मी विवेक दाणि यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे.
पत्रिकेत मंगळ असणे व त्याचे भले-बुरे फलित मिळणे याला काहीच वैज्ञानिक आधार नाही.एखाद्या जळूप्रमाणे चिकटून राहिलेली एक पारंपारिक समजूत एवढेच त्याचे "अकारण महत्त्व" उरले आहे.(जळू तरी रक्त पिऊन सोडेल पण या भ्रामक समजूती आमच्या समाजातून कधी जाणार?)
मूळात पत्रिका पाहून लग्न जमवणे हे आले तरी कुठून? याची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे देता येईल..
आपल्या समाजात पूर्वी आजच्या सारखे खुलेपण नव्हते. एकतर लग्ने बालवयातच `उरकली' जात. त्यामुळे तरुण-तरुणींनी एकत्र भेटून लग्न जमवण्याचा प्रश्नच नव्हता.पण लग्न जमवण्यासाठी काहीतरी निकष तर असायला हवा ना! धर्म/जात/रंग/रूप हे सर्व उघडच असते पण बाकीच्या `गुणांचे' काय? स्वभाव कसा कळणार? यातून हे पत्रिकेचे खूळ आले.
जन्मपत्रिका म्हणजे आकाशस्थ ग्रहांची १२ राशिस्थानानुसार असलेली स्थिती. ३६ पैकी किमान १८ गुण जुळणे आवश्यक असते.परीक्षेत कसे ३५ टक्के ला उत्तीर्ण तसे इथे पासिंग ला हवेत किमान ५० टक्के जुळणारे गुण.पत्रिकेच्या १,४,७,८ आणि १२ यापैकी कोणत्याही स्थानात मंगळ असेल तर ती व्यक्ती `मंगळी' ठरते.त्यातही राशीस्थानानुसार वेगवेगळी फलितं दिलेली असतात. अशा मंगळी व्यक्तीशी लग्न केल्यास जोडीदाराचा अकाली मृत्यु होतो वा विवाह अयशस्वी होतो अशी एक धारणा आपल्या(च) समाजात घर करून राहिलेली आहे.यावर उतारा म्हणजे मंगळ असलेला मुलगा/मुलगी पाहणे हा असतो.विवाहेच्छु जोडप्याला तेवढंच एक मानसिक समाधान की चला आपल्याला ग्रहांचे पाठबळ आहे.एवढे गुण जुळताहेत म्हणजे संसार सुरळीत पार पडेल याची `खात्री' असे वर समर्थन करण्यात येते.
पण यामुळे काय बिघडतंय? यातून कुणाचे नुकसान होतंय का? असा एक आक्षेप घेतला जातो. यावर एक दृष्टीक्षेप टाकुया.आपल्याकडे लग्न जमवण्याची सुरूवातच पत्रिका बघण्यापासून होते. पत्रिका नाही जुळली तर पुढे जायचेच नाही, जुळली तरच पुढील बोलणी करायची अशी सर्वसाधारण पद्धत असते.त्यानंतरही रंगरूप,नोकरी पगार,आवडीनिवडी पाहून स्थळाला पसंती दिली जाते वा नाकारले जाते.म्हणजे केवळ पत्रिका जुळते वा मंगळ नाही म्हणून लग्न जमले असे होत नाही. याउलट स्थिती प्रेमविवाहात (आपण उल्लेख केलेल्या बाबतीत) होऊ शकते. प्रेम करताना पत्रिका पाहून केले जात नाही. पण लग्न करताना दोन्ही वा एका घरातून पत्रिका पाहण्याची मागणी केली जाते. कधी कधी प्रेम वगैरे नसते पण ओळखीचे स्थळ असते. मुलगा व मुलगी दोघांची ओळख वा मैत्री असते.त्यांच्या पालकांचीही एकमेकांशी ओळख असते. दोघांचा जोडा किनई लक्ष्मीनारायणासारखा दिसतो, असा विचार करून लग्नाचे बघायला जाताना मात्र पत्रिकेचा हेका काही सोडला जात नाही. तिथे नेमकी एकनाड निघते किंवा दोघांपैकी एकाला मंगळदोष असतो वा षडाष्टक योग असतो.केवळ पत्रिकेमुळे सहज जमू शकणारे असे एखादे लग्न प्रत्यक्षात येऊ शकत नाही.स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे, विज्ञानयुगात राहणारे लोकही विषाची परीक्षा का घ्या असे म्हणत या समजुतींना बळी पडतात.आपल्या समाजात स्त्रियांची स्थिती अशी आहे की एखाद्या मंगळी मुलाचे लग्न जमून येते पण मुलींची राहून जातात. त्या मुलीला व तिच्या बापाला स्वतःच्या नशीबाला दोष देत बसण्याशिवाय पर्याय नसतो. आश्चर्य म्हणजे असे असूनही अशा खुळचट समजुती बद्दल समाजात नाराजी वा चीड आढळुन येत नाही. शास्त्रात लिहिले आहे म्हणजे खरेच असणार असेच लोक धरून चालतात.
अवघ्या दीड-दोन शतकांपूर्वी देवीच्या कोपामुळे रोग होतात अशी आपल्या समाजात समजूत होती. रोगांचे खरे कारण कळल्यावर लोक औषधोपचारंसाठी डॉक्टरांकडे जाऊ लागले. पण ज्योतिषी मंडळींची भाकितं वारंवार चुकली तरी लोक खरं काय आहे ते मानायला तयार नाहीत.उलट दिवसेंदिवस हे भविष्याचे खूळ वाढतच चाललंय.प्रत्यक्षात पुराव्यानिशी दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा काहीतरी अज्ञात,अनाकलनीय गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या आपल्या कडील दैववादी परंपरेचे हे एक ढळढळीत उदाहरण.
पानिपतच्या युद्धात काही लाख बांगडी फुटली असे म्हणतात. याचा अर्थ एवढे तरूण मराठा सैनिक मारले गेले.त्यांच्या बायका विधवा झाल्या. त्या सर्वांच्या पत्रिकेत मंगळ होता? अजून खूप मागे जाऊन पाहता महाभारतात सर्वच्या सर्व १०० कौरव मारले गेले तेही एकट्या भीमाकडून. त्यांच्या पत्नींच्यापण पत्रिकेत मंगळ होता असे म्हणायचे का? तेव्हा तर त्यांची लग्ने ठरवायला राज ज्योतिषी असत.ते का चुकले? की त्यांची लग्ने पत्रिका न पाहता केली जात?
इंग्रजी मध्ये Horoscope Matching असा शब्द अस्तित्त्वात असला तरी त्या समाजात अशा प्रथेचे उच्चाटन झाले असावे. तिथे लग्ने ठरवताना अमुक एक मुलगी वा मुलगा मार्सी (मंगळी )आहे असा शब्दप्रयोग ऐकिवात नाही. तेथील बहुतांश विवाह टिकत नाहीत याचे न जुळवलेल्या पत्रिका हे कारण नसून अन्य सामाजिक कारणे आहेत जी काही प्रमाणात आपल्याही शहरातून दिसू लागली आहेत.
थोडक्यात काय तर २१ व्या शतकात जाताना आपला एक पाय विज्ञानयुगात आणि एक पाय अजूनही मध्ययुगीन काळात आहे. कारण ज्या संगणकाच्या आधारे आपण आंतरजालावर संपर्क साधू शकतोय त्याच संगणकाच्या मदतीने विवाहेच्छु मंडळी पत्रिकाही जुळवून पाहात आहेत. काय म्हणावे या अंधश्रद्धेला?
लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाई या व्यक्तिरेखेने केलेल्या गांधीगिरीला औटघटकेची का होईना पण आमाप आणि अफाट प्रसिद्धी मिळाली. पूर्ण चित्रपटभर अहिंसात्मक गांधीगिरी करणारा मुन्नाभाई चित्रपटाच्या कळसाध्यायात बटुक ज्योतिषीला ठार मारण्याची भीती दाखवून फलज्योतिषाचा फोलपणा सिद्ध करतो. नवऱ्यामुलाला ते पटते व अंधविश्वासाला बळी पडण्यापेक्षा तो त्या `तथाकथित मंगळी' पण सत्यवचनी मुलीचा स्वीकार करतो.दोघांचा संसार सुखाचा होतो.त्या मुलीच्या सासऱ्याचाही ज्योतिषावरचा विश्वास उडतो.कारण या मंडळींचा ग्रहताऱ्यांपेक्षा स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मावर अधिक विश्वास बसतो.
पण वास्तवात चित्रपटक्षेत्रतील महानायक, अनेक यशस्वी उद्योगपती ज्योतिषाचा आधार घेताना दिसतात. प्रसारमाध्यमे त्यांना अतिप्रसिद्धी देऊन अशा प्रथांचे उदात्तीकरण करतात.त्याना आदर्श मानून लोकही ज्योतिषींमागे धावत राहतात.
एकीकडे अमेरिका मंगळाच्या भूमीवर मानव उतरवण्याची तयारी करतेय तर इथे आफ्ण मात्र कागदी पत्रिकांच्या मंगळरुपी मायाजालात अडकून राहिलो आहोत.मंगळ पाहायचा असेल तर जरुर पाहावा पण पत्रिकेत नाही तर आकाशात. (सध्या संध्याकाळपासून पश्चिमेकडे मिथुन राशीत लाल मंगळ सहज दिसतोय)
पण लग्नासारखा निर्णय स्वतःच्या विचारशक्तीवर घ्यायचा की ग्रह आणि राशींमध्ये स्वतःची बुद्धी गहाण टाकायची हे ज्याचे त्याने ठरवावे.