मराठी माणूस थोड्या फार प्रमाणात आळशी आहे. उदा. आम्हाला गावातल्या गावात नोकरी हवी. नोकरी मिळाली की ती पण एकदम चांगल्या पगाराचीच हवी. म्हणजे खाइन तर तुपाशी नाहीतर उपाशी अशातला प्रकार. पदवी मिळाली की २ ते ३ वर्षे उमेदवारी ( म्हणजे थोड्या फार कमी पगारावर) करून त्या त्या क्षेत्रातील खाचाखोचा , बारकावे आणि निपुणता मिळवून चांगल्या भविष्याचा पाया रचावा लागतो. माझा एक अनुभव सांगतो : मी मुंबई मध्ये एका नामांकीत मोबाइल सेवा पुरवठादार कंपनी च्या मा. तंत्र. विभागात काम करत होतो. बिलांचे लेखा परीक्षण विभागात बहुसंख्य बिगर मराठी मंडळी होती. आता ह्या कामासाठी काही फार मोठ्या पदवी ची गरज नसते. बी. कॉम. बरोबर चांगले विश्लेषण ज्ञान असणे ही पूर्व पात्रता. पण बिलांचे लेखा परीक्षण करायला लावणे म्हणजे मराठी बी. कॉम. पदवीधरांचा घोर अपमान की हो ! आम्ही हे करणार नाही , तर आम्हाला हवे कमी आणि सोपे काम आणि चांगला भरपूर पगार. माझ्या ओळखी मधील बी. कॉम. पदवीधरांनां विचारले तर कोणीच तयार होईना. याउलट त्याच पदावर रुजू झालेली एक बी. कॉम. दाक्षिणात्य मुलगी केवळ मेहेनत , चांगले विश्लेषण ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्य या जोरावर आज त्याच कंपनीमध्ये सहायक व्यवस्थापक पदावर पोहोचली. हे एक नाही तर अशी अनेक उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत.