भारताबाहेर जन्म घेणारे साहित्य असो वा भारतात, ह्या उगवत्या साहित्यिकांच्या कंडशमनासाठी बहुतेक पुस्तके प्रकाशित होतात, असे माझे ठाम मत आहे. [निवृत्तीनंतर विरंगुळा म्हणून लेखन करणारे लेखक-लेखिका; गलेलठ्ठ
किंवा चांगला पगार असणारा नवरा असणाऱ्या (बहुधा सडपातळ आणि बॉबकट ठेवणाऱ्या) लेखिका,
कवयित्री ; साहित्यिक हा टॅग लावून घेण्यासाठी मिरवणारे अधिकारी, डॉक्टर, इंजीनियर, एनाराय लेखकलेखिका वगैरे.]
तर अशी पुस्तके बहुधा वाचकांच्या हाती पडत नाहीत. पडल्यास साहित्यात क्रांती घडून येईल असेही काही नाही. पण सर्वदूर पोचण्याऐवजी अशा पुस्तकांचे गठ्ठे बहुधा प्रकाशकाच्या गोदामात धूळ खात पडतात किंवा रद्दीच्या दुकानाच्या जाऊन पोचतात. (मी स्वतः आमच्या परिचयातल्या एका प्राध्यापक कवीने स्वतःच्या कमाईने काढलेल्या काव्यसंग्रहाचे गठ्ठे रद्दीच्या ठिय्यावर बघितले आहेत. त्या कविता नाकस होत्या असे नाही. आणि ह्यामुळे तो खचून गेला असेही नाही. दोन वर्षांनी आणखी एक संग्रह काढला. अर्थात व्यक्त होणे महत्त्वाचे! नाही का?)
२०-३० हजार रुपये घेऊन पुस्तके प्रकाशित करणाऱ्या ह्या प्रकाशकांना (ह्या "आपण छापून टाकू"छाप प्रकाशकांत किरकोळ व मोठे असे जवळपास सर्वच प्रकाशक आले) ह्यातून साहित्यसेवा-बिवा करायची नसते. कमाई करायची असते. त्यांना बकरे हवे असतात. हा खरेतर वेगळ्या चर्चेचा विषय असल्याने आता आवरते घेतो. बाकी 'संदीप खरे', डॉलरमस्ती हे तर अगदीच वेगळे विषय आहेत.