--.....चर्चा चांगलीच रंगलीय हां... :) 

चित्त यांना मनापासून धन्यवाद. चांगला विषय घेतला आहे चर्चेला...!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी प्रथमच भारताबाहेर होत आहे.... यामुळे भारताच्या सीमा रुंदावत आहेत, याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला नको का?  एक मराठी माणूस म्हणून मला तरी झाला बुवा! ज्यांना झाला नसेल ते नतद्रष्टच म्हटले पाहिजेत! आसेतुहिमाचल अखंड भारत अस्तित्वात येईल तेव्हा येवो बापडा... पण आपल्या भारताने आपल्या सीमा थेट कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोला भिडवल्या, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. होऊ घातलेल्या महासत्तेने थेट विद्यमान महासत्तेशीच की हो साहित्यमैत्री साधली!!! आनंद पोटात माझ्या मावेना... मावेना...! 
२०१० चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुर्किना फासो येथे घेण्यात यावे, असे मी येथेच सुचवून ठेवू इच्छितो. (बुर्किना फासो येथे मराठी माणूस नोकरी-व्यवसायानिमित्त स्थिरावलेला असेलच ना? जिथे कुठे मराठी माणूस आहे, तिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हायलाच हवे... ) चंद्रावर किंवा मंगळावर मराठी माणसाने आपली वस्ती अद्याप वसवली नाही, याची मला सध्या खूपच खंत वाटत आहे!
...........

चित्त यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मी उलट्या क्रमाने देतो.

१) हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सॅन फ्रान्सिस्कोत होऊ नये म्हणून विरोध करणे योग्य आहे काय?
 

- हे संमेलन सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होऊ नये म्हणून विरोध करणे केवळ अयोग्य आहे. केवळ सॅन फ्रान्सिस्कोच का, हे संमेलन जगात कुठेही भरू शकते. भरू शकायला हवे! ज्या ठिकाणी केवळ एकच एक मराठी माणूस राहत असेल, त्या ठिकाणीही हे संमेलन व्हायला काहीच हरकत नाही. आपला अखिल भारत (आणि आपली मराठी, हां! नुसती मराठी नाही; मरू घातलेली मराठी!) तेथे त्यानिमित्ताने पोहोचेल तरी. मराठी माणसासाठी ही आनंदाचीच गोष्ट नाही काय? तेव्हा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हे संमेलन भरण्याला विरोध करणे सर्वथैव अयोग्य होय. तेथील मराठीजनांच्याही आजवर काही अपेक्षा असतीलच की नाही महाराष्ट्राकडून, मराठी साहित्यधुरिणांकडून? साहित्य-`व्यवहारा`चा गाडा हाकणाऱ्यांकडून? यानिमित्ताने त्या पूर्ण होत आहेत... होऊ द्या त्या निर्विघ्नपणे पूर्ण!  साहित्यास्वादासाठी तगमगणारी सॅन फ्रान्सिस्कोमधील मराठी साहित्यप्रेमी मंडळी महाराष्ट्रात - परळी वैजनाथ, औदुंबर, नरसोबाची वाडी अशा ठिकाणी - साहित्य संमेलन घेतले गेले तर, येऊ शकणार आहेत का? मग होऊ द्यात की एखाद्या वर्षी अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलन भारताबाहेर. त्यामुळे आकाश कोसळणार आहे की धरणी दुभंगणार आहे? हे संमेलन अमेरिकेसारख्या स्वप्नदेशात होणे म्हणजे तर मराठीतील हौशे-नवशे-गवशे यांच्यासाठी दुधात साखरच. आता हे दूध आणि ही साखर अंमळ, (अंमळ कसली, चांगलीच ! ) महाग असणार, हे काय त्यांना कळत नाही...? उच्चवर्गातील, उच्च मध्यम वर्गातील मराठीप्रेमींना तर हा खर्च काहीच नाही की! ज्याची ऐपत आहे, तो जाईल. ऐपत नसणारा बसेल बापडा महाराष्ट्रातच. पुढच्या कुठल्यातरी-जे महाराष्ट्रात होईल- अशा साहित्यसंमेलनाची वाट बघत... सध्याचा प्रत्येक मामला हा ऐपतदारांचा मामला असतो, बाबा! पत आहे की नाही हा मुद्दा अलाहिदा, ऐपत असली पाहिजे!!

२) सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन घेतल्याने मराठी साहित्य समृद्ध होण्यास मदत होईल असे तुम्हाला वाटते काय?

- काहीतरीच काय?  या प्रश्नाचा अर्थ असा झाला की, इतकी वर्षे महाराष्ट्रात (कधी कधी बेळगाव, इंदूर असे महाराष्ट्राबाहेर) साहित्य संमेलन सालाबाद भरत असल्याने मराठी साहित्य समृद्ध झाले किंवा समृद्ध होण्यास मदत झाली. साहित्य संमेलनामुळे मराठी साहित्य समृद्ध झाल्याचे एक तरी उदाहरण कुणीही दाखवून द्यावे. अहो, ही तीन दिवसांची जत्रा असते जत्रा. फार तर साहित्यजत्रा म्हणता येईल तिला. (जत्रेत हिंडण्या-फिरण्याचा आनंद काही औरच... आणि आपापल्या परीने जो तो हा आनंद लुटत असतो.)  मराठीतील गंभीर साहित्य विनोदी बनत चालले आहे काय ?  किंवा मराठीतील विनोदी साहित्यात पुरेसे गांभीर्य राहिले आहे काय ? , अशासारख्या काही परिसंवांदांनी-चर्चांनी रंगलेली ही साहित्यजत्रा. नाही म्हणायला, संमेलनाला बोलावण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे (तेही अनेकदा अमराठी) चिंतनपर भाषण ही साहित्यप्रेमींसाठी आजवर ठरलेली फायद्याची बाब. याच विद्वानांची भाषणे त्या त्या संमेलनात गाजली व त्यांच्या चिंतनयुक्त-मंथनयुक्त भाषणांनी अध्यक्षीय भाषणे झाकोळून गेली होती. गिरीश कर्नाड, पी. व्ही. नरसिंह राव ही नावे यासंदर्भात वानगीदाखल सांगता येतील. हे विद्वान मराठीभाषक नाहीत म्हणूनच केवळ त्यांना अमराठी म्हणायचे.  पण त्यांच्या चिंतनाला, त्यांच्या एकूणच आकलनाला प्रत्येक मराठी माणसाने खरोखरच सलाम करायला हवा...[ साहित्यसंमेलनांनी माझा व्यक्तिगत कुठला फायदा झाला असेल, म्हणाल तर, वेगवेगळ्या प्रकाशनांची विविध विषयांवरील पुस्तके एकाच छत्राखाली पाहायला मिळणे, विकत घेता येणे... (आणि एवढ्यासाठीच त्या तीनदिवसीय पवित्र साहित्यमेळ्याला अस्मादिकांचे अपवित्र पाय आजवर कधीमधी लागलेले आहेत. ) ]
साहित्य लोकांतात कधीही समृद्ध होत नाही... साहित्याच्या समृद्धीची प्रक्रिया नेहमीच एकांतात झालेली आहे.... देहूच्या तुकारामबोवांना आपल्या जिवीचे आर्त, आपल्या मनीची व्यथा, झालेले जिण्याचे हाल व्यक्त करणारे अभंग एखाद्या भजन-कीर्तनात सुचले असतील काय?  त्यासाठी त्यांना भंडाऱ्याच्या डोंगराचा विजनवासच पत्करावा लागलेला आहे. काळीज पिळवटून टाकणारी करुणाष्टके सज्जनगडावरील संत रामदासांना त्यांच्या शिष्यांच्या मेळ्यात सुचली असतील काय?   त्यासाठी त्यांना शिवथर घळीतील सांदी-कोपराच गाठावा लागलेला आहे... साहित्याची समृद्धी ही अतिशय शांतपणे, संथपणे होणारी, समईच्या मंद-स्निग्ध ज्योतीप्रमाणे तेवणारी प्रक्रिया होय. ती बाजारातील भगभगीत दिव्यासाऱखी कधीच नसते.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये साहित्य संमेलन घेतल्याने मराठी साहित्य समृद्धबिमृद्ध काहीही होणार नाही. तिकडील मराठीजनांसाठी आणि इकडून तिकडे जाणाऱ्या (मूठभर) मराठीजनांसाठीचा तो (सध्यातरी! )आनंदसोहळा असेल, इतकेच. याशिवाय सॅन फ्रान्सिस्कोमधील मराठीजनांना आणि अमेरिकेच्या अन्य भागांत राहणारे मराठी लोक जर संमेलनाला उपस्थित राहिले तर त्यांना महाराष्ट्रात आल्याचा आभास अनुभवता येईल कदाचित!!!

३) महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व मराठी साहित्य महामंडळाची गरज उरलेली नाही, असे तुम्हाला वाटते काय?

- या दोन संस्थांची गरज होती कधी, असा प्रश्न यावर कुणी विचारेल! पण असे विचारणे अप्रस्तुतच म्हटले पाहिजे!! एवढ्या टोकाला कुणीच जायला नको!!!
साहित्य संमेलनाला जत्रा म्हणा, यात्रा म्हणा की बाजार. हे संमेलन ही सर्वसामान्य मराठी माणसाची (विशिष्ट वर्गापुरत्याच मर्यादित असलेल्या) सांस्कृतिक गरज आहे. तशी ती नसती तर, संमेलन महाराष्ट्रात न भरता अमेरिकेत भरत आहे, हे ऐकून एवढी राळ उठलीच नसती.   (... आणि आपण सगळ्यांनीही ही चर्चा तरी कशाला केली असती? )
मराठी साहित्य महामंडळाचे नेमके कार्य काय चालते, कुणास ठाऊक! त्यामुळे त्याची गरज आहे की नाही, हे कसे काय बरे सांगता येणार???
पण एक आहे की, (वाचननेडा) मराठी माणूस साहित्यसंमेलन असो की नसो, त्याचे वाचन त्याच्या त्याच्या पातळीवर सुरूच असते. वर्षानुवर्षे. आणि हाच मराठी माणूस साहित्याचा कणा आहे. ज्यांच्या पिंड कार्यकर्त्याचा आहे, ते लोक स्थानिक पातळीवर छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन आपल्यातील कार्यकर्तेपणाची हौस भागवून घेतात (दाखवूनही देतात! ). यासाठी त्यांना कोणत्याही मोठ्या संस्थेच्या मदतीची गरज भासत नाही.
समाजातील अति उच्चभ्रू वर्ग संमेलनाच्याबिंमेलनाच्या भानगडीत पडत नाही. (त्याला अशा गोष्टींसाठी वेळ तरी असतो का बरे!!! ). उच्च मध्यमवर्गीयांचीही वाटचाल आता अशीच होत आहे. (आपण आणि आपले! ). असे लोक सार्त्र, काम्यू, काफ्का (या वर्गात मोडणारे अमेरिका-युरोपमधील सध्याचे साहित्यिक माहीत नसल्याबद्दल माफ करावे! ) यांच्या साहित्यावर चर्चा करत बसतील... पण संमेलनांचे आणि त्यांचे देणे-घेणे तसे नसतेच म्हणायचे.
साहित्याची आवड असणाऱ्या साध्यासुध्या, सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांची मात्र सॅन फ्रान्सिस्कोमुळे नक्कीच पंचाईत होणार आहे. हेच लोक साहित्यसंमेलन असो, नाट्यसंमेलन असो की आणखी कोणते संमेलन असो... तन-मन-धनाने झटत असतात. अशा संमेलनांत सक्रिय सहभागी होत असतात. ते अर्थातच सॅन फ्रान्सिस्कोला जाऊ शकणार नाहीत... दूरचित्रवाणीसंच त्यांची तहान भागवू शकेल... पण ही तहान ताकावरचीच!
हातावर पोट असणाऱ्यांना बिचाऱ्यांना कशाचेच सोयरसुतक नसते. पोट भरणे हाच त्यांच्यापुढील सगळ्यात मोठा प्रश्न. हमाल, हातगाडी ओढणारे, धुणी-भांडी करणारा महिलावर्ग अशांना साहित्यसंमेलन म्हणजे काय हे माहीतही नसते. यात दोष त्यांचा अजिबातच नाही. दीनवाणेपणाने आला दिवस ढकलत असतात ही साधीसुधी माणसे.  त्यांच्या कथा-व्यथांचे, दुःखांचे चित्रण आपण करतो आणि तेच साहित्य  बनते... आणि आपण त्यांच्या या भांडवलावर मोठे साहित्यकार म्हणून मिरवतो!!! मात्र, त्या बिचाऱ्यांना याची गंधवार्ताही नसते... अशा वर्गाला रत्नांग्री काय, ठाणे काय, सॅन फ्रान्सिस्को काय, बुर्किना फासो काय, चंद्र काय नि मंगळ काय...! कुठेही भरवा साहित्यसंमेलन. त्यांच्या लेखी सारे सारखेच. या वर्गाला ना साहित्यसंमेलनाची गरज आहे ना मराठी साहित्य महामंडळाची...

४) आम साहित्यरसिक, साहित्यप्रेमींची उपस्थिती शक्य होईल अशा ठिकाणी अ. भा. साहित्य संमेलन घेणे अधिक योग्य आहे काय?

-होय. या प्रश्नाच्या उत्तरादाखल वरील उत्तरातीलच एक परिच्छेद पुन्हा जसाच्या तसा देत आहे...

साहित्याची आवड असणाऱ्या साध्यासुध्या, सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांची सॅन फ्रान्सिस्कोमुळे मात्र नक्कीच पंचाईत होणार आहे. साहित्यसंमेलन असो, नाट्यसंमेलन असो की आणखी कोणते संमेलन... हेच लोक  तन-मन-धनाने झटत असतात. अशा संमेलनांत सक्रिय सहभागी होत असतात. ते अर्थातच सॅन फ्रान्सिस्कोला जाऊ शकणार नाहीत... दूरचित्रवाणीसंच त्यांची तहान भागवू शकेल... पण ही तहान ताकावरचीच!

५) परदेशात अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतल्याने जिथे मराठी लिहिली, बोलली जाते त्या महाराष्ट्रातील वाचकसंस्कृती वाढीस लागणार आहे काय?

-हे म्हणजे बिरबलाच्या कथेतल्याप्रमाणेच झाले. आढ्याला टांगलेल्या भांड्यातील खिचडी जमिनीवरील विस्तवाने कशी काय शिजणार?

असो... एका चांगल्या च्रर्चेला तोंड फोडल्याबद्दल चित्त यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.


अवांतर - आपल्या बगलबच्च्यांची फळी (पक्षी ः लॉबी) उभी करण्याची कला ज्या साहित्यिकांच्या अंगी नव्हती, नाही, (केवळ साहित्यनिर्मिती ही कला थोडीच आहे? ), जे निवडणुकीचा चिखल तुडवू इच्छित नव्हते, नाहीत, असे कितीतरी प्रतिभावंत साहित्यिक संमेलनाच्या अध्यक्षपदापासून अखेरपर्यंत वंचितच राहिले. (यातले अनेकजण तर काळाच्याही पडद्याआड गेले.). राहत आहेत. यापुढेही वंचित राहतील. वंचित राहिलेल्या अशा किती साहित्यिकांची नावे घ्यायची ? म्हणूनच वर म्हटले की, पत आहे की नाही हा मुद्दा अलाहिदा, ऐपत असली पाहिजे!!... मग ही ऐपत पैशांची असो, राजकारण करण्याची असो, गटबाजी-कंपूशाही-टोळीगिरी करण्याची असो की आणखी कशाची.... अशा या साहित्य-`व्यवहारा` विषयी आणि साहित्यसंमेलनांविषय़ी काय बोलायचे?
.....
पण असो.... अमेरिकेतील सॅन फ्रान्सिको येथे फेब्रुवारी २००९ मध्ये भरणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!