रामायण-महाभारताचे माहीत नाही.
सर्वप्रथम या वाक्याबद्दल धन्यवाद कारण आपल्याला जी गोष्ट ठाम माहित नाही त्याबद्दल मत द्यावे परंतु आपले विचार इतरांवर लादू नयेत असे मला वाटते. तेव्हा रामायण महाभारताचे माहित नाही असे म्हणण्याबद्दल धन्यवाद.
परंतु,
ज्याअर्थी शंकराचार्यांनी केरळ ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असा प्रवास करून भारतभर वैदिक धर्माचा प्रचार केला, अनेक विद्वानांशी वाद केले, अनेक ग्रंथ संपादन केले आणि त्या प्रवासात त्यांना भाषेची कसलीही अडचण आली नाही, त्याअर्थी भारतभर संस्कृत समजणारी सामान्य माणसे असली पाहिजेत.
येथे नेमके काय म्हणायचे आहे? विद्वान हे सामान्य होते का सर्वच सामान्यजन विद्वान होते? प्रश्न खोचक आहे हे मान्य परंतु अशी विधाने करून दिशाभूल जाणीवपूर्वक होते का नकळत होते ते कळले नाही. आता मला नेमके काय म्हणायचे आहे ते सामान्यजनांच्या भाषेत सांगते. सर्व विद्वानांना ते कळेल अशी आशा करते.
उदाहरण १:
समजा, मी द. मुंबईतील नरिमन पॉईंटमधील एक मिटींगमध्ये इंग्रजीत भाषण देऊन, लोकांची वाहवा किंवा निंदा स्वीकारून खाली उतरले. रस्त्यावर एक टॅक्सी थांबवून त्याला सांगितले "एअरपोर्ट?" टॅक्सीवाल्याने मला आत घेतले. रस्त्यावरून जाताना त्याने विले-पार्ले असा फलक वाचल्यासारखे केले आणि विमानतळावर टॅक्सी थांबल्यावर मी त्याला माझी पर्स उघडत विचारले "हाऊ मच?" त्याबरोबर त्याने मला भाडे सांगितले. विमानात बसल्यावर मी माझ्या डायरीत नोंद केली की इंग्रजी हीच भारताची प्रमुख भाषा असून ती सर्वसामान्य तळागाळातील लोकांना समजते.
याचप्रमाणे, प्रवास करताना शंकराचार्यांनी* एखाद्या घरात जाऊन "भिक्षां देही माते।" अशी विचारणा केली आणि त्याबरोबर त्या गृहिणीने त्यांना भिक्षा आणून दिली याचा अर्थ तिच्या रोजच्या संवादाची भाषा संस्कृत होती असे मानावे की तिला संस्कृताचे ज्ञान होते असे मानावे? किंवा शंकराचार्यांनी प्रवासाचा थकवा आल्याने एखाद्या वृक्षाखाली विश्रांती घेतली आणि तेथील मनोहर दृष्य पाहून त्यांना त्या वृक्षाशी संवाद साधावासा वाटला आणि त्यांनी त्या वृक्षाला उद्देशून कविता रचली म्हणजे वृक्षाला संस्कृत येत होते असे मानायचे काय?
संपादन करणे, विद्वानांशी चर्चा करणे, त्या सर्वांना संस्कृत येणे आणि सामान्यजनांना संस्कृत येणे यात निदान मला तरी फरक दिसतो.
तेव्हा मुद्दा असा की एखाद्याने संस्कृत येत नाही म्हटल्यावर त्यात लेखिकेने रागवण्यासारखे काय आहे? समजा की टॅक्सीत बसल्यावर मी त्या टॅक्सीवाल्याशी इंग्रजीत संभाषण सुरू केले आणि त्या टॅक्सीवाल्याने सांगितले "म्याडम, मुझे अंग्रेजी बिल्कुल नहीं आती।" (असं तो हिंदीतच सांगेल अशी दाट शंका आहे.) असं म्हटल्यावर मी त्याला तिथे झाडायला सुरूवात करावी काय की, "एअरपोर्ट बोला तो समझा, अभी बोलता है की नहीं समझती अंग्रेजी, ऐसे भडक और सवंग विधान करके तुम प्रसिद्ध होना चाहता है।" (आमचं हिंदीच ज्ञान इतकंच.)
एकंदरीत, या चर्चेत मांडलेले विचार पाहता माझा मुद्दा अद्यापही स्पष्ट होत नसावा अशी शंका आहे म्हणून आणखी एक उदाहरण देते.
उदाहरण २:
गेल्या एक दोन दिवसांत उपक्रमावर गाथा सप्तशतीतील महाराष्ट्री प्राकृतात लिहिलेल्या काही गाथा वाचायला मिळाल्या. त्यातील एक गाथा येथे देते -
अमिअं पाउअ कव्वं,पढिउं सोउं अ, जे ण आणंती।
कामस्स तत्ततन्तिं, कुणन्ति ते कहं ण लज्जन्ति ?।
आता यापूर्वी मी महाराष्ट्री प्राकृत भाषा कधीही पाहिलेली, ऐकलेली नाही. ही आमच्या मराठीची माय असण्याची शक्यता आहे बरं का! पण तिच्याबद्दल कोणीच रडारड करत नाही. संस्कृताचेच असे का व्हावे कोण जाणे . असो. तर, सांगायचा मुद्दा असा की मला भाषांविषयी प्रेम कमीच असल्याने फारसं काही कळलं नाही परंतु कुणन्ति ते कहं ण लज्जन्ति ? याचा अंदाजे अर्थ लागला, कारण कुण, लज्ज, ण ("न") हे शब्द मराठीमुळे परिचयाचे असल्याने "कोणाला याची लाज कशी वाटली नाही?" या प्रमाणे काही अर्थ असावा असे वाटून गेले. समजा, हा अर्थ बरोबर निघाला तर उद्या मी पुन्हा केलेले "मला महाराष्ट्री येत नाही" हे विधान खोटे ठरेल का? आणि अमिअं पाउअ कव्वं,पढिउं सोउं अ, जे ण आणंती। या वाक्याचा अर्थ अजिबात कळला नाही त्याचे काय?
तेव्हा, एखाद्या भाषेतील शब्द मला अंदाजाने कळले तर ती भाषा मला येते असा अर्थ होतो का? तसे असल्यास मला पंजाबी, बंगाली, स्पॅनिश, इटालियन, तामिळ, कन्नड आणि जगातील अर्ध्या अधिक भाषा येऊ शकतील.
असो, प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवनागरी भाषा म्हणजे देवांचीच भाषा किंवा आम्ही म्हणू तेच सुंदर याच थाटात द्यायची असल्यास चर्चा करण्यात उद्देश नाही.
* शंकराचार्यांनी भारतभर प्रवास कसा केला ते मला फारसे माहित नाही. त्यांच्याबद्दल दिलेली उदाहरणे सहज आहेत. त्यांच्याऐवजी तत्कालीन विद्वानाचे नावही टाकता येईल.