन्न व्यक्ती आहोत, त्यामुळे मी खून केला नाही आणि तुम्ही मल फाशी देऊ शकत नाही' असा युक्तिवाद करून सहीसलामत सुटू शकेल काय? (अर्थात या सगळ्यात एक मेजर गोच [मराठी / नागरी मराठी?] आहे, जी लक्षात आली तर हे असे का होऊ शकणार नाही हे लगेच कळेल. शोधा पाहू!)