तसे वाटत नाही. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या वाढीस व जोपासनेसाठी संमेलनेतर उपक्रम राबवले जातच असतात. मग साहित्य संमेलनातूनच असे काय खास/वेगळे साध्य होणार आहे, याची सॅन फ्रान्सिस्को बे एरिया तसेच नॉर्थ कॅरोलायना राज्यातील आतापर्यंतच्या वास्तव्यातून, आणि येथील मंडळांच्या कार्यक्रमांचा व उपक्रमांचा जवळून अनुभव घेऊन(ही)(!) कल्पना येत नाही.
दुसरे असे की सॅन फ्रान्सिस्कोसारख्या भागातले (किंवा एकूणच अमेरिकेतील) मराठी बांधव लक्षात घेतले तर दोन स्पष्ट गट दिसून येतात. एक, जे ७०-८०-९० पासून येथे येऊन कामानिमित्त वा अन्य कारणाने स्थायिक झाले आहेत, पदवीपर्यंतचे शिक्षण भारतात होऊन मग पदव्युत्तर शिक्षणासाठी येथे येऊन सध्या नोकरीत गुंतलेले अशी पिढी आणि दुसरे म्हणजे साधारण १९९५ पासून पुढे जन्मलेल्यांची पिढी.पहिल्या पिढीतील लोकांना मराठी साहित्य व संस्कृतीची जाण, प्रेम, ओवरॉल अवेअरनेस (आणि कदाचित म्हणूनच अप्रिसिएशनसुद्धा) अर्थातच जास्त आहे.दुसऱ्या पिढीतील लोकांसाठी भाषा व संस्कृती जागरूकता आणि संवर्धनाबाबतचे नानाविध उपक्रम राबविले जात असले तरीही जन्माने अथवा दीर्घकालीन वास्तव्याने मिळालेले राष्ट्रीयत्त्व, अमेरिकेतच होणारे शालेय आणि महाविद्यालयीन - पदवीपर्यंतचे तसेच पदव्युत्तर उच्च शिक्षण, अमेरिकन जीवनशैलीचा अंगिकार या आणि अशा इतर प्रबळ बाबींपुढे मराठी भाषा आणि संस्कृती यांचे जतन, संवर्धन आणि अंगिकार हा केवळ एक उपक्रम(च) ठरतो; आणि त्यात तसे काही गैरही नाही/नसावे(च).माझे व्यक्तिशः मत असे की अशा गटातल्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याचा आस्वाद घेता आल नाही,तरीही मराठी सहित्याबद्दलचे आणि संस्कृतीबद्दलचे एकुणातले बऱ्यापैकी सामान्यज्ञान असले, तरी उत्तम! साहित्य संमेलन हा सुद्धा त्यांच्या लेखी दर रविवारच्या बालोपासना/बालमंदिर शिबिरासारखा (आणखी एक) उपक्रम ठरणार, असे(च) वाटते.हे चित्र वरकरणी निराशावादी वाटेलही; पण ते आहे तसे स्वीकारायला हवे,यातच शहाणपणही आहे असे (मला) वाटते.
तेच अधिक योग्य वाटते.मंडळाचे पदादिकारी, संलग्न संस्थांचे पदाधिकारी (आणि सभसद? ), अध्यक्ष व माजी अध्यक्ष अशांचा विजा, तिकिटे, वास्तव्य (खाणेपिणे आणि अर्थातच स्थलदर्शन! ) या सगळ्याचा खर्च सॅन फ्रान्सिस्को बे एरिया महाराष्ट्र मंडळ करणार, असे वाचनात आले. त्यामुळे या मंडळींव्यतिरिक्त स्वतःच्या खिशाला स्वेच्छेने फोडणी देऊन मनोभावे साहित्य संमेलनाला वारकऱ्यांसारखी हजेरी लावणाऱ्यांचा (आम साहित्यप्रेमी, रसिक इ.) संताप होणे स्वाभाविक वाटते.अशा सहभागींचा सरसरी आकडा दरवर्षी किती आतो, हा इंटरेस्टिंग मुद्दा ठरू शकतो; पण तो आकडा नगण्य नक्कीच नसावा.
असे वाटत नाही.मंडळाच्या माध्यमतून असा उपक्रम मोठ्या स्तरावर, संघटितपणे राबवला जात असल्याने अशा संघटनासाठी आणि कार्यक्रम आर्थिक तसेच सामुदायिक स्तरावर सुनियोजितपणे तसेच यशस्वी करण्यासाठी मंडळाची गाज आहे, असे (मला) वाटते.
शक्य आहे. असे संमेलन भारताबाहेर घेतल्याने स्थानिक उगवते साहित्यिक व भारतातले तसेच बाहेरचे प्रकाशक, मुद्रक यांचे सोशल नेटवर्किंग चांगले होईल. भारताबाहेर जन्म घेणाऱ्या मराठी साहित्याची ओळख भारतातील(आणी जगभरतील)रसिकांना होऊ शकेल. तसेच भारतातील नव्य साहित्याबद्दल भारताबाहेर माहिती मिळणे,ओळख वगैरेही शक्य होईल. दोन भिन्न भागांतील जीवनशैली, विचारशैली, सामजिक व राजकीय तसेच आर्थिक विभिन्नतेचा विचारांवर आणि पर्यायने साहित्यावर होणारा परिणाम इत्यादी दृष्टीने मराठी साहित्य तसेच वाचकवर्ग समृद्ध होईल.
पूर्णतः योग्य नाही. का, याची कारणे वरील उत्तरांमधून स्पष्ट होतच आहेत, असे वाटते.
एका चांगल्या प्रश्नावर घडविलेल्या चर्चेबद्दल व तीत सहभागी होऊन मत मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चित्त यांचे विशेष आभार.