"साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्को येथे घेणे योग्य की अयोग्य" ह्या प्रश्नाचे उत्तर हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारता यावर अवलंबून राहील. ज्या मुठभर मंडळींना चकटफू अमेरिकावारी घडणार आहे ती अर्थातच ह्याचे जोरदार समर्थन करतील. तसेच 'बे एरिया महाराष्ट्र मंडळ'ही हा निर्णय योग्य असल्याची ग्वाही देईल. मीना प्रभूही बहुधा 'योग्य आहे' म्हणतील कारण एकदा संमेलन भारताबाहेर भरवण्याचा पायंडा पडला की ते लंडनमध्ये लवकरच भरवता येईल व मागच्या वेळी हुकलेल्या अध्यक्षपदासाठी 'माझं लंडन'मध्ये फिल्डिंग लावणे तुलनेने सोपे जाईल. महाराष्ट्रात दर वर्षी संमेलनाच्या वेगवेगळ्या चर्चा व उप-संमेलनांमध्ये मानधन व प्रवासभत्त्यासह स्वतःची वर्णी लावून घेणारे नेहमीचे यशस्वी चेहरे व आपल्या वार्षिक उलाढालीतील ९०% पुस्तकविक्री संमेलनात टाकलेल्या स्टॉलवर करणारे प्रकाशक "योग्य नाही" हेच उत्तर देणार. ही सर्व झाली हितसंबंध गुंतलेल्यांची उत्तरे. राहता राहिले दोन गट. एक -  साहित्यप्रेमी वाचक जे पदराला खार लावून संमेलनास उपस्थित राहतात. ह्यांचा हा निर्णयास निश्चितच विरोध असेल कारण साहित्यावर व साहित्यिकांवर कितीही प्रेम असले तरी लाखो रुपये खर्चून अमेरिकेला जाणे यांतील ९९% लोकांना परवडणारे नाही. ह्या निर्णयाने खरे दुःख होणार आहे ते ह्यांना. राहिलेला शेवटचा गट सर्वात मोठा आहे. हा गट आहे साहित्य संमेलन भरले काय, न भरले काय, भरल्यास कुठे भरले याचे सोयर-सूतक नसलेल्या ९९% मराठी माणसांचा.

          अनेकांनी उपस्थित केलेला कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या घसघशीत अनुदानाचा. ते ह्या संमेलनास दिले जाऊ नये. वाटल्यास बे एरियातील मंडळींनी त्यांचे राज्यपाल ऍर्नॉल्ड श्वार्झेनेगर यांच्याकडून अनुदान मागावे. आधीच दर वर्षी "शेतकरी आत्महत्या करत असताना संमेलनांना अनुदान का? " अशा प्रश्नांना तोंड देताना महाराष्ट्राच्या राजकारण्यांना/मंत्र्यांना शाब्दिक कोलांट्या माराव्या लागतात. आता अमेरिकेत संमेलन भरवण्यासाठी महाराष्ट्राच्या करदात्यांनी पैसे का द्यावे ह्याचे ते काय उत्तर देणार ?