माझ्या मते, संस्कार जोपासते ती संस्कृती.
संस्कार म्हणजे काय? रूढी म्हणजे संस्कार काय? इतकी साधी व्याख्या पटत नाही. सत्य/असत्य, योग्य/अयोग्य विवेकाने परीक्षा करून त्यानुसार वागण्याची पात्रता अंगी बाणवणे यासाठी जो मार्ग अवलंबला जातो ते संस्कार.
या वरून संस्कारांची अन पर्यायाने संस्कृतीची गरज का तेही पुरेसे स्पष्ट होईल असे वाटते.
जीवनाचा जेवढा सर्वांगीण विचार आपल्या पूर्वजांनी केलेला आहे तेवढा क्वचितच कुणी केला असेल. साधे हेच पाहा ना - आपल्या कडे योगसाधनेसाठी एकूण ८ पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यातल्या यम आणि नियम या प्रथम दोन पायऱ्या सर्वसामान्य माणसालाही लागू होतात.
यम - अहिंसा, सत्य, अस्तेय (प्रामाणिकपणा), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरज नसताना इच्छा न धरणे)
नियम - शौच (काया-वाचा-मन यांची शुद्धता), संतोष, तप (चांगल्या ध्येयासाठी थोडा त्रास, शारीरिक/मानसिक, सहन करणे), स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान (संपूर्ण श्रद्धा)
अधिक माहितीसाठी हे दुवे वाचावेत - दुवा क्र. १, दुवा क्र. २
--- यांतील एक ब्रह्मचर्य सोडले तर इतर सर्व गोष्टी सामान्य माणसाला लागू पडतात. ब्रह्मचर्य सुद्धा, जर मानले तर, गृहस्थ (लग्न झालेला) इतर स्त्रियांच्या बाबतीत पाळू शकतो अन स्त्री इतर पुरुषांच्या बाबतीत.
[माझे मतः अर्थात् राज्यकर्त्याला यातील काही बंधनातून माफक सूट आवश्यक आहे. उदा. राज्यकर्त्याने अहिंसा पाळायची ठरवली तर राज्य लयाला जायला जास्त वेळ लागणार नाही. अन्यायाच्या विरुद्ध राज्यकर्त्याचे शस्त्र उचलल्या गेलेच पाहिजे. ]
स्वतः श्रीकृष्ण म्हणतात कि जेथे स्त्रीत्त्वाचा अपमान होतो ते राज्य धुळीस मिळते. काय हे संस्कार नाहीत?
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून सर्वांगीण विचार केलेला दिसून येतो.
मूळ फरक आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये होता. तो आपला मूळ गाभा होता. गुरुकुलात आचार्य मुलांना शास्त्र, कला, विज्ञान, योग यांचे प्रशिक्षण देत. अन समाजाभिमुख संस्था म्हणून ते काम करत असत. या आचार्यांना मान होता कारण ते त्या योग्यतेचे निःस्पृह लोक होते. राजांसाठीही नियम होते अन प्रजेसाठीही नियम होते. [शतकत्रयी या पुस्तकात राजा भर्तृहरीने लिहीलेले ३०० श्लोक सार्थ संग्रहित आहेत... जरूर वाचावेत. ]
प्राचीन काळात मंदिरे भरपूर होती. आजही आहेत, नाही असे नाही. पण त्या मंदिरांचे मूळ प्रयोजनच हरवलेले दिसते. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या वचनात मंदिरांचे प्रयोजन काय त्याचा उल्लेख सापडतो. "देवाच्या पुजेअर्चेसोबत तेथे अन्नदान चालावे. प्रवासी लोकांची सोय व्हावी. नैसर्गिक प्रकोपांत लोकांस मदत करावी. " हे सर्व कार्य मंदिरांकडून अपेक्षीत होते अन त्यासाठी राजे-महाराजे त्यांस भरघोस मदतही करत असत. ही म्हणजे संस्कृती नव्हे काय?
जे तत्त्वज्ञान गीतेमध्ये सांगीतले आहे ते संस्कार नाहीत तर अजून काय आहे? [अवांतरः आपल्याकडे गीता सांगितल्या गेली कि नाही यावर वाद होतात... त्यापेक्षा ते तत्त्वज्ञान आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे जास्त श्रेयस्कर आहे. ]
"जतो मत ततो पथ" [जितकी मते तितके मार्ग] हे श्रीरामकृष्णांचे वाक्य सर्वसमावेशक दृष्टी दाखवत नाही काय?
रूढी या कालानुरूप बदलत असतात/बदलायला हव्यात. पण संस्कारांचा गाभा बदलू नये.