निमिषराव,
हा मूळ प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारला होता. त्यातील 'वार्ष्णेय'च्या (म्हणजे कृष्णाच्या) जागी मी फक्त आपले (आड)नाव ठेवले. ह्या प्रश्नाचा स्वैर अर्थ असा:
माणूस जे काही करतो ते जर विधिलिखित असतं (त्याच्या हातात नसतं) तर तो पापाचरण का करतो? आणि त्याबद्दल त्याला कसे दोषी ठरवता येईल?

मी माझ्या लहानपणापासून बघतोय. कधी काही वाईट घडलं की त्याचं खापर आपण दैवावर फोडून मोकळे होतो. निमिषरावांच्या म्हणण्याप्रमाणे 'एखादा माणुस एक नेहेमीचा रस्ता न पकडता अचानक आतला आवाज ऐकून दुसऱ्या रस्त्याने जातो आणि त्या रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू झाला' तेव्हा त्या माणसाने त्या विधिलेखकाचे काय बिघडवले होते की त्याने (विधिलेखकाने) ह्या माणसाच्या भाळी असा अपघाती मृत्यू लिहिला?

एखादा माणूस असाच एक दिवस घरातून बाहेर पडतो 'ऑफिसा'त जायला. पण ऑफिसचा रस्ता न पकडता अचानक आतला आवाज ऐकून दुसऱ्या रस्त्याने जातो आणि ४-५ फुटकळ चोऱ्या करतो, २-३ दरोडे घालतो आणि १-२ बलात्कार करतो. तो असं का करतो? ते विधिलिखित होतं म्हणून? मग आता ह्या सर्व गोष्टींनी त्याला पापाचे धनी नाही का व्हावे लागणार? माझ्या मते नाही. कारण त्याने केलेली ही सर्व कृत्ये तर विधिलिखितच होती!
पण गम्मत अशी की जरी ही कृत्ये विधिलिखितच होती तरी त्या माणसाला (त्याने स्वतःहून न केलेल्या) ह्या कर्मांची फळं भोगावी लागतातच. (अर्थात हे माझे म्हणणे नाही, आध्यात्मिक लोकांनीच हे मला सांगितलंय.)

माझ्या हातून आज काहीतरी वाईट गोष्ट होते त्याला जर माझ्या पूर्वायुष्यातील काही गोष्टी (मी केलेली पापे) कारणीभूत असतील तर त्या (पूर्वायुष्यातील) गोष्टी माझ्या हातून का घडल्या? त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या? त्याच्याही आधीच्या आयुष्यातील का? ही साखळी कुठे संपते? अध्यात्मानुसार ह्या सर्वाची संगती कशी लागते?

बरेच प्रश्न विचारल्याबद्दल क्षमा असावी. पण अगदी लहानपणापासून मला पडलेल्या ह्या प्रश्नांची समाधानकारक आणि तर्कशुद्ध उत्तरे मला अजूनही मिळाली नाहीयेत.
(मला तरी वाटते की अध्यात्माचे तर्कसंगतीशी काहीही वावडे नसावे.)