सर्वप्रथम लेखक जे लिहितात त्यापैकी बराचसा भाग (जवळजवळ ज्ञानेश्वरीमधील अवतरणापर्यंत) मला तात्पर्यशून्य वाटतो. त्यातून लेखकांना काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. काही विधानांच्या आधारासाठी लेखकाने कोणताच संदर्भ दिला नाहीये. (उदाहरणार्थ, याच काळात "देव स्वर्गात राहतो, आणि त्याचा पृथ्वीवरील घटनांशी संबंध नाही"आणि 'सैतान/ पाप " या संकल्पनांचा समाजमनावर मोठ्या प्रमाणावर पगडा होता.)

यापुढे लेखक बुद्धिवादी मंडळींच्या मतांबद्दल लिहितात की 'हे जग जर एक physical entity असेल तर या जगातील अद्भुत (पृथ्वी कोठून आली? सूर्यापासून! तर मग सूर्य कोठून आला? की कुणी बनवला? ज्याने सूर्य निर्माण केला त्याला कोणी निर्माण केले?) गोष्टी विज्ञानाने सिद्ध व्हायलाच हव्यात'. मला असा प्रश्न पडतो की हाच नियम देवाच्या बाबतीत का लागू होत नाही. (तोच धागा पकडून सर्व pro-देव आणि pro-अध्यात्म (म्हणजे आध्यात्मिक नव्हे) लोकांना विचारावेसे वाटते, पृथ्वी कोठून आली? देवानेच बनवली ना! तर मग देव कोठून आला? की कुणी बनवला? ज्याने देव निर्माण केला त्याला कोणी निर्माण केले?... ही प्रश्नमालिका वरील प्रश्नमालिकेप्रमाणेच अंतहीन (आणि अर्थहीन) आहे.) एक गोष्ट मान्य की ह्या प्रश्नांची विज्ञानाने दिलेली उत्तरे सामान्य माणसाच्या कक्षेत नसतील. पण ती विज्ञानाची चूक नाहीये. (लेखकाने कॉस्मॉलजीबद्दल काही ऐकले आहे का? त्यातली 'Big Bang Theory' सकृद्दर्शनी जरी शंकास्पद वाटली तरी उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांचा (विश्वाचे प्रसरण आणि ताम्रसृती) विचार करता तिचे महत्त्व कळून येते.)
मला वाटते की विज्ञान जरी परिपूर्ण नसले (जर ते परिपूर्ण झाले तर काही मजाच राहणार नाही) तरी तेच सर्वात जास्त स्वीकारार्ह वैश्विक तत्त्वज्ञान आहे.

लेखक पुढे म्हणतात, '२० व्या शतकाच्या सुरवातीस पाश्चिमात्या शास्त्रज्ञ जवळ जवळ याच मतांशी आले.आईन्स्टाईन ने 'न्यूटेनिअन मोडेल' नाकारले आणि दोन गोष्टी सिद्ध केल्या.' या ठिकाणी एक दुरुस्ती करावीशी वाटते: आइन्स्टाइनने न्युटोनियन मॉडेल नाकारले नाही, त्याने 'ते केवळ आकाराने मोठ्या असलेल्या (Macroscopic, microscopic नव्हे) आणि कमी वेग असलेल्या वस्तूंसाठीच लागू होते' असे सांगून आकाराने लहान असलेल्या (Microscopic, जसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन, वगैरे. ) आणि प्रचंड वेग (प्रकाशाच्या वेगाजवळ जाणारा - प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त आहे) असलेल्या वस्तूंसाठी लागू होणारी नवी समीकरणे शोधून काढून ही नवी समीकरणे macroscopic वस्तूंसाठी लिहिल्यास न्यूटनच्या समीकरणांत रूपांतरित होतात हेदेखील सिद्ध केले. (आइन्स्टाइनने न्यूटनची केवळ एकच कल्पना खोडून काढली ती म्हणजे निरपेक्ष अवकाश आणि निरपेक्ष काळ... अधिक माहितीसाठी हा दुवा पाहा. विशेषतः दुसऱ्या परिच्छेदातील शेवटची ओळ.)

लेखकाने सापेक्षतावादाचा सिद्धांत काहीशा चुकीच्या अर्थाने घेतलेला दिसतो. ज्यावेळी लेखक म्हणतात की प्रत्येक गोष्ट 'सापेक्ष'आहे तेव्हा लेखक सापेक्षतावादाचा दुसरा मूलभूत नियम विसरलेले दिसतात तो म्हणजे प्रकाशाचा वेग हा अत्यंत निरपेक्ष आहे. तो नेहमी c=३००००० कि.मी./से. इतका असतो. तेव्हा लेखकाला जर निखळ सत्य हवे असेल (ते ही आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाला अनुसरून) तर लेखकाने प्रकाशाच्या वेगाचा नक्कीच विचार करावा. इथेच जेव्हा लेखक म्हणतात की Time is fourth dimension  कालाचे आकुंचन/ प्रसरण असू शकते. या जगाचे खरे स्वरूप समजण्यासाठी कालाच्या पलीकडे जायला हवे. ''कालातीत'' व्हायला हवे. तेव्हा लेखक पुन्हा एक गोष्ट विसरतात की काळाची चौथी मिती मानव तरी निश्चितच लंघू शकत नाही. ते त्याच्या आवाक्याबाहेरील आहे. (ह्या ठिकाणी लेखकाला सापेक्षतावादाचा गाभा (essence आणि crux ) कळला नाही असे वाटते. अन्यथा कालातीत होण्याबाबत कल्पनेच्या भराऱ्या मारण्यापूर्वी लेखकाने दहादा विचार केला असता. का लेखकाला असे म्हणावयाचे आहे की जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी कालातीत व्हावे लागेल आणि ते अशक्य असल्यामुळे जगाचे खरे स्वरूप कळणेसुद्धा अशक्य आहे? प्रिय लेखक, कृपया स्पष्ट करा.)

लेखक जेव्हा म्हणतात की अणूच्या न्यूट्रॉन पेक्षा लहान कणाचे विज्ञानाने वर्णन करता येणे शक्य नव्हते, त्यांपलीकडे सगळे " वर्णनातीत" ! त्यावेळी लेखक बहुतेक नवनवीन वैज्ञानिक संशोधनांबद्दल अनभिज्ञ आहेत असे वाटते. नाहीतर लेखकाला क्वार्क (पाहाः विकिपिडियावर क्वार्कबद्दल माहिती) ह्या गोष्टीबद्दल माहीत असते आणि ओघानेच न्यूट्रॉनपेक्षा लहान कणाचे वर्ण(न)देखील.

लेखकांनी लिहिलेली एक गोष्ट पटते की विश्व हे अनेक एकसारख्या , परस्परांना जोडल्या गेलेल्या लहान लहान कणांनी बनलेले आहे! पण हे वाक्य आणि त्याखालील तात्पर्य (किंवा भारतीयांनी काढलेला अर्थ... भारतीय अर्थ काढण्यात इतके चुकतील हे जरा अवघड वाटते.) पिंडी में ब्रह्मांड (लेखकाला बहुतेक 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' असे म्हणावयाचे आहे!) यांचा काहीच संबंध दिसत नाही. (इथे खरे तर लेखक एक तत्त्वचिंतक असावे असे वाटते... सांगितलेली गोष्ट आणि तात्पर्य ह्यात काहीही संबंध नसणे हे तत्त्वचिंतकाचे एक लक्षण आहे.)

मला तरी 'अध्यात्म' म्हणजे निसर्गनियम न कळल्याने मानवाने सकृद्दर्शनी चमत्कार वाटणाऱ्या घटनांची जमेल त्या तऱ्हेने संगती लावण्याचा केलेला प्रयत्न वाटतो. ती नेहमीच योग्य असेल असे नाही. आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या काही गोष्टी विज्ञानानेसुद्धा सिद्ध केल्या (ही निश्चितच एक अभिमानास्पद गोष्ट आहे!) ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या गोष्टी आपण विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या-खोट्या न तपासताच स्वीकाराव्यात.

पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की विज्ञान जरी परिपूर्ण नसले तरी तेच ह्या विश्वाच्या अफाट आणि अथांग पसाऱ्याचा अर्थ उलगडणारे सर्वात जास्त स्वीकारार्ह तत्त्वज्ञान आहे. अध्यात्माला विज्ञानात कोठेही जागा नाही.

क्वार्कच्या रंगांबद्दल माहिती असल्यास हे कळेल.