तो आला आणिक बरसून गेला
आसमंत हा हरखून गेला
वैशाख वणवा विझवून सारा
वसुंधरेला भिजवून गेला
टपटप टपटप घाव घालुनी
जणू विजयी योद्धा मिरवून गेला
आतुरल्या त्या पशू पक्षांना
घास चाऱ्याचे भरवून गेला
कवेत घेऊन इंद्रधनूला
श्रावण सरींना फिरवून गेला
पाहून आसवे पाना फुलांची
भेट पुन्हाची ठरवून गेला
------------------------
आठवतोय तुला तो पाऊस????
मी.........
मी त्या पावसात चिंब भिजायची,
रानभर धावत सुटायची,
पावसाचा प्रत्येक थेंब झेलण्यासाठी
त्याला कवेत घेण्यासाठी...........
तू........ पण तू.........
तू आडोशालाच उभा रहायचास,
एकटाच..!! कोरडा.............
कदाचित, पाऊस तुला कळलाच नसावा.
त्या पावसासारखीच मी,
कवितेतून तुझ्यावर बरसायची,
पण तू.........
तू कधी चिंब भिजलाच नाहीस,
तू फक्त "कोरडा"च राहिलास......
तेव्हाही आणि आत्ताही
कदाचित त्या पावसाचं बरसणं
आणि माझं तरसणं तुला
कधीच समजल नाही........