ही भाजी फार सोपी आणि जबरदस्त लागते. पावसाळ्याच्या दिवसात (थुईथुई थेंब, थेंबबावरी नक्षी, मातीचा सुवास वगैरे असला की) असली वाफाळलेली भाजी आणि गरमागरम चपाती खावी. 

मी हिरवी मिरची न वापरता थोड्या वेगळ्या पद्धतीने करतो ती अशी.

आधी जिरेमोहरीची फोडणी देऊन नंतर कांदा, लसणाच्या पाकळ्या परतवून घ्याव्यात. मग हळद, मीठ, लाल मिरची टाकावी. नंतर त्यात ठेचलेले बटाटे टाकून वाफेवर शिजवून घ्यावेत. नंतर वरून थोडी कोथिंबीर टाकावी. साखर घालू नये. बटाटे ठेचताना फोडी करून घेण्याऐवजी जर आख्खेच ठेचले तर अधिक चांगले लागतात असा अनुभव आहे.