अनेक नैसर्गिक चक्रं असतात. (कुठेतरी वाचल्याचं आठवतं की) पूर्वी पृथ्वी ही द्रवरूप अवस्थेत होती. कालांतराने ती घनरूप धारण करू लागली. पण तेव्हा पृथ्वीवर आत्ता आहे त्यापेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात पाणी होतं. किंबहुना जमीनच नव्हती, नुसतं पाणीच होतं असं म्हणा ना. हळूहळू जमिनीचे प्रमाण वाढू लागलं. गेल्या २ अब्ज वर्षात तर जवळपास दुप्पट झालं आहे. आता म्हणे जागतिक तापमान वाढल्याने बर्फ वितळू लागला आहे आणि पृथ्वीवर पुनश्च 'पाणीच पाणी चहूकडे गं बाई' होणार आहे. एकुणात काय? पृथ्वी पूर्वी जशी होती तशीच परत होणार आहे आणि एक निसर्गचक्र पूर्ण होणार आहे म्हणे.
आता ह्या एवढ्या (आपल्या परंपरेला अनुसरून असलेल्या) विषयांतरानंतर मूळ मुद्द्यावर (गुद्द्यावर नव्हे! 'ष' ऐवजी 'श' खपतो पण इथे 'मु' ऐवजी 'गु' नाही खपणार हो!) येतो. तर म्हणायचं एवढंच आहे की अगदी पूर्वी (म्हणजे अगदी आदिमानवाच्या काळात... पृथ्वीवर homo sapiens वगैरे असताना...) भाषा अस्तित्वात नव्हती. सर्व लोक हातवाऱ्यांनी वेळ मारून न्यायचे. नंतर हळूहळू मानवाला बोलता येऊ लागलं. (तेही भाषेचे बोबले बोलच होते बरं का! त्यामुळे 'ह्या' बोबल्या बोलांना हसायचं काम नाय!) उत्तरोत्तर भाषा उत्क्रांत होत गेली. मोठमोठी महाकाव्यं रचली गेली. पण आता बहुतेक एक निसर्गचक्र पूर्ण व्हायची वेळ आलेली दिसतीये. ज्याप्रमाणे पृथ्वी पूर्वी जशी होती तशीच परत होणार आहे त्याप्रमाणेच बहुतेक भाषेच्या बाबतीतही होणार आहे असं मला वाटतं... असो.
जाता जाता: सतीशराव, एक मित्रत्वाचा सल्ला देतो. आपण काव्य करायला लागा. ते आपल्याला फक्कड जमेल बहुतेक. (निरङ्कुशाः कवयः आठवलं म्हणून म्हटलं हो, उगीच रागावू नका.)
उद्यापासून मी करपल्लवीच्या (हातवारे करण्याला करपल्लवीच म्हणतात ना हो?) वर्गाला जाईन म्हणतो.