'ण' च्या ऐवजी 'न' लिहिणे रास्त वाटणार्‍या सगळ्यांना माझे काही प्रश्न:

१. आपले सर्वांचे शालेय शिक्षण झाले आहे काय?
याचे उत्तर "नाही" असेल तर हा विषय इथेच संपतो.
जर "हो" असेल तर पुढचा प्रश्न:

२. आपल्याला "मराठी व्याकरण" हा विषय होता का?
याचे उत्तर "नाही" असेल तर हा विषय इथेच संपतो.
जर "हो" असेल तर पुढचा प्रश्न:

३. आपण व्याकरणासाठी वापरत असलेल्या पुस्तकात 'ण' च्या जागी सर्वत्र 'न' होते काय? पुस्तकाचे नाव "मराठी व्याकरण (ग्रामीण)" असे होते काय?
याचे उत्तर "हो" असेल तर हा विषय इथेच संपतो.
आणि जर "नाही" असेल तर त्याचा अर्थ लहानपणापासुनच सरकारमान्य शुद्ध भाषा वेगळी, आणि बोली भाषा वेगळी याची तुम्हाला जाणीव आहे.

आता इतर काही बोली भाषांचे उदाहरण घेऊ.
ज्या लोकांची बोली भाषा कोंकणी आहे, त्या लोकांचा असा आग्रह ( किंवा अट्टाहास ) नाही की मराठी मध्ये "तुका सांगतय हा" हेच प्रमाण मानावे.
नागपुरी लोकांचा असा अजिबातच अट्टाहास नाही की, "करुन रहाणे" वगैरेंना प्रमाण मानावे.
तसेच या माझ्या लेखात मी शुद्धलेखनाच्या अनेक चुका केल्या असतील पण आता त्यांनाच प्रमाण मानावे असे माझेही अजिबातच मत नाही. उलट मला त्याबद्दल अपराधीपणाची भावना आहे.

मला कोणी यामधील चुका सांगितल्या तर मी त्या मान्य करुन सुधारण्याचा प्रयत्न करीन. परंतु "माझे विचार तर पोहोचले नं, तुम्हाला इतकं वाटत असेल तर नियम बदला" असा विचार कधीच माझ्या मनामध्ये येणार नाही.

कुठे न आणि कुठे ण वापरायचा हे माहीत नसल्यास तसे नम्रपणे नमुद करुन मग लिहावे, आणि जर माहीत असेल तर, संसदेतील विरोधक जसे केवळ विरोधासाठी विरोध करतात, तसे मुद्दाम उलटे लिहू नये.