मराठी साहित्य मरायला टेकल आहे, पुस्तक कोणी विकत घेत नाहीत वगैरे गोष्टी कायमच चर्चेत असतात.
हे कशाच्या आधारे केलेले विधान आहे याची नक्की कल्पना नाही. अक्षरधारा, राजहंस, उत्कर्ष अशा अनेक प्रकाशकांची वर्षभर पुस्तक प्रदर्शने पुण्यात सुरू असतात व प्रत्येक वेळी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. (दुकानात जाऊन पुस्तके घेण्यापेक्षा प्रदर्शनामध्ये जाऊन पुस्तके घेणे यामागे 'सेल सेल सेल' अशी वाचकांची मानसिकता असेल का? )
आजच्या सकाळ टाईम्स - (सिटीस्केप पुरवणी पान २ वर) मधली बातमीः गेल्या काही वर्षातील मराठी साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या खप दरवर्षी ३ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंत झाला आहे. साधारणपणे लहानमोठ्या प्रकाशकांचे ४०० च्या आसपास स्टॉल्स प्रत्येक संमेलनामध्ये लागत असतात. संमेलनाला चार ते पाच लाख लोकांची उपस्थिती असते.
एक पुस्तकविक्री सोडली तर या साहित्यसंमेलनातील मेजवान्या, चर्चा, अध्यक्ष कोण, त्यांचे मानापमान यांचीच जास्त जाहिरात होत असते. आणि त्याला फारसा अर्थ नाही. एनी वे पुस्तक प्रकाशकांनी रत्नागिरी येथे समांतर पुस्तक संमेलन करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे.
पुस्तक प्रकाशकांना शुभेच्छा. स्यान फ्रान्सिस्को संमेलनालाही शुभेच्छा. फक्त आमच्या खिशातून अनुदान नको. (आमचे मित्र 'अक्षरधारा'चे राठिवडेकर यांना त्यांची लाखभर पुस्तके घेऊन तिथे जाणे दुर्दैवाने जमणार नाही. त्याचे दुःख वाटते.)