या तरुण-तरुणींशी, त्यांच्या आईवडीलांशी बोलावे, त्यांना काही मदत करावी, तर त्यांना ती त्यांच्या खाजगी जीवनात केलेली लुडबूड वाटेल..
वरील मुद्द्यावर मीही बराच वेळ अडखळले. पण नंतर वाटले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तसाच तो सामाजिकही आहेच. केवळ त्यांच्या भांडणाच्या आवाजाने इमारतीतील शांतता भंगते म्हणून तो सामाजिक प्रश्न आहे असे नाही, तर त्यांनी लग्न करताना सामाजिक / कायदेशीर मान्यताही घेतलेली असते म्हणूनही. संसार विसकटण्यात अनेक अशी कारणे असू शकतात जी त्यांची वैयक्तिक/ कौटुंबिक असू शकतील पण त्याचे होणारे परिणाम सामाजिक आहेत. कदाचित आपली मदत ते नाकारतीलही, पण निदान दोघांपैकी एकाशी जरी थोडेफर बोलणे होत असेल तर विषय काढून बघायला हरकत नाही असे वाटते. खूपशा महिला संघटना समस्या निवारण केंद्रेही चालवतात. तिथे सल्ला/मार्गदर्शन मिळू शकते. निदान त्याची माहिती तरी त्यांच्यापर्यंत, त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचावी असे काही करता येईल का पहावे असे वाटते. अशा पातळीवर आलेले कित्येक संसार सावरले गेल्याचीही उदाहरणे आहेत. त्यांना कदाचित त्यांच्या खाजगी आयुष्यात आपण लुडबूड करत आहोत असे वाटेलही, पण कदाचित असेही असू शकेल की खरेच त्यांना अशा कुणाची तरी गरज आहे.