सगळीकडे वाढत चालला भार

तशातच थंड असे कारभार,

अजूनही आहे काही बाकी काळ

म्हणून काढल्या डुलक्या त्रिकाळ ।१।

आकडे फुगविले कोटयानकोटी

थोडे तुझ्या पोटी, थोडे माझ्या पोटी,

कागदोपत्री दाखविले नियोजन

अखेर जनतेच्या माथी अमृतांजन ।२।

जनतेनेही कदाचित मनोमनी स्वीकारले आहे

तारेवरची कसरत करीत रोजचे जीवन जगायचे आहे,

हे ऋतुचक्र आहे सांगून हात झटकतात राज्याचे कारभारी

म्हटले आहेच, 'देव तारी त्याला कोण मारी' ।३।

तरीही कोणी धीटपणे विचारले तर म्हणतातः

नेमेची येतो मग पावसाळा

बदला स्वतःच्याच तऱ्हा आणि वेळा !!!