विडंबन म्हणजे नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावाच, चेष्टा नसावीच. मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत. यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.